Home Blog Page 179

बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्या-आनंदराव अडसूळ

पुणे, दि. 7: जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्या, एकही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिले.

व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना, नगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत असेल्या रमाई घरकुल वस्ती योजना, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या, झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाअंतर्गत गृहप्रकल्पाबाबत पात्र व अपात्र नागरिकांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, नगर परिषद जिल्हा प्रशासन अधिकारी व्यकंटेश दुर्वास, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. अडसूळ म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने बेघर नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास घरकुल योजना, झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्प आदी योजना राबविण्यात येत आहेत, याबाबत नगरपालिका क्षेत्रात व्यापक जनजागृती करावी. या विविध योजनांच्या माध्यमातून बेघर नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्याकरिता नगरपरिषदेने सर्वेक्षण करावे, जागा मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावे, अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनांकरिता दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे निधी खर्च करावा. रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मागणीबाबतचे प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे.

सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाअंतर्गत गृहप्रकल्पाबाबत नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात. शासनाच्या निर्देशाप्रमाणे अनुकंपा तत्वावर पात्र कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात यावी. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, पदोन्नतीच्या अनुषंगाने प्रलंबित विषय मार्गी लावून त्यांना न्याय देण्याची भुमिका ठेवावी, असेही श्री. अडसूळ म्हणाले.

जिल्ह्यात तळेगाव दाभाडे नगरपालिकांने महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने उत्तम काम केले असून इतरांनी एक मॉडेल स्वरुपात स्वीकारले पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने निर्देश दिले.

यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

हिंदुजा समूहातर्फे आनंद आगरवाल यांची ग्रुप प्रेसिडेंट – फायनान्स म्हणून नियुक्ती

मुंबई ऑगस्ट २०२५ : हिंदुजा ग्रुपने आनंद आगरवाल यांची ग्रुप प्रेसिडेंट – फायनान्स या पदावर नियुक्ती केली आहे. जवळपास तीन दशकांचा व्यावसायिक अनुभव असलेल्या आगरवाल यांनी कृषीविषयक उत्पादने, पायाभूत सुविधा (ऊर्जा), एफएमसीजी, वित्तीय सेवा, सिमेंट, धातू आणि बँकिंग पेमेंट सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. कॉर्पोरेट फायनान्स, ट्रेझरी, विलीनीकरण व अधिग्रहण (एम अॅंड ए), भांडवली रणनीती आणि गुंतवणूकदार संबंध या बाबतीत त्यांच्याकडे व्यापक कौशल्य आहे.

या नियुक्तीबाबत माहिती देताना हिंदुजा समूहातील मनुष्यबळ विकास विभागाचे ग्रुप प्रेसिडेंट अमित चिंचोलकर म्हणाले, “आमच्या समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये आता धोरणात्मक विस्ताराचा नवा टप्पा सुरू होत असून, त्यासाठी सक्षम आर्थिक नेतृत्व अत्यावश्यक आहे. कॉर्पोरेट फायनान्स आणि विलीनीकरण-अधिग्रहण या क्षेत्रातील आनंद यांचा सखोल अनुभव, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक धोरणे राबविण्याची सिद्ध क्षमता या आमच्या समूहाच्या वाढीला गती देतील. आमच्या पुढील विकासाच्या टप्प्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

हिंदुजा समूहाचे फायनान्स विभागाचे नववियुक्त ग्रुप प्रेसिडेंट आनंद आगरवाल म्हणाले, “हिंदुजा समूहाच्या सातत्याने होत असलेल्या प्रगतीमध्ये आपण योगदान देण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. आर्थिक बांधणी अधिक बळकट करणे आणि समूहातील विविध धोरणात्मक उपक्रमांना पाठबळ देणे, यावर माझा भर राहील. आर्थिक कार्यक्षमता वाढवणे, भांडवली वापर अधिक प्रभावी बनवणे आणि समूहाच्या विस्तार योजनांना गती देणे या प्रमुख गोष्टी माझ्या कामकाजाच्या केंद्रस्थानी असतील.”

आगरवाल यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रायव्हेट इक्विटी फंड्स, निवृत्तीवेतन निधी संस्था (पेंशन फंड्स) आणि सार्वभौम संपत्ती निधी (सॉव्हरिन वेल्थ फंड्स) यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर इक्विटी निधी उभारण्यात यश मिळवले आहे. तसेच त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अनेक उच्च मूल्य असलेल्या विलीनीकरण व अधिग्रहण (एम अॅंड ए) व्यवहारांचे नेतृत्व केले आहे. हिंदुजा समूहामध्ये रुजू होण्यापूर्वी आगरवाल हे चंबळ फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड केमिकल्स या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी टाटा पॉवर, पीपल कॅपिटल पीई, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी लिमिटेड या नामांकित संस्थांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.

आगरवाल चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, आयसीडब्ल्यूए आणि सीएफए ही सर्व व्यावसायिक अर्हता धारण करतात. तसेच त्यांनी आयआयएम, अहमदाबाद येथून एक्झिक्युटिव्ह एमबीए हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे– राज्य सरकारची केंद्र सरकारला विनंती

मुंबई, दि. ६ : “इतिहासाचे विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” असे ठाम प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशीष शेलार यांनी आज येथे केले. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनाने या चित्रपटाचे तातडीने पुनर्परीक्षण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

काल शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संघटक निलेश भिसे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांची भेट घेऊन चित्रपटाविरोधातील तक्रार व निवेदन सादर केले. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून जनभावना दुखावणारे दृश्य आणि संवाद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. या चित्रपटाच्या पुनर्परीक्षणाबाबत केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. गरज पडल्यास संबंधित केंद्रीय मंत्री व अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारला या चित्रपटाविरोधात मोठ्या प्रमाणावर निवेदने व तक्रारी प्राप्त झाल्या असून, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीची व विकृत माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटातील अनेक संवादांवर इतिहास अभ्यासक व शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव यांना पत्र पाठवून त्यात चित्रपटाचे पुनर्परीक्षण, दिलेल्या प्रमाणपत्राचा पुनर्विचार आणि पुनर्परीक्षण होईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अशी विनंती केली आहे.

मंत्री ॲड.शेलार पुढे म्हणाले की, या चित्रपटाला केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र कसे मिळाले? परीक्षण समितीने चित्रपटाचा योग्य अभ्यास केला होता का? यासंदर्भात चौकशी व्हावी. तसेच हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवासाठी कसा निवडला गेला, यामध्येही कोणताही खोडसाळपणा झाला आहे का, हे तपासले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी निवेदने अनेक संस्था, संघटना व इतिहास अभ्यासकांकडून देण्यात आली असून, सरकार या साऱ्या तक्रारींचे गांभीर्याने परीक्षण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
000

एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती करा

सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई, दि. 7 आँगस्ट

मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित खात्यांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले.

महाराष्ट्रातील एक पडदा चित्रपटगृह यांची अवस्था दयनिय असून या चित्रपटगृहाबाबत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अथवा अनुदान द्यावे अथवा अन्य मदत करावी या मागणीसाठी विविध संस्था आणि चित्रपटगृह मालक, चालक संघटनेना, कलावंत, चित्रपट निर्माते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना विविध निवेदन दिली होती. त्याबाबत आज मंत्री एँड आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्य विभाग, गोरेगाव फिल्म सिटी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला चित्रपट गृह मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, नगरविकास, गृह, महसूल,. वित्त आणि सांस्कृतिक कार्य विभाग व या क्षेत्रातील तज्ञ यांची संयुक्त समिती गठीत करुन याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात यावा व त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर करण्यात यावा तसेच जी 300 चित्रपट गृहे सुरु आहेत तसेच जी बंद आहेत अशा सर्व एक पडदा चित्रपट गृहांमध्ये मराठी सिनेमा दाखवण्यात येणार असेल तर त्यासाठी काही शासन प्रोत्साहन योजना आणू शकते का? याचा ही विचार या समितीने करावा, अशा सूचना ही मंत्री शेलार यांनी दिल्या.

दरम्यान, गोरेगाव मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाच्या विषयावर ही बैठक घेण्यात आली. अभिनेते सुनील बर्वे आणि गोरेगावचे नागरिक या नाट्यगृहांसाठी आग्रही असून यासाठी स्वाक्षरी मोहीम ही राबविण्यात आली होती. या प्रश्नावर महापालिका अधिकारी आणि संबधीत कलावंत व स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मंत्री शेलार यांनी आढावा घेतला. उपलब्ध जागा तसेच प्रस्तावित इमारतीबाबत कलावंताचे म्हणणे या सगळ्याचा विचार करुन येत्या पंधरा दिवसात संपूर्ण अहवाल सादर करा व लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल या दृष्टीने कार्यवाही करा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
तसेच आज लावणी कलावंताच्या प्रश्नाबाबत ही बैठक घेऊन त्यांच्या समस्या मंत्री शेलार यांनी समजून घेतल्या.

शरद पवार भाजपचे हस्तक:प्रकाश आंबेडकर यांचा आरोप; 15 दिवसांत देशाच्या राजकारणात मोठे बदल होणार असल्याचा दावा

प्रकाश आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले. आमच्याशिवाय या सरकारविरोधा कुणीही लढणार नाही. व्हीव्हीपॅट नसेल तर आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही. व्हीव्हीपॅट असेल तरच निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. पण विरोधक या घडामोडीत कुठेच दिसत नाहीत. त्यांना कुणी विचारतही नाही, असे ते म्हणाले.

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. ते त्यातून केव्हाच बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.प्रकाश आंबेडकर गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, विरोधी पक्षांना लकवा मारला आहे. संपूर्ण जग भारताला घेरण्याच्या भूमिकेत आहे. यामुळे व्यक्ती की देश हा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे सर्वकाही एकट्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाले आहे. देशाला या स्थितीतून बाहेर काढायचे असेल तर नरेंद्र मोदी याच्या पक्षाला सत्तेत येऊ देता कामा नये. मतदार त्यांना बळी पडले, तर देशाचा बळी जाईल. त्यामुळे मतदार शहाणपणाने वागणार की नाही हे त्यांनाच ठरवायचे आहे.

देशाचे नेतृत्व करण्यासाठी पर्याय कोण? यावर विचार करण्याची गरज नाही. आपल्याला केवळ नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षापासून भारताला वाचवायचे आहे. 140 कोटींमधून कुणीही पुढे येऊन देश चालवू शकतो. ही ताकद व हिंमत आपल्यात आहे यावर विश्वास ठेवा. नरेंद्र मोदी निवृत्त झाले तर चांगलेच आहे. त्यांच्यामुळेच देशाला घेरले जात आहे. ते निवृत्त झाले तर देशाला घेरण्याचा प्रयत्न थांबेल.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी शरद पवार हे भाजपचे हस्तक असल्याचाही गंभीर आरोप केला. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत असली तरी शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. ते त्यातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. देश पातळीवर घडामोडी करणारे लोक वेगळे आहेत. तुमच्यापुढे असणारे लोक वेगळे आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यात मोदींना आव्हान देण्याची हिंमत आहे का? या विरोधकांना लकवा मारल्यामुळे ते मोदींना विरोध करू शकत नाहीत. पण 15 दिवस देशाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे, असे आंबेडकर म्हणाले.

नोकरीची पारंपारिक विचारधारा पुढे नेण्यापेक्षा, धाडसी निर्णय घेऊन व्यावसायिक व्हा-सौरभ गाडगीळ

पुणे: व्यावसायिक होण्यासाठी पहिल्यांदा नोकरी करून अनुभव घेणे गरजेचे नाही. आपल्यासमोर विविध संधी आज उपलब्ध आहेत, याचा उपयोग करून आपण थेट व्यवसायामध्ये उतरू शकतो. नोकरी करून पारंपारिक विचारधारा पुढे नेण्यापेक्षा, धाडसी निर्णय घेऊन व्यावसायिक व्हा, असा सल्ला देतानाच तरुणांमध्ये उद्योजक होण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

मएसो सीनियर कॉलेज पुणे, डिक्की नेक्स्टजेन आणि लघु उद्योग भारती यांच्यातर्फे उद्यमी संवाद या मुलाखतपर कार्यक्रमामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. सौरभ गाडगीळ बोलत होते. मएसो प्रशासकीय मंडळ सदस्य सचिन कुलकर्णी, मएसो सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ.पूनम रावत, पोस्टमन युट्यूब चॅनलचे अक्षय बिक्कड, स्टार्टअप इनोव्हेशन सेल समन्वयक प्रा. निलेश यादव यावेळी उपस्थित होते.

डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, काळानुसार व्यवसायात जर बदल घडले नाही तर अनेक मोठ्या कंपन्या आज नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे काळानुसार बदलणे हे व्यवसायामध्येही गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही कोणत्याही क्षणी स्पर्धेच्या बाहेर फेकले जाऊ शकता. त्यामुळे ग्राहकांशी संवाद कायम ठेवणे हे गरजेचे असते. त्यामुळेच आपला व्यवसाय हा काळानुरूप टिकू शकतो आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरू शकतो. आज जवळजवळ २०० वर्षे झाली तरीही पीएनजी ज्वेलर्स हा केवळ मार्केटमध्येच नव्हे तर ग्राहकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे असेही गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.

मराठी उद्योजक कोणत्याही बाबतीत मागे नाही परंतु अनेक वर्षांपासून मराठी माणसांमध्ये तुम्ही नोकरी चांगल्या प्रकारे करू शकता उद्योग करू नका, असा विचार रुजवण्यात आला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर होणे पहिल्यांदा पसंत करतो, परंतु गेल्या काही वर्षांपासून मराठी माणूसही उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे त्यासाठी मराठी तरुणांमध्ये सर्वप्रथम उद्योजक निर्माण करण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे, असेही डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. विद्यार्थीनी श्रुती येवले हिने सूत्रसंचालन केले. पोस्टमन युट्यूब चॅनलचे सर्वेश देशपांडे यांनी डॉ. सौरभ गाडगीळ यांच्याशी मुलाखत पर संवाद साधला.

महावितरण राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ सर्वोत्कृष्ट

नागपूरचे ‘रंगबावरी’ नाट्यकृती द्वितीय

पुणे, दि. ०७ ऑगस्ट २०२५:  नाशिक येथे संपन्न झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘रंगबावरी’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय दर्जेदार व विविध विषयांचा वेध घेत घेणाऱ्या चारही प्रादेशिक विभागाच्या नाट्यकृतींना नाशिककर रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या नाट्यस्पर्धेतील सांघिक, वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.

दोन दिवसीय राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा बुधवारी (दि. ६ ) सायंकाळी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसु) अरविंद भादीकर, मुख्य तपास अधिकारी दत्तात्रय बनसोडे, नाट्यस्पर्धेचे निमंत्रक व मुख्य अभियंता सुंदर लटपटे, मुख्य अभियंते हरिष गजबे (चंद्रपूर), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडुप), पवनकुमार कछोट (छत्रपती संभाजीनगर), नाट्यस्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगीक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. या पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, चंद्रकांत जाडकर,  मीनाक्षी केंढे यांनी काम पाहिले.

सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले, महावितरणच्या कामाचे स्वरूप पाहता नाट्यकर्मी कर्मचाऱ्यांना खूप कमी वेळ मिळतो. तरी देखील अथक परिश्रम घेत नाट्य कलावंतानी अतिशय दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नवऊर्जा देणारी ही नाट्यस्पर्धा आहे असे त्यांनी सांगितले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे व रंगकर्मी संदीप पाचंगे यांनी केले.

या नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाने ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, कोकण प्रादेशिक विभागाने ‘आवर्त’, नागपूर प्रादेशिक विभागाने ‘रंगबावरी’ आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाने ‘केस नं. ९९‘ नाट्यप्रयोग सादर केले. पारितोषिक वितरण सोहळ्याला राज्यभरातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –

सर्वोत्कृष्ट नाटक : प्रथम- डॉक्टर, तुम्ही सुद्धा! (पुणे), द्वितीय- रंगबावरी (नागपूर)

दिग्दर्शन : प्रथम – ज्ञानदेव पडळकर (पुणे), द्वितीय – संध्या चिवंडे (नागपूर)

अभिनय (पुरुष) : प्रथम – विजय जोशी (पुणे), द्वितीय – श्रावण कोळनुरकर (छत्रपती संभाजीनगर)

अभिनय (स्त्री) : प्रथम – रोहिणी ठाकरे(नागपूर), द्वितीय – भक्ति जोशी(पुणे)

नेपथ्य : प्रथम – सतीश सरोदे (पुणे), द्वितीय – राम मेस्त्री (कोकण)

प्रकाशयोजना : प्रथम – अभय येरडे (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय – अभिजीत सिकनिस (कोकण)

संगीत : प्रथम – रुपेश देशमुख (नागपूर), द्वितीय – अनिल राजपूत (छत्रपती संभाजीनगर)

रंगभूषा व वेशभूषा : प्रथम – विकास पुरी (पुणे), द्वितीय – प्रशांत ठाकरे(नागपूर)

उत्तेजनार्थ (अभिनय) : श्रद्धा मुळे (कोकण), सचिन निकम (पुणे), सायली सायनकर (नागपूर) आणि रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले

शिक्षक सक्षमीकरणासाठी ‘साधना फेलोशिप’ उपक्रम

लीडरशिप फॉर इक्विटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स व बजाज फिनसर्वचा संयुक्त उपक्रम

सिद्धेश शर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती; ३० सप्टेंबरपर्यंत फेलोशिपसाठी अर्ज करता येणार

पुणे, ७ ऑगस्ट : शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी पुण्यातील स्वयंसेवी संस्था ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ (एलएफई) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टीआयएसएस) सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साधना फेलोशिप २०२५’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण उपक्रम येत्या सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार असून, शिक्षणात रुची असलेल्या युवकांना प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम शिक्षक घडवण्याचा उद्देश यामागे आहे, अशी माहिती ‘एलएफई’चे सहसंस्थापक सिद्धेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘एलएफई’च्या प्रकल्प व्यवस्थापक काजल पवार, अकॅडमिक लीडर शार्दुली जोशी आदी उपस्थित होते.

सिद्देश शर्मा म्हणाले, “शिक्षणपदवीधारक बेरोजगार उमेदवार तसेच इतर क्षेत्रांतून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना ही नामी संधी उपलब्ध आहे. आठवड्यातून चार दिवस शाळांमध्ये ४०० तासांचे थेट अध्यापन प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यात विषयनिहाय अध्यापन, इंग्रजी संवादकौशल्य, डिजिटल साधनांचा वापर, मुलांशी संवाद आदी गोष्टींचा समावेश आहे. या फेलोशिपचा मुख्य गाभा ‘अनुभवातून शिका’ या संकल्पनेत आहे. प्रत्यक्ष वर्गखोल्यांमध्ये शिकवण्याचा अनुभव देत फेलोंना अनुभवी मार्गदर्शकांच्या सहाय्याने तयार केले जाणार आहे. फेलोशिपच्या कालावधीत दरमहा ५,००० रुपये मानधनही दिले जाईल. यशस्वी फेलोंना ‘टीआयएसएस’ आणि ‘एलएफई’ यांच्याकडून संयुक्त प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच ‘एलएफई’च्या नेटवर्कद्वारे रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.”

काजल पवार म्हणाल्या, “सक्षम शिक्षक घडवणे म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी बीजारोपण करणे आहे. ‘साधना फेलोशिप’मुळे शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेले आत्मविश्वासी आणि सर्जनशील शिक्षक घडवता येतील. या फेलोशिपसाठी बजाज फायनसर्व्ह या प्रमुख उद्योग समूहाचे सहकार्य लाभले आहे. शिक्षणातील दर्जा आणि समावेशकता वाढवण्याच्या दृष्टीने ‘साधना’ उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. ही फेलोशिप केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, तर एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आहे. शिक्षक म्हणून प्रत्येक फेलोला एक प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात येथे करता येईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ असून, अधिक माहिती www.LeadershipForEquity.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.”

‘साधना फेलोशिप’ची वैशिष्ट्ये

– इंटर्नशिप व प्रतिमहिना ५००० रुपये मानधन

– हमखास नोकरी मिळण्याची हमी

– ‘टीआयएसएस’ आणि एलएफई’द्वारे प्रमाणपत्र

– तज्ज्ञ मार्गदर्शकांडून प्रोत्साहन व प्रशिक्षण

– ४०० तासांचे अनुभवाधारीत ज्ञान घेता येणार

– स्वतःमधील शिक्षक घडवण्याची संधी

एम सँड व्यावसायिकांना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 7 : राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याबाबत महसूल व वन विभागामार्फत दि .23 मे ,2025 रोजी धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेल्या, महाराष्ट्रात नोंदणी असणाऱ्या प्रथम पुढाकार घेणाऱ्या 50 संस्थांना एम सँड (M-sand) युनिट स्थापन करण्याकरिता उद्योग विभागाच्या व महसूल विभागाच्या सवलती लागू राहतील तसेच दि .17/7/2025 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे .

शंभर टक्के एम सँड उत्पादीत करण्यास इच्छुक असलेल्या व्यावसायिकांनी शासनाकडील महाखनिज या संगणक प्रणालीवर वैयक्तिकरित्या https://mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा महा ई-सेवा केंद्रामार्फत अर्ज करावेत. अर्जासोबत गट नंबर नकाशा, 7/12, आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्ज फी र .रू. 520/-, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचेकडील कंसेंट टू एस्टाब्लिश (Consent to Establish) व कंसेंट टू ऑपरेट (Consent to Operate ) बाबतचे प्रमाणपत्र, ज्या क्षेत्रावर एम सँड युनिट बसविण्यात येणार आहे अशा क्षेत्राबाबत संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून त्याबाबतचा वापर अनुज्ञेय आहे किंवा कसे याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र, आवश्यक त्या ठिकाणी अकृषिक परवानगी आदेश, तसेच उद्योग आधार नोंदणी, जिल्हा उद्योग केंद्र यांची नोंदणी असणारे प्रमाणपत्र व व्यापारी परवाना असणे बंधनकारक आहे.

जिल्हयातील सर्व क्रशरधारक व नव्याने एम सँड उत्पादीत करण्यास इच्छुक असलेल्या व्यावसायिकांनीअर्ज करावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. याबाबत काही अडचणी असल्यास खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेशी संपर्क साधावा.असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

दिवेघाटातील वाहतूक मार्गात बदल

पुणे-

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग अंतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 चे रस्ता रुंदीकरण करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालया मार्फत सुरु आहे. पालखी मार्ग रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये ब्लास्टींगचे काम करणे गरजेचे असल्याने खडक ब्लास्टींगचे काम पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणामध्ये सुरु आहे.
पोलीस यंत्रणेच्या परवानगीनुसार ज्या दिवशी ब्लास्टींग करण्यात येईल त्या दिवशी दिवेघाटातील वाहतूक सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असून दिवेघाटातून (दोन्ही बाजूने) प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी या दिवशी पर्यायी वाहतूक मार्गावरून वाहतूक करावी.
कात्रज बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. 131) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. 119) मार्गे सासवड त्याच प्रमाणे हडपसर-उरळी कांचन शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. 61) सासवड अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे, आवाहन एस एस कदम, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा

निवडणूका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा- दिनेश वाघमारे

पुणे, दि. ७: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध इलेक्टॉनिक मतदान यंत्र आदींबाबत सूक्ष्मरितीने पूर्वनियोजन करा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक पूर्व तयारी संदर्भात श्री. वाघमारे यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

श्री. वाघमारे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ६५० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूका होणार आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निवडणूका होत असल्याने सर्वांची जबाबदारी मोठी आहे. निवडणुकीची पूर्वतयारी करतांना मतदार यादी, मतदान केंद्र, मतदान यंत्रे आणि मतदार जनजागृती या चार बाबींवर विशेष लक्ष द्यावे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. प्रभागनिहाय व केंद्रनिहाय मतदार यादीचे काळजीपूर्वक विभाजन करावे. मतदार यादी अचूक असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मदत होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार असली तरी मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या निकषाद्वारे मतदान केंद्रांचे एकत्रिकरण करता येईल. सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी.

प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार मतदान यंत्रांची मागणी नोंदवावी. राज्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मिळण्याबाबत करार केला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध करुन दिली जातील.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे, त्यासाठी भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच प्राप्त होईल. मात्र, त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपलब्धता, संभाव्य मतदान केंद्रे आणि तेथील सोईसुविधांची उपलब्धता यांचाही आढावा घ्यावा, असे श्री. वाघमारे म्हणाले. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

श्री. काकाणी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करुन ती निवडणुकांसाठी सज्ज करण्यात यावीत. त्याचबरोबर मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळीच करण्यात याव्यात. मतदान केंद्रांच्या जुजबी दुरुस्त्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरावा. मतदान केंद्राची जागा निश्चिती, मतदान केंद्र इमारतींची स्थिती, तेथील सर्व सोयीसुविधांबाबत आतापासूनच तयारी करावी; तसेच मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार वेळीच मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्यांनी विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सन २०११ च्या जनगणनेनुसार त्यावेळची लोकसंख्या, आताची संभाव्य लोकसंख्या, मागील निवडणूकीवेळी असणारे मतदान केंद्रे, संभाव्य मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, मतदार यादी विभाजनाचे नियोजन आदींबाबतची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यापूर्वी मॉक पोल घ्यावा, तसेच खाजगी जागेतील मतदान केंद्रांच्या याद्यांना पूर्वप्रसिद्धी द्यावी अशा सूचनाही डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली तर महापालिका आयुक्तांनी तेथील महानगरपालिका निवडणूक पूर्वतयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कटिबद्ध -रूपाली चाकणकर

पुणे, दि.७ : महिलांना सुरक्षितता देण्यासाठी असलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) २०१३ या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पर्यायाने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्हीके पॉश ऍडव्हायझरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यशाळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, उपसचिव डॉ पद्मश्री बैनाडे, महिला बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, कामगार कल्याण विभागाचे सह संचालक श्री गिरी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, यशस्वी संस्थेचे विश्वेश कुलकर्णी, अमृता करमरकर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या,
महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्यासह त्यांच्यामध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आस्थापन प्रशासनाची आहे. महिलांनी अत्याचाराविरुद्ध न घाबरता पुढे येऊन अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करावी. अंतर्गत तक्रार निवारण समितीने सामाजिक जबाबदारी बाळगत महिलांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कायद्याला अभिप्रेत असलेली प्रक्रिया राबवित न्याय मिळवून द्यावा.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) २०१३ कायद्याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तथापि अद्यापही विविध आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. या कार्यशाळेतील माहितीचा विविध आस्थापनामध्ये निश्चित उपयोग होईल अशा विश्वास त्यांनी व्यकत केला.

राज्यात सुमारे ३१ टक्के महिला विविध आस्थापनांमध्ये काम करीत आहेत. महिलांकरिता असलेल्या कायद्याविषयी समितीने माहिती देण्यासोबतच त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याचेही काम करावे, महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी न्याय देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून समितीने काम करावे, याकामी महिला आयोगाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल.

दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या खासगी आस्थापनाच्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी, तक्रारीची चौकशी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या कामकाजाचा वारंवार आढावा घेतला जातो, आगामी काळात या समितीच्या कामकाजाचे परीक्षण करण्याच्याअनुषंगाने आयोगाच्यावतीने राज्यशासनाकडे शिफारस करण्यात आली आहे, असेही श्रीमती चाकणकर म्हणाल्या.

आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद करताना सांगितले, पुणे जिल्ह्यासह पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले आहे, यामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाची भर पडली आहे, त्यामुळे याठिकाणी विविध खासगी आस्थापना, सेवाक्षेत्रात महिला कर्मचारी काम करतात, या महिलांना सुरक्षितता पुरविण्याच्यादृष्टीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) २०१३ कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता अशा स्वरुपाची कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे. महिलाच्या सुरक्षिततेसोबत सदृढ मनाच्या समाजाची निर्मितीकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन श्रीमती आवडे यांनी केली.

या कार्यशाळेत यशस्वी समुहाच्या अमृता करमरकर यांनी कायद्याच्या अनुषंगाने सर्व आस्थापनांना त्यांची भूमिका, जबाबदारीबाबत अवगत केले. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ ऐश्वर्या यादव यांनी न्यायालयीन प्रकरणे आणि निकालाबाबत मार्गदर्शन केले. विविध कंपन्यांचे उद्योग तज्ज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

खेवलकरच्या मोबाईलमध्ये मुलींचे शेकडो नग्न व्हिडीओ, मोलकरणीचेही… चाकणकरांची माहिती

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलवकर यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. प्रांजल खेवलकर हे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत.
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांना धाड टाकली होती. त्यावेळी तिथे दोन महिला देखील आढळल्या होत्या. आता याच मुद्द्यावरुन रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जातोय. यासाठी प्रांजल खेवलकर यांचा मोबाईलदेखील पोलिसांकडून तपासण्यात आला आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांनी अतिशय खळबळजनक आरोप केले आहेत.

“रुपाली चाकणकर यांनी यावेळी पोलिसांचं पत्र वाचून दाखवलं. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर, निखिल पोपटानी, समीर फकीर, मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद मोहम्मद यादव यांच्यासोबत असलेल्या दोन महिला यांना पुणे येथून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे असलेलं 42 लाख 35 हजार 400 रुपये किंमतीचं कोकेन, गांजा, 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉट, दारुच्या बाटल्या अशा इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.”

“यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता, त्यामध्ये सायबर तज्ज्ञांच्या माहितीने, तांत्रिक विश्लेषणाने तपासणी केली असता, या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रिनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडीओ, तसेच महिलांचे नग्र आणि अर्धनग्रन फोटो तसेच काही अशोभणीय कृत्याचे व्हिडीओ हाती लागले. या मोबाईलमध्ये जे व्हाट्सअॅप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या. या मुलींची नावे आरोष या नावाने सेव्ह केलेली होती. म्हणजेच आरोष या नावाची व्यक्ती मुलींची मानवी तस्करी करत होती. या चॅटवरुन आरुष याने मुलींना पार्टीकरता लोणावळा आणि पुणे येथे बोलावल्याची माहिती समोर आली.”

“पोलिसांनी छापा टाकण्याआधी दोन दिवसांपूर्वी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यत दारु आणि हुक्का पार्टी चालू होती. त्यावेळेसही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलावलेल्या होत्या. प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केलं असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधला आहे. या मुलींना चित्रपटात काम देतो असं आश्वासन देवून बोलावलं. त्यांचा वापर करुन घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नाहीत. यामुळे या मुलींनी वारंवार पैशांची मागणी केल्याचंदेखील दिसून आलं आहे.”

“प्रांजल खेलवकर याने खराडीतील, गोवा, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणच्या हॉटेलमध्ये मुलींना बोलावून अशा प्रकारच्या पार्टी केलेल्या आहेत. या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ आहेत. या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते. काही मध्यस्थांमार्फत खेवलकर याने संपर्क करुन मुली पार्टीसाठी पाठवल्याचंदेखील चॅटमध्ये समोर येत आहे.”

“यामध्ये मोठ्या प्रमाणित अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून यामध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी, तसेच या पार्टीत ज्या मुली उपस्थित होत्या त्या दोन वर्षांपासून संपर्कात होत्या. त्यामुळे या पार्टीत गांजा, अंमली पदार्थ घेऊन येण्याची त्यांना पूर्वकल्पना होती. त्याअनुषंगाने चॅटिंग झाल्याचं समोर आलं आहे.”
मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडीओ, 1497 फोटो

“यापुढची माहिती म्हणजे, काही शब्दांचा उल्लेख करणं संकोच वाटत आहे. या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडीओ सापडले. त्यामध्ये 1497 फोटो, असे एकूण 1779 फोटो-व्हिडीओ आहेत. यामध्ये पार्टीचे, तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील, अशालाघ्य, मुलींचे नग्न फोटो या व्हिडीओत आहेत.”

“मुलींना विवस्त्र करुन, त्यांना नशा देवून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्यांचे व्हिडीओ काढण्यात आले आहेत. या व्हिडीओचा वापर त्यांना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आला आहे. इतकंच काय अगदी घरातील साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेतील फोटो यामध्ये आहेत. बऱ्याचशा विषय असा आहे की, मी सांगण्यापेक्षा ते समोर येतील. मी त्याबाबत बोलू शकत नाही. या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर याने आरुष नावाचा माणूस ठेवला होता, असा गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे.”

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांच्याभूसंपादनासंदर्भात हिंजवडीतील शेतकऱ्यांशी चर्चा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्त यांचा पुढाकार; समन्वयातूनच भूसंपादन प्रक्रिया राबवणार

पिंपरी (दि.७) : हिंजवडी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या माध्यमातून विविध उपाय योजनांवर भर दिल्या जात आहे. या भागात नवीन रस्त्यांची आखणी करण्यात येत असून यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हिंजवडी भागातील शेतकऱ्यांशी औंध कार्यालयात संवाद साधला.

भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच निर्णय घेण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, त्यांचे हक्क आणि अधिकारांचा प्रथम विचार करून भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली तर त्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला शासनाकडून मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावित नवीन रस्त्यांच्या आखणीमुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर होणार असून नागरी समस्या सुद्धा निकाली निघणार आहे.

प्रस्तावित रस्त्याच्या आखणीसंदर्भात भूसंपादन प्रक्रिया राबवताना थेट खरेदी, संमतीने खरेदी, टीडीआर आणि इन्सेटिव्ह एफएसआय आदीबाबत शेतकऱ्यांना पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रस्तावित रस्त्याच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया आणि मोबदल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यासह शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.

शेतकऱ्यांना जाहीर आवाहन
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील प्रस्तावित रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बाधित शेतकऱ्यांना टीडीआर (TDR) देणार असल्याचे आवाहन महानगर आयुक्त यांनी लेखी पत्राद्वारे केले आहे. यामध्ये पांडवनगर ते माण गावठाण ते फेस ३ (टी जंक्शन), लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मेझानाईन ते लक्ष्मी चौक, लक्ष्मी चौक ते मारुंजी, शिंदे वस्ती ते जगताप चौक (कासारसाई रोड), मधुबन हॉटेल (PMC हद्द) ते शिवाजी चौक या प्रस्तावित रस्त्यांचा यात समावेश असून संबंधित शेतकऱ्यांनी याचा लाभ घेता येणार आहे.

आंतरजातीय विवाह पद्धती समाजात अपेक्षित बदल घडवतील-श्रीकांत शिरोळे


पुणे :- ” सध्या जाती-धर्मातील निर्माण करणे अस्थिरता माजवणे हे राजकीय षडयंत्र सुरू असताना आंतरजातीय विवाह करणाऱ्या दापत्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करणे म्हणजे, जातीधर्मातील सलोखा ठेवून समाजातील अपेक्षित बदल घडवणारा असेल” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शिरोळे यांनी व्यक्त केले.
गोखलेनगर येथील पाच-पांडव सभागृह सभागृह येथे अखिल जनवाडी मंडळाने आयोजित केलेल्या जातीअंतासाठी करू काही या विषयावर डॉक्टर आनंद करंदीकर यांचे कविता वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. “ते पुढे म्हणाले आपला देश 18 पगड जातीत विभागला गेला आहे विविध मध्ये एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे कुठलाही कारभार करताना सर्वांना एकत्र घेऊनच काम करावे लागणार आहे”
याप्रसंगी आंतरजातीय विवाह करणाऱ्या 50 दापत्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला गणेशोत्सवात काळात रोज काही दापत्यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते श्रींची आरती व सत्कार सोहळ्याचे नियोजन करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष उमेश वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सांगितले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास काळे,जयंत दौंडकर,जयश्री काळे, आदित्य माळवे, मधुरा निम्हण, मधुकर पवार आदी उपस्थित होते.
लाल बहादूर मंडळाचे आकाश धोत्रे यांनी सूत्रसंचालन तर जागृती सेवा संस्थेच्या मंगला पाटील यांनी सर्वांच्या आभार मानले.