Home Blog Page 165

पुणे: लोणावळा लोकलसाठी तिसऱ्या,चौथ्या मार्गिकेला मंजुरी

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागणी आणि पाठपुराव्याला यश
  • ⁠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत निर्णय

पुणे : पुणे-लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्यांची कनेक्टिव्हिटी वाढावी आणि या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा, यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीगेसाठी सुरू असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात असलेली मागणी आता पूर्णत्वास जात आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. केंद्र सरकारने या प्रकल्पाला आधीच सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याला मंजुरी दिल्याने पुणेकरांसाठी ही मोठी भेट असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार समान करणार असून यासंदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. तसेच पाठपुरावाही केला होता. आता राज्य सरकारच्या मंजुरीमुळे या दोन्ही मार्गीकांचा मार्ग मोकळा झाला असून यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या ११ वर्षांत रेल्वेचे आधुनिकीकरण आणि मार्गांचा विस्तार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारले असून आवश्यक तेथे मार्गिकांची संख्याही वाढवली जात आहे. अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात अशा कामांनी आणखी वेग आलेला आहे. पुणे-लोणावळ्यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून तिसरी आणि चौथी मार्गीका झाल्यास यादरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे’.

‘या दोन मार्गिकांमुळे रेल्वे गाड्यांची संख्याही वाढणार असून मालगाड्यांमुळे होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच एक्सप्रेस गाड्यांचा वेगदेखील वाढणार आहे. याचा फायदा औद्योगिक, व्यावसायिक, नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे, असेही सांगत मोहोळ यांनी या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद केले असूम या प्रकल्पाची पुढील प्रक्रियाही वेगाने होईल आणि सदर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

आपत्कालीन परिस्थितीचा सामना
करण्यासाठी पीएमआरडीए तत्पर

पिंपरी : गेल्या दोन दिवसापासून पुणे शहरासह जिल्हाभरात दमदार पाऊस होत असल्याने या पावसामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढत आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून नदीलगतच्या नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

हवामान खात्याने पुणे शहरासह जिल्हात रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून नदीलगतच्या नागरी वस्तीतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी नदीकाठ किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, घरातील आवश्यक कागदपत्रे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व जनावरांची योग्य ती खबरदारी घ्यावी यासह प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी पीएमआरडीए आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल तत्पर आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक
पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) 9545282930
वाघोली अग्निशमन केंद्र -02029518101
मारुंजी अग्निशमन केंद्र -02067992101
नांदेडसिटी अग्निशमन केंद्र -0206752001/2

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) सायंकाळी करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून बुधवारी लोकार्पण झाल्यानंतर रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात येईल. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित रु.२७७ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून गणेशखिंड रस्त्याचे पुणे विद्यापीठ ते भारतीय कृषी महाविद्यालय (RBI) या लांबीमध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार ४५ मी. पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध – शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांग‍ितले.

ऑगस्ट २०२२ पासून कामाला सुरुवात
या उड्डाणपुलाच्या आराखड्यास प्राधिकरण सभा, कार्यकारी समिती, पुणे महानगरपालिका व पुणे एकीकृत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास ऑगस्ट २०२२ पासून प्रारंभ करण्यात आला होता. या कामासाठी शासनाने २६/०५/२०२० रोजीच्या पत्रान्वये मेट्रो सवलतकार कंपनी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे दरम्यान स्वाक्षांकित करावयाच्या पूरक सवलत करारनामाच्या मसुद्यास मान्यता दिली होती. तत्पूर्वी, अस्तित्वातील दोन एकेरी वाहतुकीचे उड्डाणपूल ऑगस्ट २०२० मध्ये शासनाच्या मान्यतेने पाडण्यात आले होते. यानंतर संबंध‍ित उड्डाणपुलाचे काम सुरु केले होते. मुख्य विद्यापीठ चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी ५५ मी. लांब स्टील गर्डर बसवण्यात आला आहे.

मेट्रो प्रकल्प
माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ या २३.२०३ किमी उन्नत मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर असून आजपर्यंत ८८. ५१ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्थानक क्र. १९ चे बांधकाम विद्यापीठ चौक येथे प्रगतीपथावर असून मेट्रो स्थानक व औंध, बाणेर आणि पाषाण या तिन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी मेट्रो जिना प्रस्तावित केला आहे.

वैशिष्ट्ये
✅ एकूण १.७ किमी लांबी
✅ औंध ते शिवाजीनगर १.३० किमी लांबी
✅ ३ लेन रोड
✅ ९.५ मीटर रुंदी
✅ दोन खांबामधील अंतर २८ मीटर
✅ प्रकल्पाची किंमत रु. २७७ कोटी

गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे दि.19 :- यंदाचा गणेशोत्सव हा शासनाने राज्योत्सव म्हणून जाहिर केले आहे पूर्वीपासून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिध्द आहे. यावर्षी सुध्दा गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे आणि मोठ्या उत्सहात साजरा व्हावा यासाठी प्रशासन, महानगरपालिका, पोलिस विभाग व सर्व गणेशमंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
शहरातील गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा या दृष्टीने शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठकीचे आज बाल गंधर्व रंग मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलिस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त् मनोज पाटील, शहरातील गणपती मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला गणपती मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या यानंतर बोलतांना पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार म्हणाले की, शासनाने यावेळी गणेशोत्सवास राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे. पूर्वीपासूनच आपल्या शहरातील गणेशोत्सव खूप प्रसिध्द आहे त्यामुळेच आपल्या शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने, शांततेत व निर्विघ्नपणे तसेच निर्भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शहरातील गणपती मंडळांनी कोणतेही वाद विवाद घडतील असे देखावे करू नयेत. पाऊस सुरू आहे त्यामुळे वीजेची कामे करतांना काळजी घ्यावी. मंडळांनी आपल्या मंडळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. आपातकालीन घडना घडू नयेत यासाठी सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी. पोलिस विभागाकडून वाहतूकीसंदर्भात, गर्दीच्या नियोजनाबाबत योग्य दक्षता घेण्यात येत आहे.
गणपती मंडळांनी विर्सजन मिरवणूकीबाबत व इतर काही मांडलेल्या अडचणीबाबत लोकप्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशासन आणि पोलिस विभाग गणपती मंडळांच्या मदतीसाठी सदैव सोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, आपल्या जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव खूप उत्सहाने व मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावेळी गणेशोत्सवाला शासनाने राज्योत्सव म्हणून जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने गणेशोत्सवामध्ये शासनामार्फत विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्व मंडळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा. आपल्या शहरातील गणेशोत्सव आपल्या शहरापुरता मर्यादित न रहाता त्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्सव साजरा करतांना मंडळांना सुरळीत वीज पुरवठा, वाहतूकीबाबतच्या अडचणी तसेच इतर काही अडचणी सोडविण्यासाठी व सोई सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रभाग निहाय गट तयार करण्यात आले असून त्यांच्या मार्फत आपल्या सर्व अडचणी सोडवल्या जातील व गणेशोत्सवात गणेश भक्तांना, नागरिकांना जास्तीत जास्त सोई सुविधा देखील पुरवल्या जातील.
तसेच गणपती मंडळांनी मांडलेल्या अडचणी देखील सोडविण्यात येतील व सूचनांचा देखील विचार करण्यात येईल. गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गणेशोत्सवावेळी महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोई सुविधा विषयक माहिती दिली. तसेच मागील वर्षी देण्यात आलेल्या सोई सुविधा पेक्षा जास्त सोई सुविधा यावर्षी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे इंग्रजांच्या काळापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या गणेशोत्सवामधून सामाजिक बांधिलकी जपली जाते. यावर्षी गणपती मंडळांनी देखावे सादर करताना सामाजिक संदेश असलेले देखावे सादर करावेत. सर्व शासकीय विभागातील अधिकारी देखील गणेशोत्सवात सहभागी होवून आपणाला कोणत्याही सोई सुविधेची कमतरता भासणार नाही यासाठी नियोजनबध्द काम करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले.

सरकारकडून ९० हजार कोटींची थकबाकी वसुलीसाठी कंत्राटदार जाणार न्यायालयात

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे भरपावसात धरणे आंदोलन

पुणे: राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली ९० हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत, यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉटमिक्स असोसिएशन, राज्य मजूर सहकारी संस्था, पुणे काँट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डोक्यावर धो-धो पाऊस कोसळत असतानाही कंत्राटदारांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी दोन तास धरणे आंदोलन केले. पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे ८०० ते ९०० कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘राज्यकर्ते जोमात, कंत्राटदार कोमात’, ‘रुपया नाही तिजोरीत, मंत्री मात्र मुजोरीत’, ‘राज्यशासन कंत्राटदारांना देईना पैका, मंत्री माझ्याच गप्पा ऐका’, ‘भीक नको हक्क हवाय, कंत्राटदारांना न्याय हवाय’, ‘नियोजनशून्य कारभारी, कंत्राटदार झाला भिकारी’ अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध केला.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर, राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव, महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू, पुणे काँट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले, राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेश खैरे, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अमित शिवतारे, राज्य मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार, राज्य हॉटमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. एस. पंजाबी यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्यांचे निवेदन दिले.

अजय गुजर म्हणाले, “राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांची ९० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बिले थकीत आहेत. लाडकी बहीण योजनेला सरकारकडे पैसे आहेत. मात्र, आम्हाला द्यायला पैसे नाहीत. आमच्या हक्काचे पैसे त्या योजनेसाठी वळवण्यात आले आहे. राज्यभरातील कंत्राटदार कंगाल झालेला आहे. त्यामुळे सरकारने कंत्राटदारांना वाचवण्यासाठी त्वरित बिले द्यायला हवीत.”

जगन्नाथ जाधव म्हणाले, “थकीत बिलाच्या कारणावरून काही दिवसांपूर्वीच सांगलीतील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली. मात्र सरकारला अजूनही जाग आलेली नसून, थकीत बिलांवर चकार शब्द काढला जात नाही. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कंत्राटदारांचे पैसे देऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखावे. अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल.”

रवींद्र भोसले म्हणाले, “कंत्राटदारांची राज्य सरकार यमाच्या भूमिकेत दिसत आहे. काम करूनही आमचे पैसे फाईलींमध्ये अडकून पडले आहेत. सर्व कंत्राटदार कर्जबारी झाले आहेत. त्यांची आर्थिक व मानसिक अवस्था बिघडत चालली आहे. शासन आमच्या भावनांशी खेळत आहे. हा खेळ थांबवून पहिल्या टप्प्यात किमान ५० टक्के तरी पैसे द्यावेत.”

सुरेश कडू म्हणाले, “सरकारच्या तिजोरीत पैसे नसतानाही विकासकामांच्या निविदा काढून कंत्राटदारांना कर्जबाजारी करण्याचे काम सुरु आहे. पैसे नसतील तर फसव्या योजना आणू नका, निविदा काढून उसने अवसान आणू नका. कंत्राटदारांची पहिली बाकी द्या आणि मग तुम्हाला ज्या काही नव्याने निविदा काढायच्या त्या काढा. नाहीतर कंत्राटदार देशोधडीला लागेल.”

मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे लोणावळ्याजवळ हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

पुणे -जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या साल्टर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे एका हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अचानक लँडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली, परंतु दोन वैमानिक आणि चार प्रवाशांसह सर्व सहा जण सुरक्षित बचावले.

हेलिकॉप्टर लोणावळ्याकडे जात असताना प्रतिकूल हवामानात ते कोसळण्याच्या धोकादायी स्थितीत पोहोचले आणि सततच्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे, पायलटने पुढे जाणे असुरक्षित असल्याचे ठरवले आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साल्टर गावाजवळील एका मोकळ्या मैदानात सावधगिरीने लँडिंग केले.

महामहोपाध्याय पुरस्कार डॉ.नंदकिशोर कपोते यांना प्रदान.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने प्रतिष्ठेचा व मानाचा “महामहोपाध्याय” पुरस्कार प्रसिद्ध व ज्येष्ठ कथक नर्तक, संगीत नाटक अकादमी अवार्डी डॉ.नंदकिशोर कपोते यांना ज्येष्ठ नर्तिका पद्मविभूषण, खासदार डाॅ. सोनल मानसिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुर्यवंशी, सचिव पं. सुधाकर चव्हाण, रजिस्ट्रार विश्वास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा तेरणा ऑडिटोरियम, नेरुळ, नवी मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. डॉ.नंदकिशोर कपोते यांना या पूर्वी भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मिळाला आहे. तसेच याशिवाय महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार , पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या स्मरणार्थ हा महामहोपाध्याय पुरस्कार अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या दीक्षांत समारोहात देण्यात आला. महामहोपाध्याय पुरस्कार हा कलाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा

मुंबई दि 19 : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरून जाऊ नये.सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्या.

राज्यातील मुंबई, ठाणे ,रायगड रत्नागिरी ,पालघर या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावरील भागावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दर तीन तासाला पावसाबाबत अहवाल सादर केला जात आहे. पावसामुळे जे बाधित लोक आहेत त्यांना सहकार्य  करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

राज्यात पावसाची संततधार सुरू असून १० लाख एकर शेती पाण्याखाली गेली आहे. राज्यातील जी धरणे भरली आहेत त्या ठिकाणी जलसंपदा व शासकीय यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीकाठच्या लोकांना ज्या ठिकाणी धोका पोहोचण्याची शक्यता आहे त्यांना सावध करण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत संदेश पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अलमट्टी धरणाच्या बाबत शेजारील राज्याशी समन्वय ठेवून मदत घेण्यात येत आहे. तसेच त्यांच्यामार्फत सहकार्य दिले जात आहे. महाबळेश्वर येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. बीड, माजलगाव येथील पूरस्थितीची माहिती घेतली असून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम पोहोचल्या असून मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जे नागरिक पाण्यात अडकले होते त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर प्रशासन संपर्क साधून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री, कृषिमंत्री व सर्व पालकमंत्री लक्ष ठेवून आहेत. ज्या ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा ठिकाणी पाऊस कमी झाल्यावर तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्व परिस्थितीवर  यंत्रणा लक्ष ठेवून आहेत,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

आपत्ती व्यवस्थापन कक्षांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशाचे नकाशे, वारे, पाऊस सर्वदूर पसरल्याची माहिती या कक्षामार्फत दिली जात आहे. दर तीन तासाला अपडेट दिले जात आहेत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

यावेळी मुख्य सचिव राजेशकुमार, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धमकी देणाऱ्या कीर्तनकारावर कारवाई करा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या कीर्तनकारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

“आम्ही नथुराम होऊ” अशी भाषा थोरातांना उद्देशून त्या कीर्तनकाराने करणं म्हणजे त्यात थेट महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा गौरव आहेच आणि त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची सरळसरळ धमकी देण्याचा हा प्रकार आहे. ह.भ.प.म्हणवणाऱ्या कीर्तनकाराने जीवे मारण्याच्या धमक्या देणे परंपरेला शोभणारे नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत, भक्ती, समता आणि अहिंसेवर आधारलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या शिकवणुकीतून ही परंपरा उभी राहिली. पण, आज त्याच वारकरी परंपरेत काही विखारी प्रवृत्ती घुसवून द्वेष, हिंसा आणि दहशतीचं विष पेरलं जातंय. अध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या मनात हत्या व दहशतवादाचं समर्थन पेरलं जातंय हे वारकरी परंपरेच्या आत्म्यालाच कलंक लावणारं आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

हिंसा पसरवणाऱ्या, धमक्या देणाऱ्या आणि गांधी हत्येचे समर्थन करणाऱ्या या प्रवृत्तीचे त्वरीत सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर रित्या निर्मुलन झालेच पाहिजे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची भूमी आहे. महाराष्ट्र संत, वारकरी व भक्तीच्या समतेच्या परंपरेचा आहे. नथुरामाचा गौरव करणाऱ्यांना या भूमीत स्थान नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले असून कीर्तनकारावर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा फडणवीस सरकार आणि भाजप अशा प्रवृत्तींचे समर्थन करीत आहेत, असेच समजले जाईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

खडकवासल्यातून 35 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु, मुठा नदी किनारी सावधानतेचा इशारा

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29084
क्युसेक वाढवून सायंकाळी 7.00 वा.35310 क्यूसेक करण्यात आला आहे.

पुणे- आज सकाळपासून दुपार पर्यंत झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत असून पवना नदी बरोबर आता मुठा नदी किनारी देखील सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. सायंकाळी ५ वाजता मुठेत खडकवासल्यातून २९ हजार क्युसेक्स चा विसर्ग सुरुकरण्यात आला आहे. त्यापूर्वी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 24827क्युसेक चा विसर्ग होत होता तो वाढविला गेला आहे.

आज दिनांक-१९/०८/२०२५ रोजी पावसाचे प्रमाण व खडकवासला धरणामध्ये पावसाचे येवा पाहता खडकवासला धरणातून २९०८४ क्युसेक्स वरुन सायंकाळी-०७.०० वाजता ३५५७४ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे.
खालील प्रमाणे तीनही धरणातील सद्यःस्थिती व चालू विसर्ग :

१)वरसगाव-९७.९७% भरले
१२०००विसर्ग (क्युसेक्स)
२)पानशेत ९८.२४%भरले
१२०००विसर्ग (क्युसेक्स)
३)खडकवासला ८६.९९%भरले
२९०८४विसर्ग (क्युसेक्स)
४)पवना ९९.७०%भरले
१२०००विसर्ग (क्युसेक्स)

मुठा नदी
६०,०००इशारा पातळी (विसर्ग क्यू.) आणि १,००,००० क्युसेक्स विसर्ग हि धोका पातळी

अशा पार्श्वभूमीवर हि माहिती योग्य कार्यवाही साठी जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका यांनी मुळा मुठा नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) नागरिकांनी उतरू नये सदर ठिकाणी पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये टप्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य, वाहने अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
तथापि आपले स्तरावरुन संबंधित अधिकारी व विभागांना तात्काळ वार्ता देण्यात यावी व सर्व प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
असे संनियंत्रण अधिकारी मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्षअधिकारी श्वेता यो. कु-हाडे यांनी ,आपत्ती निवारण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,
आपत्ती निवारण कक्ष, पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका, (पवना व मुळशी करिता),विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे ,
पोलीस आयुक्त, आयुक्त कार्यालय (पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर / ग्रामीण), PMRDA मुख्यालय कंट्रोल रुम, पुणे
MSEB मुख्यालय रास्तापेठ, पुणे यांना लेखी कळविले आहे.

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना बोनस मिळणार

इगल या सुरक्षारक्षक कंपनी काळ्या यादीत,पुन्हा त्यांना काम देणार नाही

पुणे l महापालिकेमध्ये सुमारे साडेदहा हजार कंत्राटी कामगार विविध खात्यांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत असून या सर्वांना बोनस ऍक्ट प्रमाणे बोनस मिळावा,पगारी रजा मिळाव्यात,15 ऑगस्ट,26 जानेवारी,1 मे आणि 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या कायद्याप्रमाणे याचा लाभ मिळावा अशा मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या.राष्ट्रीय मजदूर संघाकडून या सर्व कर्मचाऱ्यांना संघटित करून गेली 6 वर्ष वेळो वेळी विविध प्रकारची आंदलने महापालिकेच्या गेटवर करण्यात आलेली होती.परंतु फक्त आश्वासनावरच मनपा अधिकाऱ्यांनी बोळवण करून हे सर्व प्रश्न प्रलंबित ठेवले होते.या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये मागील आठवड्यामध्ये संघटनेतर्फे कंत्राटी कामगारांचा मोर्चा स्वारगेट येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते पुणे महानगरपालिकेच्या गेट पर्यंत काढण्यात आला होता.त्यावेळेला महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना राष्ट्रीय मजदूर संघटनेकडून निवेदन देऊन बैठक आयोजन करण्याबाबत विनंती करण्यात आली होती.त्याप्रमाणे आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी पावणेअकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.या बैठकीसाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिवटे,कामगार सल्लागार नितीन केंजळे,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा नाईक,उद्यान विभागाचे अधिकारी अशोक घोरपडे व इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त गजानन शिंदे हे उपस्थित होते.राष्ट्रीय मजूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष सिताराम चव्हाण,संघटक विशाल बागुल,प्रतिनिधी बाबा कांबळे,विजय पांडव,अरविंद आगम,संदीप पाटोळे, उज्वल साने,लक्ष्मण मासाळ हे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीमध्ये आयुक्तांसमोर कंत्राटी कामगारांना कायदा प्रमाणे बोनस देय असून महापालिका मात्र कंत्राटदारांना बोनसचे पैसे देत नसल्यामुळे कंत्राटदार बोनस देत नाही अशा प्रकारची मागणी संघटनेतर्फे मांडण्यात आली.त्यास सहाय्यक कामगार अधिकारी गजानन शिंदे यांनी कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे बोनस देय असून त्यांना बोनस दिला पाहिजे अशी बाजू मांडली.त्याचबरोबर या सर्व कामगारांना राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या यादेखील कायद्याप्रमाणे देय असून त्याचा कायद्याप्रमाणे लाभ या कंत्राटी कामगारांना दिला गेला पाहिजे व वार्षिक रजा ही पगारी राजा कामगारांना दिल्या पाहिजेत अशी कामगारांची बाजू व सरकारची कामगार विभागाची बाजू या बैठकीत मांडली.

त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे निर्णय झाले.यावर्षीपासून दिवाळीपूर्वीया सर्व कामगारांना पगाराच्या 8.33% म्हणजे जवळजवळ एक पगार दरवर्षी बोनस देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या चा लाभ कायद्याप्रमाणे देण्याचा निर्णयही झाला व वार्षिक पगारी रजा देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला ठेकेदार बदलला तरी कामगार बदलू नये अशी संघटनेच्या भूमिकेला आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली व त्यामध्ये होत असलेल्या हेराफेरीलाही पायबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले. काही सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी सलग पाच महिने काम करूनही पगार दिला गेलेला नव्हता अशा सर्व कर्मचाऱ्यांचे फाईल तपासून त्यांना तात्काळ पगार देण्याबाबतचे आदेश काढण्यात येतील असेही सांगितले.सर्व कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार स्लिप देण्याबाबत व सर्व कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार देण्याबाबत योग्य उचित आदेश आयुक्तांनी दिले.इएसआयसी कार्ड ज्या ज्या कामगारांना आवश्यक आहे त्या सर्व कामगारांना देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.त्याचबरोबर कंत्राटी कामगारांच्या पगारातून विनाकारण कपात करण्यात येते अशी कोणतीही बेकायदेशीर कपात करण्यात येऊ नयेत अशा सक्त सूचना या बैठकीत आयुक्तांनी दिल्या.कंत्राटी  कामगारांना वेळोवेळी विविध विभागात काम करत असताना सुरक्षा विषय कोणती साधने देण्यात येत नाहीत या गोष्टीकडे कामगार नेते सुनील शिंदे  यांनी लक्ष वेधले असता या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सर्व सुरक्षा साधने देण्याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.राष्ट्रीय स्वास्थ अभियान अंतर्गत काम करणारे नर्सेस, डॉक्टर्स,डेटा एन्ट्री ऑपरेटर्स व इतर कर्मचारी यांचे वेतन शासनाकडून येण्यास बऱ्याचदा विलंब होतो अशाप्रसंगी कोणताही विलंब न करता महानगरपालिकेच्या कोषातून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर राष्ट्रीय स्वास्थ अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलेल्या परिपत्रकाप्रमाणे रजा वेतन अनुषंगित सर्व फायदे देण्याबाबतचे परिपत्रक तात्काळ काढण्यात येईल व त्यांनाही त्याचे फायदे देण्यात येतील त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांना वेळवर पगार न देणारे इगल या सुरक्षारक्षक कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल व यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही असा निर्णय या बैठकीत झाला अशा प्रकारचे निर्णय या बैठकीत झाले आहेत.या सर्व कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे बोनस देण्याचा निर्णय झाल्याबद्दल संघटनेतर्फे सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांचे आभार मानले.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 19: जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारे पुरग्रस्त भाग तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालंतर करावे, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम मंडळ जलसंपदा, आरोग्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदल, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आदी सर्व संबधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, भारतीय हवामान खात्याने आज (दि.19 ऑगस्ट) आणि उद्या (दि. 20 ऑगस्ट) रोजी घाटमाथा परिसरात रेड अलर्ट तर शहर आणि ग्रामीण भागात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जी धरणे भरली आहेत त्या ठिकाणी जलसंपदा व शासकीय यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने पाऊसाचा अंदाज आणि त्यांनी धरणातील आवक लक्षात घेता विसर्गाबाबत नियोजन करावे. याबाबत किमान दोन तास अगोदर जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावे.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदलानी आपली पथके सुसज्ज साहित्यासह दक्ष ठेवावे. नदीकाठच्या लोकांना ज्या ठिकाणी धोका पोहोचण्याची शक्यता आहे, त्यांना सावध करण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत संदेश पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले.

यावेळी सर्व संबंधित यंत्रणेने मान्सूनच्या अनुषंगाने पुर्वतयारी व करीत असलेली कार्यवाहीबाबत माहिती दिली.
0000

हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान-ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त धान्य महोत्सवाचे आयोजन

पुणे -हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान मांडलं गेलं आहे. त्यामुळे समुत्कर्षच्या नावातच सर्वांचा उत्कर्ष दडलेला आहे, अशी भावना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये सुरु झालेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त
धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, कोथरुड दक्षिण मंडल कुलदीप सावळेकर, भाजप उत्तर मंडल माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वनिता काळे, शशिकला मेंगडे, कल्पना पुरंदरे, मधुरा वैशंपायन, धनंजय रसाळ, पार्थ मटकरी यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान मांडलं गेलं आहे. त्यामुळे समुत्कर्षच्या नावातच सर्वांचा उत्कर्ष दडलेला आहे. समाजातील प्रत्येकालाच उत्कर्ष व्हावा, या उद्देशाने समुत्कर्ष ग्राहक पेठ ही चळवळ सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात कोथरुड मधील असंख्य नागरिकांना याचा लाभ झाला आहे. जवळपास ११००० पेक्षा जास्त कलाकार, दिव्यांगजन, आर्थिक दुर्बल कुटुंब या सर्वांनाच या उपक्रमाच्या माध्यमातून स्वस्त आणि दर्जेदार धान्य सवलतीच्या दरात मिळू शकले. त्यामुळे या उपक्रमाचा उद्देश यशस्वी होत आहे.

ते पुढे म्हणाले की, आगामी काळंही सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात खरेदी करेल. त्यामुळे या काळात अशा पद्धतीने पुन्हा धान्य महोत्सवाचे आयोजन केल्यास, सर्वसामान्यांना याचा मोठा लाभ होईल, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, दोन दिवसांच्या या धान्य महोत्सवात समुत्कर्ष कार्डधारकांना ३० टक्के आणि सर्वसामान्य ग्राहकांना १५ टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यासोबतच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी; यासाठी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्याचाही नागरिकांनी लाभ घेऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ना. पाटील यांनी यावेळी केले.

विस्कटलेल्या कुटुंबाची घडी बसविणारी पुणे पोलिसांची दामिनी

पुणे- पोलीस म्हटले कि त्याबद्दल समाजात काय काय समज आहेत यावर बोलायला नकोच . अर्थात पोलीस आणि जनता यांच्यातील नाते संबध अजूनही फारसे दुरावलेले नाहीत . सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या प्रवृत्ती पोलीसदलात काही स्वरुपात असतीलही आणि अशा प्रवृत्तीवर कायम मोठा प्रकाश झोत देखील टाकला जातो ..पण हि कथा अगदीच वेगळी आहे. पोलीसातला माणूस , आणि जनतेला कुटुंब मानून काळजी घेणारी पोलिसांची ‘दामिनी या कथेतून प्रत्यक्षात साकार झाली आहे. हि कुठल्या सिनेमाची कथा नाही तर पुण्यात प्रत्यक्षात घडलेली कथा आहे .पुणे पोलिसांची मान या कथेने निश्चित उंचावणार तर आहे पण मनामनात घर देखील करणार आहे.

शाळेत 10 वी इयत्तेत topper असलेली विद्यार्थिनी तिच्या आई वडिलांच्या कौटुंबिक जीवनाचे पडसाद तिच्या आयुष्यावर कसे पडलेले असतात आणि त्या नैराश्यातून ती घर सोडून जाण्याच्या मनस्थितीत कशी पोहोचते.. आणि त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी मार्शल कशी या कुटुंबातील पेच , गुंतागुंत सोडवून पुन्हा एका हसत्या खेळत्या जीवन मार्गावर या कुटुंबाला कशी वळविते त्याची हि कहाणी आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल दि.१८.०८.२०२५ रोजी वेळ १०.ते १०.१५ वाजताचे दरम्यान दामिनी मार्शल हिंगे – 10920 यांचे मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरुन कॉल आला.. , दामिनी दीदी तुझ्या मदतीची मला गरज आहे. प्लीज मला मदत कर. तू आमच्या शाळेत आली होती तेव्हा तू तुझा मोबाईल नंबर मुलीना दिला होता आणि बोलली होतीस की तुमच्या संकट समयी मला कधीही कॉल करा…. मी तुमच्या मदतीला येईल….
“यावेळेस त्या मुलीने सांगितले की दीदी मी घर सोडून चालली आहे. मला खूप टेन्शन आहे” सदर वेळेस दामिनी मार्शल हिंगे यांनी आधाराचे बोल बोलून थांबण्यास सांगून तात्काळ या मुलीची समक्ष भेट घेतली . तिच्याशी आपुलीकी साधली त्यावेळेस कळले कि सदर मुलगी हि इ 10 वि कक्षेमध्ये शाळेमध्ये टॉपर आहे तिचे आई बाबा एकत्र राहत नाहीत. त्यांची घटस्फोट केस कोर्टात चालू आहे. ते सतत भांडत असतात तिचा अभ्यास होत नाही तिचे कुठेही लक्ष लागत नाही.ती दामिनीला सांगत होती, दीदी मला जगावस वाटत नाही. मी खूप टेन्शन मधे आहे.
या मुलीचा विश्वास संपादन करून तिचे मनपरिवर्तन करून मुलीच्या शाळेत जाऊन प्रिंसिपल मॅडम ची भेट दामिनीने घेतली. मुलीच्या आई वडिलांना शाळेत बोलावून घेऊन त्यांना त्यांच्या मुलीच्या संदर्भात चर्चा करून त्यांना पटवून दिले ,‘ तुमची मुलगीच तुमच भवितव्य आहे. अशा कोवळ्या जीवास जपा.’ आई वडिलांच्या आयुष्याचे ध्येय मुलांना सावरणे ,योग्य मार्गावर नेणे त्यांची काळजी घेणे असले पाहिजे, कुटुंबाच्या आनंदी जीवनाला हवे तरी काय असते ? या मुलीच्या आई वडिलांचेही मनपरिवर्तन करून त्यांनी आपल्या मुळे आपल्या मुलीचे हाल करायचे नाही असे ठरवले व त्यांनी घटस्फोट बाबत केस मागे घेण्याचे ठरवले आणि आम्ही एक आनंदी कुटुंब म्हणून राहण्याचा निर्णय घेतला .हि मुलगी आता तिच्या आई बाबां सोबत एकत्र राहण्यास मिळत आहे म्हणून खूप खुश आहे . या मुलीने,प्रिन्सिपल मॅडम आणि सदर मुलीच्या पालकांनी दामिनी मार्शल व पोलीस प्रशासन यांचे खूप मनापासून आभार मानले आहेत.

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे २० ऑगस्ट रोजी लोकार्पण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन ते आरबीआय गणेशखिंड रस्ता या मार्गावरील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कळविले आहे.

हा उड्डाणपूल झाल्याने विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.