Home Blog Page 181

‘चिप मिनिस्टर’ देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील? प्रश्न आयोगाला मग उत्तर भाजपा का देते? – हर्षवर्धन सपकाळ

  • मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन..
  • मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी न करता राहुल गांधींवर आगपाखड कशासाठी?

मुंबई – लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चक्काजाम करण्यात आला, या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ यांच्यासह आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला.

या आंदोलनाआधी टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग व भाजपाचा खरपूस समाचार घेतला, राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम १७/१८/१९ नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? असे सपकाळ म्हणाले.

देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’!
निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे, या अहंकराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेंव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे. राहुल गांधी यांनी जो घोटाळ दाखवला त्यातून निवडणूक आयोग बरोबरचे हितसंबंध उघडे पडतील याची भिती देवेंद्र फडणवीस यांना वाटत असावी म्हणूनच त्यांची फडफड होत असावी, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने मतदानावेळीच हरकत का घेतली नाही, या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाकडून असे प्रश्न उपस्थित करून भ्रम पसरवला जात आहे. मतदानावेळी व त्यांनतरही काँग्रेसने आक्षेप घेतलेले होते व हरकतीही उपस्थित केल्या आहेत. पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाला भेटून घोटाळाचे पुरावेही त्याचवेळी दिले आहेत पण भाजपा केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे.

मतचोरीविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार..
मतचोरी विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आंदोलन करणार आहे. रॅली काढून, पदयात्रा व यात्रा अशा विविध प्रकारे हे आंदोलन करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते हे वर्दी नसलेले पोलिसच-सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा 

  • दत्तात्रय कावरे यांना लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार प्रदानपुणे परिवार तर्फे गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार सोहळा.

पुणे : गणपती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते वर्दीत नसतात पण वर्दी नसलेले पोलिसच आहेत. त्यांनी गणेशोत्सवात पोलिसांसोबत काम करून, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. मंडळांनी पोलिसांच्या कोणत्याची कृतीचा आणि सूचनेचा राग मानून घेऊ नका. तुमच्या सुरक्षेसाठी पोलिस असतात. पोलिस सदैव गणपती मंडळाच्या सोबत आहेत. चांगल्या आणि सुरक्षित पद्धतीने गणेशोत्सव पार पाडू, अशी भावना सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केली.

पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे माजी अध्यक्ष दत्तात्रय कावरे यांना तर दिपक दाते, हेमचंद्र दाते यांना लोकमान्य गणेश सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. माजी आमदार उल्हास पवार, आमदार हेमंत रासने, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, आयोजक विनायक घाटे, ॲड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, प्रकाश ढमढेरे यावेळी उपस्थित होते.

रंजनकुमार शर्मा म्हणाले, गणेशोत्सवाच्या संदर्भात बैठका सुरू आहेत त्यामध्ये सगळ्यांचे समाधान होईल असा सर्व मंडळाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला जाईल. एक गणपती एक पथक, इतर गणपती मंडळांना चांगला वेळ असे अनेक मुद्यांसदर्भात विचार सुरू आहेत. गणेश मंडळाच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्याचा सन्मान केला जातो हे स्तुत्य आहे. मागील वर्षापेक्षा चांगले काम यापुढेही कार्यकर्त्यांनी करावे. ढोल ताशा पथक विदेशात जाऊन वादन करतात या पथकांचा अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले. 

उल्हास पवार म्हणाले, जो पर्यंत चंद्र सूर्य असेल तो पर्यंत हा गणेशोत्सव चालू राहील. अनेक देशांमध्ये गणपती ही आद्य देवता आहे. या गणपतीचा उत्सव कसा असला पाहिजे, याचे आत्मचिंतन करायला पाहिजे. लोकांचे प्रबोधन व्हावे ही भूमिका गणेशोत्सवामागे होती तो विचार कार्यकर्त्यांनी आणि गणेश मंडळांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेमंत रासने म्हणाले, गणेशोत्सवाला राज्यउत्सव म्हणून दर्जा मिळाला आहे. राज्यउत्सवाच्या माध्यमातून पुण्याचा उत्सव निर्बंध आणि भयमुक्त करायचा आहे, ही सगळ्यात पहिली मागणी आहे. उत्सवातील त्रुटी सगळ्यांनी मिळून दूर केल्या पाहिजेत. उत्सवात येऊन कोणाला अडचण वाटता कामा नये. महिला सुरक्षा, आरोग्य या सुविधा चांगल्या पद्धतीने आपण देऊ. खाकी वर्दीतले पोलिस ही गणेशोत्सवाचे कार्यकर्तेच आहेत. उत्सवात मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करत असेल तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

पराग ठाकूर म्हणाले, संकटसमयी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याची आठवण आधी येते. परंतु मंगल समयी तो सगळ्यात शेवटी असतो. ॲड. प्रताप परदेशी म्हणाले, गणेशोत्सव मंडळातील खरा कार्यकर्ता पुणेकरांसमोर आणण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून होते.

होनाजी तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राहुल आलमखाने, तरुण शिव गणेश मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाचे कार्यकर्ते ओंकार कलढोणकर, विधायक मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिषेक मारणे, सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समर्थ प्रतिष्ठान वाद्य पथकाचे संजय सातपुते यांना गणराया गुणगौरव पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्ता सिराज पूनावाला यांना सद्भावना सलोखा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महेश सूर्यवंशी, पुनीत बालन यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. प्रताप परदेशी यांनी पुरस्काराची माहिती दिली. प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.

भिम पेमेंट अ‍ॅपद्वारे युजर्सना त्यांच्या डिजिटल पेमेंट्स प्रवासात मदत करणारे सहा मार्ग 

डिजिटल पेमेंट्स आता केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते भारतभरात मोठ्या शहरापासून लहान गावांपर्यंत प्रत्येकाच्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहे. जास्तीत जास्त नागरिक दैनंदिन गरजांसाठी पेमेंट अ‍ॅपकडे वळत असून डिजिटल मनी मॅनेजमेंट वेगाने विकसित होत आहे. ही व्यवस्था आता केवळ पैसे पाठवण्यापुरती किंवा मिळवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यात खर्चावर देखरेख करण्यापासून, बिलांची अद्ययावत माहिती मिळवण्यापर्यंतच्या सोयी आणि आर्थिक निर्णय योग्य माहितीसह सहजपणे, आत्मविश्वासाने घेता यावेत यासाठी टुल्सचा समावेश आहे.

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युजर्सना भिम पेमेंट अ‍ॅप वापरून पुढील सहा मार्गांनी अर्थपूर्ण स्टेप्स घेता येतील –

1. तुमच्यासाठी सोयीच्या असलेल्या भाषेत पेमेंट्स करा

भिम पेमेंट्स अ‍ॅपद्वारे हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि ओडिया यांसह १५ भाषांमध्ये सेवा दिली जाते. यामुळे युजर्सना हे अ‍ॅप वापरणं सोपं जातं व त्यांना आपल्या आवडीच्या भाषेत व्यवहार पूर्ण करता येतो. यामुळे विशेषतः दुकानदार, ज्येष्ठ नागरिक किंवा दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांतले फर्स्ट टाइम युजर्स यांची मोठी सोय होते. आपल्याला माहीत असलेल्या भाषेत संवाद साधणं सोपं वाटतं आणि विश्वास वाढतो. पर्यायाने डिजिटल व्यवहार भीतीदायक वाटत नाहीत.

2. इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असतानाही व्यवहार करण्याची सोय

हे अ‍ॅप कमी किंवा अस्थिर इंटरनेट सुविधा असतानाही चालत असल्यामुळे ग्रामीण भागातील युजर्ससाठी किंवा सतत नेटवर्क इश्यू असलेल्या ठिकाणी ते फायदेशीर ठरतं. स्थानिक बाजारात असताना किंवा रोजच्या कामाच्या वेळी महत्त्वाची पेमेंट्स पूर्ण होत असल्याचा विश्वास नक्कीच लाभदायक ठरतो.

3. कोणतेही अतिरिक्त प्रयत्न न करता खर्चाचा आढावा

भिम पेमेंट्स अ‍ॅपमध्ये स्पेंड्स अनालिटिक्ससारखी वैशिष्ट्ये समाविष्ट असल्यामुळे युजर्सना त्यांचे पैसे नेमके कुठे खर्च होतात याचा मासिक आढावा घेता येतो. स्पिल्ट एक्सपेन्सेसारख्या पर्यायामुळे लोकांना त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवारासोबत सहजपणे खर्च वाटून घेता येतो. रूममेट्स, एकत्र प्रवास करताना किंवा एकत्रितपणे किराणा खरेदी करताना सहजपणे ट्रॅकिंग करता येते.

4. संपूर्ण खर्चाचा समन्वय एकाच ठिकाणी

फॅमिली मोडच्या मदतीने युजर्सना त्यांच्या कुटुंबातील सदस्य ऑनबोर्ड करता येतील, विशिष्ट पेमेंट्स असाइन करता येतील व एकत्रित खर्च पाहाता येतील. बिलं मॅनेज करणारं एखादं जोडपं असो किंवा एकत्रित खर्च करणारे भाऊ- बहीण असो, या सुविधेमुळे प्रत्येकाला माहिती मिळते व खर्च सुरळीतपणे जाणून घेता येतो.

5. विश्वासार्ह व्यक्तींना पेमेंट्समध्ये मदत करण्याची मुभा द्यानियंत्रण आपल्या हातात ठेवून

युपीआय सर्कल सुविधेमुळे युजर्सना त्यांच्या ऐवजी पेमेंट इनिशिएट करणाऱ्या व्यक्तींचं नेटवर्क तयार करता येतं. यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी प्रायमरी युजरची परवानगी आवश्यक असते. केयरगिव्हर्स किंवा मुलं अथवा घरातल्या मदतनीसांना खरेदी करू देणाऱ्या बिझी आई- वडिलांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरते. त्यांना किराणा किंवा युटिलिटी बिल्ससारखी दैनंदिन पेमेंट्स सहजपणे करता येतात. विशेष म्हणजे, हे करताना त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती आणि पूर्ण नियंत्रण ठेवता येतं.

6. महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी रिमाइंडर्स

अ‍ॅक्शन नीडेड या सेक्शनमध्ये राहिलेली पेमेंट्स, कमी बॅलन्स किंवा युपीआय लाइट अ‍ॅक्टिव्हेशन यांसाठी रिमाइंडर्स दिला जातो. अशा रिमांइंडर्समुळे महत्त्वाची पेमेंट्स राहून जाण्याची शक्यता कमी होते व युजर्सना रोज स्वतःहून ट्रॅक करण्याची गरज राहात नाही. त्यांना आपोआप अपडेट्स मिळतात. त्याशिवाय युजर्सना वीज, पाणी आणि इतर युटिलिटी बिल्स थेट अ‍ॅपद्वारे भरता येतात. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त किंवा छुपे शुल्क आकारले जात नाही. यामुळे मासिक खर्चाचे व्यवस्थापन सोपे होते.

वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सोपे, विश्वासार्ह टुल हाताशी असणं हा पैसे स्वतंत्रपणे हाताळण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. अशाप्रकारच्या सुविधा देशभरातील युजर्सना आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यासाठी मदत करतील.

चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच

पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे? मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच अजित पावर पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे?, सगळी वाहतूक सुरु करा, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.

पुणे: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे सोबतच बारामतीची तुलना चाकण सोबत करू नका असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली. आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुयात. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे, मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

डॉक्टर नव्हे,देव !

जगात दया, धर्म, मानवता यांची नेहमीच वानवा रहात आली आहे. त्यात आता तर
दिवसेंदिवस नितिमत्तेचे अवमूल्यन होत आहे. सख्खे भाऊ एकमेकांचे जीव घेत आहेत.वृध्द आईवडिलांना
मुलं वृध्दाश्रमाची वाट दाखवित आहेत. एकीकडे मानवी मूल्यांचे इतके पतन होत असताना पुण्याचे डॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा हे दाम्पत्य भिकारी, निराधार, अनाथांसाठी आशेचे किरण बनले आहेत. त्यांच्या ह्या कार्यामुळे भिकाऱ्यांचे डॉक्टर अशी त्यांची ओळख होत निर्माण झाली आहे.

प्रेरणा :

मुळचे सातारा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले डॉ. अभिजित यांनी बीएएमएस केले . त्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली . ते चांगले स्थिरावले होते. अशात त्यांना एका परोपकारी भिकारी बाबाजीची आठवण आली. डॉ. अभिजित यांना ही नोकरी मिळण्याआधीच्या काळात वैफल्य आले होते. त्यांचा डॉक्टरी व्यवसाय चालेनासा झाला होता. अत्यंत उव्दिग्न मनस्थितीत ते एकदा खडकवासला येथील
मंदिरात जाऊन बसले असता तेथे एका भिकारी बाबाजीने त्यांना खूप धीर दिला.”हिम्मत हारू नको बाळ ” म्हणून त्यांना दिलासा दिला. इतकेच नाही तर केवळ शाब्दिक दिलासा देऊन न थांबता त्यांनी स्वतःच्या कटोऱ्यात जमा झालेले भिकेचे सर्व पैसे देऊन प्रत्यक्ष मदत केली.

पुढे स्थिरस्थावर झाल्यावर या प्रेरणादायी बाबाजींना भेटण्यासाठी डॉ अभिजीत तेथे गेले असता त्या बाबाजीचे निधन झाल्याचे त्यांना कळाले. हे ऐकताच डॉ. अभिजित यांना अतिव दु:ख झाले. ज्या बाबाजींनी आपल्या पडत्या काळात आपल्याला दिलासा दिला, त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही,त्यांना शेवटपर्यंत भीक मागून जगावे लागले ही बाब त्यांच्या मनाला चटका लावून गेली. आता या चुकीचे आपण परिमार्जन करावे असा निश्चय करून आपले उर्वरित आयुष्य अशा भिकारी, दु:खी, कष्टी लोकांना मदत करण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून उभे करण्यासाठी वेचावे असा त्यांनी मनाचा ठाम निर्धार केला. चांगल्या नोकरीवर पाणी सोडून ह्या जगा अघाटीत सेवायज्ञात उडी घेतली. लोक काय म्हणतील ? याची पर्वा केली नाही.सुदैवाने पत्नी डॉ. मनीषा हिनेही त्यांच्या विचारांना साथ देऊन सक्रीय सहभाग दिला.
डॉ. मनीषा यांनी वैद्यकीयव्यवसायातून प्रपंच चालविला आणि उर्वरित पैसे त्या पतीच्या कार्यात मदत करण्यासाठी देत राहिल्या.डॉ. अभिजित दिसेल त्या भिकाऱ्यांची मदत करू लागले. त्यांच्या दु:खावर फुंकर घालू लागले. मात्र सुरूवातीला भिकारी त्यांच्यावर विश्वास ठेवत नसत. हा डॉक्टर आपल्या किडन्या तर काढायला आला नसेल ना? अशा शंकेने,भीतीने ते फुकट उपचार करून मिळत असतानाही उपचार करून घ्यायला घाबरत असत. पुढे मात्र हळुहळु डॉ. अभिजितयांची सचोटी व सेवा पाहून ते डॉक्टरांच्या जवळ येऊ लागले.

डॉ. अभिजित कोणत्या देवाचा कोणता वार आहे हे लक्षात घेऊन त्या-त्या दिवशी मंदिर, मशिद, चर्चच्या ठिकाणी जाऊन तेथे येणाऱ्या भिकाऱ्यांची विचारपूस करू लागले. त्यांचा औषधोपचार करणे, त्यांच्या जखमा पुसून मलमपट्टी करणे, जेथे गरज असेल अशा आजारी भिकाऱ्यांना दवाखान्यात भरती करू करणे, आवश्यक तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करणे आदी बाबी ते स्वतःच्या पैशातून करू लागले. या लोकांना आंघोळ घालणे, त्यांच्या अंगावर कपडे घालणे इ. कामे करू लागले. आता ते भिकाऱ्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग बनले आहेत.

एका सर्वेक्षणानुसार पुण्यात सुमारे ३५०० भिकारी आहेत. त्यापैकी ११०० जणांशी ते जोडल्या गेले आहेत . घरून सकाळीच औषधाच्या बॅगा ,कटिंग, दाढीचे सामान घेऊन ते आपल्या बाईकवर निघतात.भिकारांच्या वस्तीत जातात. त्यांना तपासून औषधोपचार
करतात.डोक्याचे केस, दाढी-कटिंग वाढल्याने विद्रुप दिसणाऱ्या भिकाऱ्यांना ते चांगले करतात. बऱ्याचशा भिकाऱ्यांना अंधत्व आल्याचे आढळल्यावर तपासणी करून अनेकांच्या त्यांनी नेत्र शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत.

स्वावलंबी करण्याची गरज:

भिकाऱ्यांचा समाज आणि सर्व सामान्य माणसांचा समाज ह्यात मोठी दरी आहे. भिकाऱ्यांना नेहमी हेटाळणी, तिरस्कार सहन करावा लागतो. याचे एकमेव कारण म्हणजे तो आपले स्वत्व हरवलेला परावलंबी माणूस आहे. तर दुसरीकडील समाज स्वावलंबी आहे. वास्तविक पाहता ही पण माणसं आहेत आणि ती पण माणसंच आहेत. म्हणूनच भिकारी समाजाला स्वावलंबी करणे गरजेचे आहे. ते स्वावलंबी व्हावेत, त्यांचे आजार, अपंगत्व घालवून रोजगार उपलब्ध करून दिल्यावर त्यांना माणूसपण पुन्हा प्राप्त
होऊन त्यांचे भीक मागणे थांबावे यासाठी डॉ. अभिजित यांची सदैव धडपड सुरू असते. या कामासाठी पैसा कमी पडतो म्हणून त्यांनी सोहम ट्रस्टची स्थापना केली. त्याव्दारे लोकांना आवाहन करून मदत गोळा करण्याचे कामही ते करीत आहे. अशिक्षित, निर्धन अशा या समाजाला दोन पैसे मिळविता यावे यासाठी ते वेगवेगळे उपाय करीत आहेत. मंदिरातून निर्माल्य गोळा करणे, निर्माल्यापासून पावडर तयार करून त्यापासून औषधोपयोगी द्रव्य तयार करून विकणे, वाया गेलेले कापड मिळवून पिशव्या तयार करणे,द्रव साबण, शोभेच्या वस्तू, गुच्छ इत्यादी तयार करणे, यासह ज्यांच्यात कौशल्य असेल त्यांना कौशल्यानुरूप कामे मिळवून देणे अशाप्रकारे त्यांना उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ अभिजीत ह्यांना त्यांच्या कामाकरिता स्वतंत्र जागेची फार गरज होती. ही गरज द बिबवेवाडी येथे २५०० चौरस फूट जागा देऊन दानिश शहा या दानशूर व्यक्तीने पूर्ण केली. सोबत आवश्यक साहित्यही घेऊन दिले.

प्रशिक्षण केंद्र:

दानिश शहा यांनी दिलेल्या
जागेत “मध्यरात्रीचा सूर्य “
हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

ह्या केंद्रात काही प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्षेकरी वेगवेगळे कौशल्य अवगत करीत आहेत. हा “मध्यरात्रीचा सूर्य ” भिकारांच्या जीवनातील अंधार दूर करीत आहे.

मुलेमुली दत्तक:

डॉ. अभिजित यांनी भिक्षेकऱ्यांच्या कुटुंबातील ५२ मुलेमुली दत्तक घेऊन त्यांना शिक्षित करण्याचे ते प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी काहींना शासकीय विभागात उत्तम नोकऱ्या पण मिळाल्या आहेत. एक मुलगी तर आता
स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे.

देवाची कल्पना:

डॉ. अभिजित यांची देवाविषयीची संकल्पना साधी आहे. भिकारी, दीनदुबळे, निराधार यांची सेवा हीच त्यांची पूजा असून, रंजले-गांजले हेच त्यांचे देव आहेत. ते म्हणतात, एखाद्या भिकाऱ्याला जेव्हा मी आंघोळ घालतो तेव्हा तो माझ्यासाठी अभिषेक असतो. त्यामुळे मला कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. वेद जाणण्याऐवजी दु:खीतांच्या वेदना जाणाव्या, असा विचार ते मांडतात. मी कोणीच नाही जे काही आहात ते तुम्ही सगळे आहात. ह्या कार्यात आर्थिक, मानसिक प्रोत्साहन तुम्ही मला देता, त्यामुळे मी हे करू शकतो. तुमच्याबरोबरच पत्नी डॉ. मनिषा हिचा ही तेवढाच महत्त्वाचा वाटा माझ्या यशात आहे. ती नसती तर मी काहीच करू शकलो नसतो, असे ते मानतात.

दृष्टिक्षेपात कार्य:

२८५ भिक्षेकऱ्यांना स्वतंत्र व्यवसाय टाकून दिला.

५२ मुलामुलींना दत्तक घेऊन शिक्षित करण्यात येत आहे. काहींना चांगल्या नोकऱ्याही मिळाल्या आहेत.

२५०० नेत्र शस्त्रक्रिया करवून घेऊन त्यांचे अंधत्व दूर केले.

३० जणांना श्रवणयंत्रे मिळवून दिली.

१४४ जणांवर ५ लाख रुपयांवरील खर्च असलेल्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

१०० लोकांचा चमू तयार करून पुण्यातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येत आहे. त्या बदल्यात त्यांना वेतन देण्यात येत आहे.

पुरस्कार :

डॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा यांच्या या मानवतावादी
कामाची दखल घेऊन त्यांना आता पर्यंत २५०० पुरस्कार मिळाले आहेत. लोकमान्य टिळक, संत गाडगेबाबा, मदर टेरेसा ह्या सारख्या महत्वपूर्ण पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. शासनातर्फेही त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.

मुलाखतीचा शेवट करताना डॉ अभिजीत म्हणाले,
“मला कितीही बक्षीसे मिळाली तरी खरे बक्षीस मला तेव्हाच मिळेल जेव्हा मी सर्व भिकाऱ्यांना स्वावलंबी करून प्रतिष्ठा मिळवून देईल.” हेच त्यांचे अंतिम स्वप्न आहे.डॉक्टरांचे हे उदात्त स्वप्न साकार करण्यासाठी आपणही सर्व जण मिळून शक्य ती मदत करू या.


लेखन: रणजीत चंदेल
निवृत्त माहिती अधिकारी
यवतमाळ
संपादन:देवेंद्र भुजबळ
_9869484800

ट्रम्प पाकिस्तान-बांगलादेशवर मेहरबान, टॅरिफ 20% पेक्षा जास्त नाही:भारत-ब्राझीलवर 50% टॅरिफचा मार

जगभरातील देशांना आयात शुल्काची धमकी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे विशेषतः भारताच्या दोन शेजारी देशांवर दयाळू आहेत. ट्रम्प यांनी पाकिस्तानवर 19% आणि बांगलादेशवर 20% आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे.उलट, त्यांनी भारतावर दोनदा २५% टॅरिफ लादण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सेकंडरी सँक्शन्सचीही धमकी दिली आहे.

भारताप्रमाणेच ट्रम्प यांनी ब्राझीलवर ५०% टॅरिफ लादला आहे. त्याच वेळी, चीनवर सध्या ३०% टॅरिफ लादला जात आहे. फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार, जर टॅरिफ दर वाढला तर चीनचा जीडीपी सुमारे १% ने कमी होऊ शकतो.
ट्रम्प यांनी पाकिस्तानवर १९% टॅरिफ लादला आहे. दक्षिण आशियातील कोणत्याही देशावर अमेरिकेने लावलेला हा सर्वात कमी कर आहे. एप्रिलच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी पाकिस्तानवर २९% कर लादण्याबद्दल बोलले होते.

नवीन आदेशात, ट्रम्प यांनी पाकिस्तानला १०% सवलत दिली आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल करारही केला आहे. या अंतर्गत, अमेरिका पाकिस्तानमध्ये तेल साठवणूक, प्रक्रिया आणि बांधकाम करण्यास मदत करेल.

पाकिस्तानचा सर्वात मोठा निर्यात क्षेत्र म्हणजे त्याचा कापड उद्योग (८०%). अमेरिका त्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. कमी शुल्कामुळे त्याचा अमेरिकन बाजारपेठेतील वाटा वाढू शकतो.

अमेरिकेने पाकिस्तानसोबत केलेल्या करारामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. याद्वारे पाकिस्तान अमेरिकेशी हातमिळवणी करून आपले प्रादेशिक स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानला जागतिक बँक आणि आयएमएफकडूनही आर्थिक मदत मिळू शकते.
अमेरिकेने बांगलादेशवर २०% टॅरिफ लादला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला बांगलादेशवर ३७% टॅरिफ लादण्यात आला होता. ४ महिन्यांत अमेरिकेला १७% कर कमी करण्यास भाग पाडण्यात बांगलादेशला यश आले.

बांगलादेश हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कापड निर्यातदार आहे. भारतावरील जास्त कर त्याच्या कापड निर्यातीत वाढ करू शकतात. २०२४ मध्ये त्याची निर्यात ८ अब्ज डॉलर्स (७० हजार कोटी रुपये) होती, जी २०२६ पर्यंत १० अब्ज डॉलर्स (८८ हजार कोटी रुपये) पर्यंत पोहोचू शकते.

कमी टॅरिफमुळे बांगलादेशला अमेरिकन बाजारपेठेत त्याचा ९% वाटा टिकवून ठेवता येईल. FBCCI च्या मते, यामुळे २०२६ पर्यंत देशाचा GDP ०.२% वाढू शकतो.
. भारत – २५ ते ३० लाख नोकऱ्या धोक्यात

अमेरिकेने ६ ऑगस्ट रोजी भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफ लादला. यामुळे भारताचा एकूण टॅरिफ २५% वरून ५०% पर्यंत वाढला आहे. हा अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून सुरू होईल. ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचे कारण रशियाकडून तेल खरेदी करणे असल्याचे सांगितले.

यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) च्या २०२४च्या अहवालानुसार, भारताने अमेरिकेला सुमारे ७.३५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या. ५०% टॅरिफमुळे अमेरिकन बाजारपेठेत भारतीय उत्पादने महाग होतील, ज्यामुळे मागणी कमी होईल.

अमेरिका भारतातून १५% कापड आयात करते. वाढीव टॅरिफमुळे हे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे भारतातील कापड उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

उच्च दरांमुळे रोजगारावरही परिणाम होईल. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, एमएसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्रातील २५-३० लाख नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

२०२४ मध्ये भारताने ११ अब्ज डॉलर्स (₹९१ हजार कोटी) किमतीचे रत्ने आणि दागिने निर्यात केले. किमती वाढल्याने मागणी कमी होऊ शकते. याचा परिणाम भारतातील दागिन्यांची बाजारपेठ असलेल्या सुरतच्या हिऱ्या आणि पॉलिशिंग हबवर होईल.

निवडणुका बॅलेट पेपरवर आणि एक वॉर्ड 1 नगरसेवक पद्धतीनेच झाल्या तरच खरी लोकशाही

पुणे: निवडणुका बॅलेट पेपरवर आणि एक वॉर्ड 1 नगरसेवक पद्धतीनेच झाल्या तरच लोकशाही खरी.. अशी स्पष्ट भावना नागरिकात असताना,कार्यकर्त्यांमध्ये देखील असताना राजकीय पक्षांच्या सोयी साठी त्या प्रभाग पद्धतीने आणि EVM वर घेतल्या जात आहेत हे आजवर लोक समजून चुकले आहेत.विधानसभा,लोकसभा का सिंगल मतदार संघात घेता त्यांचेही 4/4 प्रभाग करून घ्या 4/4 आमदार, खासदार निवडण्याची संधी द्या अशी उपरोधिक मागणी केली जात असताना स्थानिक स्वराज्य संस्थेत खरे लोकप्रतिनिधी नकोत तर राजकीय पक्षांचे गुलाम प्रतिनिधी हवेत असा आरोप आता जनतेतून होऊ लागला आहे .

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट (VVPAT) वापरणार नसल्याचे जाहीर करत असतानाच पुणे महानगरपालिकेच्या वतीने सावरकर भवन येथे घेतलेल्या ईव्हीएम मॉक पोल मध्ये व्हीव्हीपॅट द्वारे 4 चिठ्ठ्या जास्तीच्या आल्याचा विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन एका मशीनवर 51 वेळा मतदान करण्यात आल्या. ईव्हीएम यंत्रांवर मतदान करताना व्हीव्हीपॅट जोडून ही टेस्ट घेण्यात आली. मात्र त्यापैकी 51 मतांची प्रत्यक्ष मोजणी झाली असताना व्हीव्हीपॅटमध्ये 55 चिठ्ठ्या सापडल्या. विशेष म्हणजे या चिठ्ठ्यांमध्ये प्रत्येकी दोन जास्तीची मते क्रमांक 1 व क्रमांक 3 ला पडल्याचे दिसून आले. परंतु वरिष्ठांनी याची वाचता कुठे होऊ नये याची पद्धतशीरपणे काळजी घेतल्याचे दिसून आले.

व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय जाहीर करणारा आयोग, मग पुणे मनपा मध्ये मॉक पोल कशासाठी करताय ,हा सरळसरळ दुटप्पीपणा आहे आणि वरिष्ठ पातळीवरून अशा टेस्टिंगचे आदेश न मिळता महानगरपालिका अधिकारी अशा पद्धतीची चाचणी घेणार नाहीत.अशीही भावना व्यक्त होत आहे.

एकीकडे आयोग व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचे ठाम सांगतो आणि दुसरीकडे मात्र चाचणीत यंत्र वापरतो, ही बाब संशयास्पद ठरते आहे.
देशपातळीवर सध्या ईव्हीएम विरोधात वातावरण आहे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदार संख्येच्या वाढीबाबत आरोप होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी काही वेगळे घडवू पाहत असल्याची व्यक्त होणारी शक्यता नाकारता येणारी नाही.

महत्वाचे मुद्दे:

51 मतांच्या चाचणीला 55 व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या!

व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचं जाहीर करूनही, चाचणीत वापर?

क्रमांक 1 व 3 ला सर्वाधिक मते – हेतुपुरस्सर घडवलेली चाचणी?

विरोधकांना भ्रमात टाकण्याचे कारस्थान?

साडेसतरानळी, हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींचा २४ तासात छडा; सहा आरोपी ताब्यात

पुणे :रात्री साडेबाराच्या सुमारास साडेसतरानळी चौक, हडपसर येथे दोन दुचाकीवर टोळक्याने हातात कोयते, तलवारी, लोखंडी रॉड घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यांनी दुकानांच्या शटरवर, वाहनांवर बेधुंदपणे वार करत तोडफोड केली आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार केलं. फरार आरोपींना हडपसर पोलिसांनी अहिल्यानगर येथून जेरबंद केले, गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडेसतरानळी परिसरात त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली. जेथे दहशत तेथेच धिंड पुणे पोलिसांचा हा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला आहे.

या गंभीर घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. र. नं. ७४१/२०२५, भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२७, ३४, शस्त्र कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५) अंतर्गत नोंदवून तपासाला सुरुवात केली.

हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ०६ ऑगस्ट रोजी २४ तासांच्या आत हडपसर पोलीस पथकाने कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये चार विधीसंघर्ष बालकांचा समावेश आहे

श्रेयस विकास आलेकर (वय २२, रा.हडपसर, पुणे)

रोहित संदीप खाडे (वय १९, रा. गोकुळ नगर , कात्रज, पुणे)

चार अल्पवयीन बालक यांचा समावेश आहे

या घटनेतील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर तातडीने फरार होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस उपआयुक्त डॉ.राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने कारवाई राबवली.

अहिल्यानगर परिसरातून आरोपींना हडपसर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले

सध्या गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांची धिंड काढणे, हा पोलिसांचा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. याच प्रकारे या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती, त्या साडेसतरानळी चौकातच त्यांची धिंड काढण्यात आली.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.

डॉ. अमितेश कुमार – पोलीस आयुक्त, पुणे शहर
रंजन कुमार शर्मा – सह पोलीस आयुक्त, पुणे
मनोज पाटील – अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे

डॉ.राजकुमार शिंदे – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५
संजय मोगले – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर यांच्या मार्गदर्शनाखाली,
निलेश जगदाळे गुन्हे पोलीस निरीक्षक, अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे,
पोलीस उप निरीक्षक – हसन मुलानी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी,
कर्मचारी – संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखिल पवार, निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे,
आदींनी ही धडक कारवाई केली.

क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तातडीने निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.
हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली अहिल्यानगर येथून सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जेथे आरोपींनी तोडफोड करून दहशत केली होती तेथेच या आरोपींची पोलिसांनी धिंड काढून नागरिकांना दिलासा दिला यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.

हडपसर परिसरात वाढत्या कोयता गँगच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत दाखवलेली तत्परता आणि दृढ निश्चय प्रशंसनीय आहे. अशा पद्धतीने कडक आणि तातडीची कारवाई झाली तर गुन्हेगारी रोखली जाऊ शकते, असा विश्वास क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी व्यक्त केला.

बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्या-आनंदराव अडसूळ

पुणे, दि. 7: जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्या, एकही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिले.

व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना, नगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत असेल्या रमाई घरकुल वस्ती योजना, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या, झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाअंतर्गत गृहप्रकल्पाबाबत पात्र व अपात्र नागरिकांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, नगर परिषद जिल्हा प्रशासन अधिकारी व्यकंटेश दुर्वास, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. अडसूळ म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने बेघर नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास घरकुल योजना, झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्प आदी योजना राबविण्यात येत आहेत, याबाबत नगरपालिका क्षेत्रात व्यापक जनजागृती करावी. या विविध योजनांच्या माध्यमातून बेघर नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्याकरिता नगरपरिषदेने सर्वेक्षण करावे, जागा मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावे, अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनांकरिता दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे निधी खर्च करावा. रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मागणीबाबतचे प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे.

सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाअंतर्गत गृहप्रकल्पाबाबत नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात. शासनाच्या निर्देशाप्रमाणे अनुकंपा तत्वावर पात्र कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात यावी. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, पदोन्नतीच्या अनुषंगाने प्रलंबित विषय मार्गी लावून त्यांना न्याय देण्याची भुमिका ठेवावी, असेही श्री. अडसूळ म्हणाले.

जिल्ह्यात तळेगाव दाभाडे नगरपालिकांने महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने उत्तम काम केले असून इतरांनी एक मॉडेल स्वरुपात स्वीकारले पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने निर्देश दिले.

यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

हिंदुजा समूहातर्फे आनंद आगरवाल यांची ग्रुप प्रेसिडेंट – फायनान्स म्हणून नियुक्ती

मुंबई ऑगस्ट २०२५ : हिंदुजा ग्रुपने आनंद आगरवाल यांची ग्रुप प्रेसिडेंट – फायनान्स या पदावर नियुक्ती केली आहे. जवळपास तीन दशकांचा व्यावसायिक अनुभव असलेल्या आगरवाल यांनी कृषीविषयक उत्पादने, पायाभूत सुविधा (ऊर्जा), एफएमसीजी, वित्तीय सेवा, सिमेंट, धातू आणि बँकिंग पेमेंट सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. कॉर्पोरेट फायनान्स, ट्रेझरी, विलीनीकरण व अधिग्रहण (एम अॅंड ए), भांडवली रणनीती आणि गुंतवणूकदार संबंध या बाबतीत त्यांच्याकडे व्यापक कौशल्य आहे.

या नियुक्तीबाबत माहिती देताना हिंदुजा समूहातील मनुष्यबळ विकास विभागाचे ग्रुप प्रेसिडेंट अमित चिंचोलकर म्हणाले, “आमच्या समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये आता धोरणात्मक विस्ताराचा नवा टप्पा सुरू होत असून, त्यासाठी सक्षम आर्थिक नेतृत्व अत्यावश्यक आहे. कॉर्पोरेट फायनान्स आणि विलीनीकरण-अधिग्रहण या क्षेत्रातील आनंद यांचा सखोल अनुभव, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक धोरणे राबविण्याची सिद्ध क्षमता या आमच्या समूहाच्या वाढीला गती देतील. आमच्या पुढील विकासाच्या टप्प्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

हिंदुजा समूहाचे फायनान्स विभागाचे नववियुक्त ग्रुप प्रेसिडेंट आनंद आगरवाल म्हणाले, “हिंदुजा समूहाच्या सातत्याने होत असलेल्या प्रगतीमध्ये आपण योगदान देण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. आर्थिक बांधणी अधिक बळकट करणे आणि समूहातील विविध धोरणात्मक उपक्रमांना पाठबळ देणे, यावर माझा भर राहील. आर्थिक कार्यक्षमता वाढवणे, भांडवली वापर अधिक प्रभावी बनवणे आणि समूहाच्या विस्तार योजनांना गती देणे या प्रमुख गोष्टी माझ्या कामकाजाच्या केंद्रस्थानी असतील.”

आगरवाल यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रायव्हेट इक्विटी फंड्स, निवृत्तीवेतन निधी संस्था (पेंशन फंड्स) आणि सार्वभौम संपत्ती निधी (सॉव्हरिन वेल्थ फंड्स) यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर इक्विटी निधी उभारण्यात यश मिळवले आहे. तसेच त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अनेक उच्च मूल्य असलेल्या विलीनीकरण व अधिग्रहण (एम अॅंड ए) व्यवहारांचे नेतृत्व केले आहे. हिंदुजा समूहामध्ये रुजू होण्यापूर्वी आगरवाल हे चंबळ फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड केमिकल्स या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी टाटा पॉवर, पीपल कॅपिटल पीई, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी लिमिटेड या नामांकित संस्थांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.

आगरवाल चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, आयसीडब्ल्यूए आणि सीएफए ही सर्व व्यावसायिक अर्हता धारण करतात. तसेच त्यांनी आयआयएम, अहमदाबाद येथून एक्झिक्युटिव्ह एमबीए हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे– राज्य सरकारची केंद्र सरकारला विनंती

मुंबई, दि. ६ : “इतिहासाचे विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” असे ठाम प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशीष शेलार यांनी आज येथे केले. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनाने या चित्रपटाचे तातडीने पुनर्परीक्षण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

काल शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संघटक निलेश भिसे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांची भेट घेऊन चित्रपटाविरोधातील तक्रार व निवेदन सादर केले. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून जनभावना दुखावणारे दृश्य आणि संवाद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. या चित्रपटाच्या पुनर्परीक्षणाबाबत केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. गरज पडल्यास संबंधित केंद्रीय मंत्री व अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारला या चित्रपटाविरोधात मोठ्या प्रमाणावर निवेदने व तक्रारी प्राप्त झाल्या असून, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीची व विकृत माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटातील अनेक संवादांवर इतिहास अभ्यासक व शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव यांना पत्र पाठवून त्यात चित्रपटाचे पुनर्परीक्षण, दिलेल्या प्रमाणपत्राचा पुनर्विचार आणि पुनर्परीक्षण होईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अशी विनंती केली आहे.

मंत्री ॲड.शेलार पुढे म्हणाले की, या चित्रपटाला केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र कसे मिळाले? परीक्षण समितीने चित्रपटाचा योग्य अभ्यास केला होता का? यासंदर्भात चौकशी व्हावी. तसेच हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवासाठी कसा निवडला गेला, यामध्येही कोणताही खोडसाळपणा झाला आहे का, हे तपासले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी निवेदने अनेक संस्था, संघटना व इतिहास अभ्यासकांकडून देण्यात आली असून, सरकार या साऱ्या तक्रारींचे गांभीर्याने परीक्षण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
000

एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती करा

सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई, दि. 7 आँगस्ट

मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित खात्यांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले.

महाराष्ट्रातील एक पडदा चित्रपटगृह यांची अवस्था दयनिय असून या चित्रपटगृहाबाबत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अथवा अनुदान द्यावे अथवा अन्य मदत करावी या मागणीसाठी विविध संस्था आणि चित्रपटगृह मालक, चालक संघटनेना, कलावंत, चित्रपट निर्माते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना विविध निवेदन दिली होती. त्याबाबत आज मंत्री एँड आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्य विभाग, गोरेगाव फिल्म सिटी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला चित्रपट गृह मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, नगरविकास, गृह, महसूल,. वित्त आणि सांस्कृतिक कार्य विभाग व या क्षेत्रातील तज्ञ यांची संयुक्त समिती गठीत करुन याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात यावा व त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर करण्यात यावा तसेच जी 300 चित्रपट गृहे सुरु आहेत तसेच जी बंद आहेत अशा सर्व एक पडदा चित्रपट गृहांमध्ये मराठी सिनेमा दाखवण्यात येणार असेल तर त्यासाठी काही शासन प्रोत्साहन योजना आणू शकते का? याचा ही विचार या समितीने करावा, अशा सूचना ही मंत्री शेलार यांनी दिल्या.

दरम्यान, गोरेगाव मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाच्या विषयावर ही बैठक घेण्यात आली. अभिनेते सुनील बर्वे आणि गोरेगावचे नागरिक या नाट्यगृहांसाठी आग्रही असून यासाठी स्वाक्षरी मोहीम ही राबविण्यात आली होती. या प्रश्नावर महापालिका अधिकारी आणि संबधीत कलावंत व स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मंत्री शेलार यांनी आढावा घेतला. उपलब्ध जागा तसेच प्रस्तावित इमारतीबाबत कलावंताचे म्हणणे या सगळ्याचा विचार करुन येत्या पंधरा दिवसात संपूर्ण अहवाल सादर करा व लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल या दृष्टीने कार्यवाही करा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
तसेच आज लावणी कलावंताच्या प्रश्नाबाबत ही बैठक घेऊन त्यांच्या समस्या मंत्री शेलार यांनी समजून घेतल्या.

शरद पवार भाजपचे हस्तक:प्रकाश आंबेडकर यांचा आरोप; 15 दिवसांत देशाच्या राजकारणात मोठे बदल होणार असल्याचा दावा

प्रकाश आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले. आमच्याशिवाय या सरकारविरोधा कुणीही लढणार नाही. व्हीव्हीपॅट नसेल तर आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही. व्हीव्हीपॅट असेल तरच निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. पण विरोधक या घडामोडीत कुठेच दिसत नाहीत. त्यांना कुणी विचारतही नाही, असे ते म्हणाले.

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. ते त्यातून केव्हाच बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.प्रकाश आंबेडकर गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, विरोधी पक्षांना लकवा मारला आहे. संपूर्ण जग भारताला घेरण्याच्या भूमिकेत आहे. यामुळे व्यक्ती की देश हा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे सर्वकाही एकट्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाले आहे. देशाला या स्थितीतून बाहेर काढायचे असेल तर नरेंद्र मोदी याच्या पक्षाला सत्तेत येऊ देता कामा नये. मतदार त्यांना बळी पडले, तर देशाचा बळी जाईल. त्यामुळे मतदार शहाणपणाने वागणार की नाही हे त्यांनाच ठरवायचे आहे.

देशाचे नेतृत्व करण्यासाठी पर्याय कोण? यावर विचार करण्याची गरज नाही. आपल्याला केवळ नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षापासून भारताला वाचवायचे आहे. 140 कोटींमधून कुणीही पुढे येऊन देश चालवू शकतो. ही ताकद व हिंमत आपल्यात आहे यावर विश्वास ठेवा. नरेंद्र मोदी निवृत्त झाले तर चांगलेच आहे. त्यांच्यामुळेच देशाला घेरले जात आहे. ते निवृत्त झाले तर देशाला घेरण्याचा प्रयत्न थांबेल.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी शरद पवार हे भाजपचे हस्तक असल्याचाही गंभीर आरोप केला. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत असली तरी शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. ते त्यातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. देश पातळीवर घडामोडी करणारे लोक वेगळे आहेत. तुमच्यापुढे असणारे लोक वेगळे आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यात मोदींना आव्हान देण्याची हिंमत आहे का? या विरोधकांना लकवा मारल्यामुळे ते मोदींना विरोध करू शकत नाहीत. पण 15 दिवस देशाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे, असे आंबेडकर म्हणाले.

नोकरीची पारंपारिक विचारधारा पुढे नेण्यापेक्षा, धाडसी निर्णय घेऊन व्यावसायिक व्हा-सौरभ गाडगीळ

पुणे: व्यावसायिक होण्यासाठी पहिल्यांदा नोकरी करून अनुभव घेणे गरजेचे नाही. आपल्यासमोर विविध संधी आज उपलब्ध आहेत, याचा उपयोग करून आपण थेट व्यवसायामध्ये उतरू शकतो. नोकरी करून पारंपारिक विचारधारा पुढे नेण्यापेक्षा, धाडसी निर्णय घेऊन व्यावसायिक व्हा, असा सल्ला देतानाच तरुणांमध्ये उद्योजक होण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

मएसो सीनियर कॉलेज पुणे, डिक्की नेक्स्टजेन आणि लघु उद्योग भारती यांच्यातर्फे उद्यमी संवाद या मुलाखतपर कार्यक्रमामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. सौरभ गाडगीळ बोलत होते. मएसो प्रशासकीय मंडळ सदस्य सचिन कुलकर्णी, मएसो सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ.पूनम रावत, पोस्टमन युट्यूब चॅनलचे अक्षय बिक्कड, स्टार्टअप इनोव्हेशन सेल समन्वयक प्रा. निलेश यादव यावेळी उपस्थित होते.

डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, काळानुसार व्यवसायात जर बदल घडले नाही तर अनेक मोठ्या कंपन्या आज नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे काळानुसार बदलणे हे व्यवसायामध्येही गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही कोणत्याही क्षणी स्पर्धेच्या बाहेर फेकले जाऊ शकता. त्यामुळे ग्राहकांशी संवाद कायम ठेवणे हे गरजेचे असते. त्यामुळेच आपला व्यवसाय हा काळानुरूप टिकू शकतो आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरू शकतो. आज जवळजवळ २०० वर्षे झाली तरीही पीएनजी ज्वेलर्स हा केवळ मार्केटमध्येच नव्हे तर ग्राहकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे असेही गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.

मराठी उद्योजक कोणत्याही बाबतीत मागे नाही परंतु अनेक वर्षांपासून मराठी माणसांमध्ये तुम्ही नोकरी चांगल्या प्रकारे करू शकता उद्योग करू नका, असा विचार रुजवण्यात आला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर होणे पहिल्यांदा पसंत करतो, परंतु गेल्या काही वर्षांपासून मराठी माणूसही उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे त्यासाठी मराठी तरुणांमध्ये सर्वप्रथम उद्योजक निर्माण करण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे, असेही डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. विद्यार्थीनी श्रुती येवले हिने सूत्रसंचालन केले. पोस्टमन युट्यूब चॅनलचे सर्वेश देशपांडे यांनी डॉ. सौरभ गाडगीळ यांच्याशी मुलाखत पर संवाद साधला.

महावितरण राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ सर्वोत्कृष्ट

नागपूरचे ‘रंगबावरी’ नाट्यकृती द्वितीय

पुणे, दि. ०७ ऑगस्ट २०२५:  नाशिक येथे संपन्न झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘रंगबावरी’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय दर्जेदार व विविध विषयांचा वेध घेत घेणाऱ्या चारही प्रादेशिक विभागाच्या नाट्यकृतींना नाशिककर रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या नाट्यस्पर्धेतील सांघिक, वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.

दोन दिवसीय राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा बुधवारी (दि. ६ ) सायंकाळी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसु) अरविंद भादीकर, मुख्य तपास अधिकारी दत्तात्रय बनसोडे, नाट्यस्पर्धेचे निमंत्रक व मुख्य अभियंता सुंदर लटपटे, मुख्य अभियंते हरिष गजबे (चंद्रपूर), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडुप), पवनकुमार कछोट (छत्रपती संभाजीनगर), नाट्यस्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगीक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. या पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, चंद्रकांत जाडकर,  मीनाक्षी केंढे यांनी काम पाहिले.

सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले, महावितरणच्या कामाचे स्वरूप पाहता नाट्यकर्मी कर्मचाऱ्यांना खूप कमी वेळ मिळतो. तरी देखील अथक परिश्रम घेत नाट्य कलावंतानी अतिशय दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नवऊर्जा देणारी ही नाट्यस्पर्धा आहे असे त्यांनी सांगितले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे व रंगकर्मी संदीप पाचंगे यांनी केले.

या नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाने ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, कोकण प्रादेशिक विभागाने ‘आवर्त’, नागपूर प्रादेशिक विभागाने ‘रंगबावरी’ आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाने ‘केस नं. ९९‘ नाट्यप्रयोग सादर केले. पारितोषिक वितरण सोहळ्याला राज्यभरातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –

सर्वोत्कृष्ट नाटक : प्रथम- डॉक्टर, तुम्ही सुद्धा! (पुणे), द्वितीय- रंगबावरी (नागपूर)

दिग्दर्शन : प्रथम – ज्ञानदेव पडळकर (पुणे), द्वितीय – संध्या चिवंडे (नागपूर)

अभिनय (पुरुष) : प्रथम – विजय जोशी (पुणे), द्वितीय – श्रावण कोळनुरकर (छत्रपती संभाजीनगर)

अभिनय (स्त्री) : प्रथम – रोहिणी ठाकरे(नागपूर), द्वितीय – भक्ति जोशी(पुणे)

नेपथ्य : प्रथम – सतीश सरोदे (पुणे), द्वितीय – राम मेस्त्री (कोकण)

प्रकाशयोजना : प्रथम – अभय येरडे (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय – अभिजीत सिकनिस (कोकण)

संगीत : प्रथम – रुपेश देशमुख (नागपूर), द्वितीय – अनिल राजपूत (छत्रपती संभाजीनगर)

रंगभूषा व वेशभूषा : प्रथम – विकास पुरी (पुणे), द्वितीय – प्रशांत ठाकरे(नागपूर)

उत्तेजनार्थ (अभिनय) : श्रद्धा मुळे (कोकण), सचिन निकम (पुणे), सायली सायनकर (नागपूर) आणि रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले