Home Blog Page 1584

पुण्याच्या बापू भवन इथे गांधी जयंती साजरी

पुणे-पुण्याची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था ही केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अधीन असलेली, संस्था असून, पुण्याच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर मार्ग  (ताडीवाला मार्ग)  इथली संस्थेची इमारत “बापू भवन” नावाने ओळखली जाते. या संस्थेत आज-  2 ऑक्टोबर 2022 रोजी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या महाराष्ट्र-गोवा प्रदेशाच्या टपाल विभागासह, संयुक्तरित्या, महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त, टपाल कार्यालयाच्या मदतीने, महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राशी संबंधित टपाल टिकीटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आजपासून चार ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन, ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन झाले. यावेळी (निवृत्त) अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक अभय नारायण, टपाल सेवेच्या पुणे विभागाच्या संचालिका सिमरन कौर , केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील वैकुंठ मेहता राष्‍ट्रीय सहकारी प्रबंध संस्‍थेच्या संचालिका  डॉ. हेमा यादव, ‘इंटरनॅशनल रेअर कलेक्टिंग सोसायटी’चे  उपाध्यक्ष राजेंद्र शाह,  ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ आणि गांधीवादी प्रा. आर.के. मुटाटकर, आणि शासकीय पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विठ्ठल एस. बांदल यावेळी उपस्थित होते.

संस्थेच्या संचालिका, प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी फळांची परडी आणि शाल देऊन सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात, त्यांनी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचा महात्मा गांधी यांच्याशी असलेला संबंध उलगडून सांगितला. महात्मा गांधी स्वतः या संस्थेत वास्तव्य करत असत आणि रुग्णांवर उपचारही करत. तसेच इथे त्यांनी निसर्गोपचाराचे अनेक प्रयोगही केले, त्यांनी यावेळी संस्थेतल्या, निसर्गोपचाराशी संबंधित अनेक उपक्रम आणि सुविधांची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, यांनी सांगितले की आपण जसजसे निसर्गापासून, नैसर्गिक जीवनशैलीपासून दूर जात आहोत, तसतसे आपण आजार आणि विविध रोगांना बळी पडतो आहोत. आपण निसर्गाकडून जेवढे घेतो, तेवढे त्याला परतही द्यायला हवे, असा विचार त्यांनी व्यक्त केला.

इतर वक्त्यांनीही  महात्मा गांधी, त्यांचे विचार आणि तत्वे याबद्दल आपली मते व्यक्त केलीत. महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान केवळ भारतासाठीच नव्हे, तर पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्र आणि मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले.

मान्यवर  पाहुण्यांच्या उपस्थितीत विजेत्यांची घोषणा करुन त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलीत. त्यानंतर ओझोन थेरपी महिला युनिटचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या विद्यार्थिनीनी यावेळी खादी फॅशन शोचे आयोजन केले होते.

गांधी जयंतीनिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 चा प्रारंभ

नवी दिल्ली-

गांधी जयंतीनिमित्त आज रविवारी सकाळी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानात (स्टेडियममध्ये) फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 ला प्रारंभ झाला.  कोविड-19 महामारीचा  मोठ्या प्रमाणावर प्रसार होत होता,   तयावेळी म्हणजे 2020 मध्‍ये  केन्द्र सरकारने  या सर्वात मोठ्या देशव्यापी चळवळींपैकी एक असलेल्या मोहिमेची सुरुवात केली होती.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू तसेच केंद्रीय मंत्री युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी संयुक्तपणे चालवलेल्या फिट इंडिया- प्लॉगसह या दौडची सुरुवात  करण्यात आली. फिट इंडिया फ्रीडम रनचं हे तिसरं वर्ष असून आज, २ ऑक्टोबरला सुरू  झालेली ही दौड ३१ ऑक्टोबरपर्यंत चालेल.

माजी केन्द्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन गोयल, क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, फिट इंडियाचे सदिच्छादूत रिपू दमन बेवली तसेच क्रीडा मंत्रालय आणिक्रीडा प्राधिकरणाचे-  ‘साई’चे इतर अधिकारी आणि लोक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा पुनरुच्चार करत किरेन रिजिजू यांनी नमूद केले की, “ नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया चळवळ सुरू केली, तेव्हा त्यांची ध्येयदृष्टी संपूर्ण देशाला तंदुरुस्त बनवण्याची होती. इतक्या वर्षाने आता या चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे. प्रत्येकजण आता या चळवळीत सामील होण्यास इच्छुक आहे आणि फिट इंडिया मोबाईल अॅप देखील दररोज मोठ्या उत्साहाने डाउनलोड केले जात आहे.”

रिजीजू यांच्याच वक्तव्याचा धागा पकडत अनुराग सिंग ठाकूर यांनी नमूद केले की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते अमृतकालापर्यंत, भारताला नवीन उंचीवर नेण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नांसाठी आपल्याला काम करत राहावे लागेल. आपल्या तंदुरुस्तीविषयक सर्व बाबींचा स्तर नव्या उंचीवर नेणे हा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा पहिला मार्ग आहे.”

यंदाच्या फ्रीडम रनमधे विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले. “गांधी जयंतीच्या दिवशी या मलिकेतली ही तिसरी यशस्वी दौड सुरु करून एकता दिवस – अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबर रोजी तिचा समारोप करण्याइतका दुसरा चांगला योग नाही. गेल्या वर्षी एकूण 9 कोटी 30 लाख लोक यात सहभागी झाले होते. यंदा ही संख्या  दुप्पट करण्यासाठी आपल्याला फिट फ्रीडम रन 3.0 ला खूप पाठबळ द्यावे लागेल असे ते म्हणाले.”

फिट इंडिया फ्रीडम रनमधे, गेल्या दोन वर्षांत, भारतीय सशस्त्र दलांसह सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), भारतीय रेल्वे, सीबीएसई आणि आयसीएसई शाळा तसेच युवा कार्य मंत्रालयाची युवा शाखा, नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) आणि “राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांनी सहभाग घेतला आहे.

केंद्रीय संचार ब्यूरो च्या वतीने आयोजित “मोहनदास ते महात्मा”  या गांधीजींच्या जीवनावर आधारित दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाला प्रारंभ

अमरावती-महात्मा गांधी जींची प्रेरणा घेऊन तरूणांनी देशाच्या विकासासाठी झोकुन देण्याचे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. भारत  सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अमरावतीच्या वतीने  महात्मा गाँधी यांच्या  जयंती निमित्त गांधीजींच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनीच्या उदघाटन प्रसंगी डॉ. बोंडे बोलत होते.

“मोहनदास ते महात्मा” या गांधीजींच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रप्रदर्शनिचे आयोजन येथील  संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या कला दालनात आज प्रारंभ झाला. या  दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनिचे उदघाटन खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  आमदार प्रविण पोटे, निवासी उपजिलहधिकारी डॉ. विवेक घोडके, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह  झाला,  महावितरणचे अधिक्षक अभियंता  दिपक देवहाते, संत गाडगेबाबा विदयापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेश बुरंगे अन्य मान्यवर उपस्थित होते.

या प्रर्दशनीमध्ये महात्माजींच्या छायाचित्रांसोबतच निवडणुक विभाग,  भारतीय डाक विभाग, महानगर पालिका अमरावती, कस्तुरबा सोलर खादी समीती च्या वतीने   लावण्यात  आलेल्या प्रदर्शनी  स्टॉलचे उदघाटन मान्यवरांनी केले. माहीती प्रसारण मंत्रालयाच्यावतीने लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन गेम्स आजादी क्वेष्ट आणि केंद्र सरकाच्या आठवर्ष पुर्ती निमित्त माहीती पटलाचे उदघाटन  देखील करण्यात आले.    यानंतर  मणिबाई गुजराती विदयलयात घेण्यात आलेल्या चित्रकला आणि  निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवंराच्या हस्ते  बक्षीस आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

गजलकार डॉ. राजेश उमाले यांनी गांधीजींना आवडणारी  भजनं गाऊन सर्वांची मने जिंकली. 

याप्रदर्शनाच्या उदघाटनापुर्वी राष्ट्रीय सेवायोजनेच्या स्वंयसेवकानी शहरातील इर्वीन चौकात स्वच्छतेवर पथनाटयाचे सादरीकरण केले आणि  रॅलीच्या माध्यमतून जनजागृती केली. या रॅलीत विवीध विदयालयाच्या  विदयार्थांनी सहभाग घेतला.

दि. 2 ऑक्टोबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनिच्या माध्यमातून लोकांपर्यंत महात्मा गाँधी यांच्या जीवन प्रवाससोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होणार आहे. या प्रदर्शनातुन विविध शासकीय विभागांच्या योजनाची  माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे.

दि. 2 ऑक्टोबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान स.10 ते सांय 6 या वेळेत निशुल्क आयोजित प्रदर्शनीस जनतेने मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यानी केले आहे.

भारतीय रेल्वेची सप्टेंबर महिन्यात 115.80 मेट्रिक टन मालवाहतुकीची विक्रमी कामगिरी

मुंबई-भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2022 महिन्यात मालवाहतुकीत 115.80 मेट्रिक टन इतकी विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. सप्टेंबर महिन्यातील वाढीव मालवाहतूक 9.7 मेट्रिक टन असून  गेल्या वर्षीच्या 2021 च्या सप्टेंबर महिन्यातील आकड्यापेक्षा ही वाढ 9.15 टक्के इतकी आहे. यासह, भारतीय रेल्वेने सलग पंचवीसाव्यांदा सर्वाधिक मासिक मालवाहतुकीची नोंद केली आहे.

रेल्वेने कोळशाच्या वाहतुकीत 6.8 मेट्रिक टनांची नोंद केली असून त्याखालोखाल 1.2 मेट्रिक टन लोह खनिज, 1.22  मेट्रिक टन शिल्लक इतर माल, 0.4 मेट्रिक टन सिमेंट आणि पक्की भाजलेल्या विटा तसेच  0.3 मेट्रिक टन खते यांचा क्रमांक लागतो. वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये स्वयंचलित वाहनांच्या वाहतुकीत झालेली वाढ हे रेल्वेच्या मालवाहतुकीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य असून वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये सप्टेंबर 2022 पर्यंत 2712 वाघिणींमधून वाहतूक करण्यात आली. या तुलनेत, गेल्या वर्षी, याच कालावधीत 1575 वाघिणींतून वाहतूक करण्यात आली होती.

1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत एकत्रित मालवाहतूक 736.68  मेट्रिक टन इतकी झाली असून 2021-22 मध्ये 668.86 मेट्रिक टन इतकी मालवाहतूक झाली होती. म्हणजे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा वाढीव मालवाहतूक 67.83 मेट्रिक टन इतकी असून ही वाढ टक्केवारीत सांगायचे तर 10.14 टक्के इतकी आहे. मालवाहतुकीचे एनकेटीएमएसमध्ये  (किलोमीटरमागे निव्वळ टन) सप्टेंबर  2021मध्ये 63.43 अब्ज  मालवाहतुकीपेक्षा सप्टेंबर  2022 मध्ये 69.97 अब्ज इतकी वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ 10.3 टक्के इतकी आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 17.1 टक्के इतकी एनटीकेएम वाढ झाली आहे.

उर्जा आणि कोळसा मंत्रालयाच्या निकटच्या सहकार्यातून कोळशाचा वीज निर्मिती केंद्रांना शाश्वत पुरवठा करण्याच्या भारतीय रेल्वेचे प्रयत्न हे सप्टेंबर महिन्यात रेल्वेच्या मालवाहतुकीचे पुन्हाही प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. वीज निर्मिती केंद्रांना कोळशाची वाहतूक (देशांतर्गत आणि आयातित दोन्ही) सप्टेंबरमध्ये 6.2 मेट्रिक टनांनी वाढली असून 42.00 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला आहे तर गेल्या वर्षी  35.8 मेट्रिक टन कोळसा वाहून नेला होता. म्हणजे ही वाढ 17.3 टक्के इतकी झाली आहे.एकत्रितपणे, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय रेल्वेने वीज निर्मिती केंद्रांना 64.53 मेट्रिक टन इतका जादा कोळशाचा पुरवठा केला असून गेल्यावर्षी याच कालावधीतील वाहतुकीपेक्षा ही वाढ 29.3 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.

मालनिहाय वाढीचे आकडे असे दर्शवतात की भारतीय रेल्वेने सर्व मालाच्या वाहतुकीत प्रभावी अशी कामगिरी नोंदवली आहे. मालानुसार खालीलप्रमाणे वाढीचे दर दिले आहेत.

CommodityVariation (MT)% variation
Coal6.814
Cement and Clinker0.43.4
POL0.298.19
Fertilizer0.337.9
Containers ( Domestic)0.096.15
Balance Other Goods1.214.1
Iron ore1.2

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. गुप्तचर विभागाला याबाबत माहिती मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. एकनाथ शिंदे यांना एका महिन्यापूर्वी धमकीचं फोन आणि धमकीचं पत्र आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. धमकीसंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्फोट उडवून जिवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी यावर बोलताना, मला असे अनेक फोन आले आहेत. माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही. मी शेवटी जनतेमधला माणूस असून जनतेत जाण्यापासून मला कोणीही रोखवू शकत नाही. पोलिस, गृहविभाग योग्य ती खबरदारी घेत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. असे कुणाला वाटले तरी कुणीही काही करू शकत नाही असे धाडस देखील त्यांनी करण्याचा प्रयत्न करू नये. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदेंना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे. यापूर्वी नगरविकास मंत्री असताना माओवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसची ‘‘संवाद यात्रा ‘ संपन्न

पुणे- महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुणे शहर काँग्रेसच्या वतीने ‘‘संवाद यात्रेचे’’ आयोजन करण्यात आले होते खंडोजी बाबा चौक येथून सुरू झालेली यात्रा आदमबाग येथील कै. काकासाहेब गाडगीळ यांच्या पुतळ्याजवळ या संवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘प.पू. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशातील सर्व क्षेत्रातील बंधू – भगिनींना निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जोडण्याचे काम करून तिरंगा झेंड्याखाली स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी करून घेतले. आज खासदार राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ अभियान राबवित आहे. त्यांच्या समर्थनार्थ ह्या संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. आजच्या पिढीला व्हॅट्सॲप युनिव्हरसिटीच्या माध्यमातून चूकीचा इतिहास सांगण्याचे षडयंत्र महात्मा गांधींच्या खुन्यांनी रचले आहे. त्यामुळेच गांधीजी आणि भगतसिंग, गांधीजी आणि आंबेडकर, गांधीजी आणि सरदार पटेल, यांच्या नावाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बदनामीचा कट रचला जात आहे. ही संवाद यात्रा या सर्व खोट्या व चूकीच्या इतिहासाला छेद देण्यासाठी काढण्यात आलेली आहे.’’ यानंतर अंधश्रध्दा निर्मुलनचे श्रीपाल ललवाणी, कामगार संघटनेचे नितीन पवार, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, लोकायतचे निरज जैन, ॲड. अभय छाजेड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, आबा बागुल, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, रफिक शेख, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, विनोद मथुरावाला, पुजा आनंद, संगीता तिवारी, मुख्तार शेख, द. स. पोळेकर, उस्मान तांबोळी, चेतन आगरवाल, प्रा.वाल्मिक जगताप, मनोहर गाडेकर, सतिश पवार, प्रविण करपे, भुतडा, सचिन आडेकर, यशराज पारखी, शाबीर खान, सुरेश काबंळे, अरूण वाघमारे, उमेश कंधारे, गोपाळ तिवारी, रजनी त्रिभुवन, मीरा शिंदे, विनोद रणपिसे, विनय ढेरे, प्रकाश पवार, सुजीत यादव, शिलार रतनगिरी, सौरभ अमराळे, राहुल तायडे, भगवान कडू, विनय ढेरे, बंडू नलावडे, आदींसह असंख्य कार्यकर्ते सवांद यात्रेत सहभागी होते. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे व ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील हे भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे आहेत का?

कर्वे पुतळ्याशेजारी खेटून असलेला चंद्रकांत पाटील यांच्या फ्लेक्सवर तातडीने कारवाई करत काढून टाका : डॉ अभिजीत मोरे, आप प्रवक्ते यांची मागणी

पुणे-कोल्हापूरहून कोथरूडला राजकीय पुनर्वसन झालेले कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे स्वतःला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापेक्षा मोठे आहेत का ? असा प्रश्न सर्वसामान्य कोथरूडकरांना आणि पुणेकरांना पडलेला आहे. कर्वे पुतळ्या शेजारी व तेही पुतळ्याच्या आवारात कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल मोठा फ्लेक्स उभारला गेला आहे. त्याची उंची महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. अशा पद्धतीने महापुरुषांच्या पुतळ्याच्या आवारात स्वतःचा मोठा फ्लेक्स लावून भारतीय जनता पक्षाने महर्षी कर्वे यांचा अपमान केला आहे.असा आरोप करत आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी , भारतीय जनता पक्षाने समस्त कोथरूडकरांची, पुणेकरांची माफी मागितली पाहिजे. तसेच पुणे महानगरपालिकेने या फ्लेक्स वर तातडीने कारवाई करत हा फ्लेक्स हटवावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी केली आहे.

मोरे म्हणाले कि,आश्चर्य म्हणजे हे ठिकाण चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर आहे.आज “महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री अभिवादन फेरी”चे आयोजन आम आदमी पक्षातर्फे आंबेडकर चौक वारजे येथून महर्षी कर्वे पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी भवन अशी आयोजित केली होती. या अभिवादन फेरी दरम्यान ही बाब आम आदमी पक्षाच्या निदर्शनास आली आहे. ज्यावेळी आम आदमी पक्षाची टीम महर्षी कर्वे यांना अभिवादन करण्यासाठी, पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेली त्यावेळी पुतळ्या शेजारील भाग हा बंदिस्त केला होता आणि त्याच्या आत मध्ये मात्र एवढा मोठा फ्लेक्स उभारल्याची बाब ही आम आदमी पक्षाला खटकली. महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सामान्य लोक जाऊ शकत नसताना भारतीय जनता पक्षाचे आमदार मात्र स्वतःचा भला मोठा फ्लेक्स महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याच्या आवारात तोही त्यांच्या उंचीपेक्षा जास्त मोठा कसा काय उभा करू शकतात हा प्रश्न सर्वांना पडला. सर्वांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अभिवादन फेरीचा आयोजन प्राध्यापक सुहास पवार, सुशील बोबडे, निलेश वांजळे, प्राध्यापक बाबासाहेब जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते.

फर्ग्युसन महाविद्यालयात स्वररंग 2022


पुणे-विद्यार्थी विकास विभाग ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्वररंग 2022 यावर्षी फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये होणार आहे या स्वररंग युवक महोत्सवामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे विभागातील जवळपास ६० पेक्षा अधिक महाविद्यालयाचा सहभाग असणार आहे या साठ महाविद्यालयातील हजाराहून अधिक विद्यार्थी विविध कला प्रकारांमध्ये आपली कला सादर करणार आहेत या कलाप्रकारांमध्ये लोक नृत्य ,लोक गायन ,समूहगीत ,समूह गायन कोलाज, मेहंदी ,रांगोळी ,लोकनाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनश्च आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे या स्वररंग 2022 या महोत्सवाची फर्ग्युसन महाविद्यालयात अतिशय उत्साहाने आयोजन चालू आहे या आयोजनामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभाग घेत आहेत. या युवक महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे .या स्वर रंग 2022 या उपक्रमाचे उद्घाटन ४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांच्या हस्ते होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी असतील व त्यानंतर विविध 10 व्यासपीठांवर या स्पर्धा चालू होतील या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सुशीलकुमार धनमने व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. मयुर क्षीरसागर काम बघत आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे

जिद्द, आत्मविश्वास व परिश्रमाने उद्योगात यश-प्रतापराव पवार

विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये उद्योजकता विकास मार्गदर्शन
पुणे : “नोकरी तुमची गरज पूर्ण करते, तर उद्योग तुमची स्वप्न पूर्ण करतात. त्यामुळे उद्योग-व्यवसाय करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. उद्योगात भांडवल यापेक्षाही मानसिकता महत्वाची आहे. आपल्या मनातील आग, जिद्द, आत्मविश्वास, त्याला मिळालेली कठोर परिश्रम आणि बाजारपेठेची जाण यामुळे यशस्वी उद्योजक होता येते,” असा कानमंत्र ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी दिला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रांतर्गत आपटे वसतिगृहात आयोजित उद्योजकता विकास मार्गदर्शन सत्रात पवार बोलत होते. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त सुप्रिया केळवकर, तुषार रंजनकर, ज्योती गोगटे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी सुरेश उमाप आदी उपस्थित होते. प्रसंगी समितीतील विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले.
प्रतापराव पवार म्हणाले, “आजवर मोठे होऊन चांगली नोकरी करावी, अशीच शिकवण दिली जाते. मात्र, हे बदलून लहापणापासूनच उद्योगाचा संस्कार दिला पाहिजे. त्यातून येणारी पिढी उद्योगाची कास धरेल. आपल्या व्यवसायाची सखोल माहिती व लोकांची गरज याची सांगड घालता आली पाहिजे. आज अनेक पर्याय, तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून आपण उद्योग सुरु करावेत. अपयशातून शिकत जावे. जिद्द सोडू नये. उद्योजकासह चांगला व्यक्ती बनण्यावर लक्ष द्या. “
यावेळी पवार यांनी अनेक यशस्वी उद्योजकांची यशोगाथा सांगितली. महाराष्ट्रात लाखो उद्योग आहेत; परंतु उद्योगात मराठी माणूस नाही, हे खेदजनक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी उद्योजकता विकास केंद्र सुरु करीत आहोत. यातून मुलामुलींची नोकरीची मानसिकता बदलेल, असे सुरेश उमाप यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्योजकता आणि सरकारी योजना याविषयी माहिती दिली.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या कोथरूड नवरात्र महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे-पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी पुण्यातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकसाठी कालबद्ध नियोजन करणार असल्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात चंद्रकांतदादांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उमेश भेलके, महिला उत्सव प्रमुख माजी शिक्षण मंडल अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके, सौ.अक्षदा भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर,प्रसिद्ध उद्योगपती संजीव अरोरा,ग्लोबल ग्रुप चे मनोज हिंगोरानी,मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रवीण मसालेवाले चे संचालक विशाल चोरडिया, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा उत्सव प्रमुख प्रतीक खर्डेकर, मोहित भेलके, आरपीआय चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार जोशी,व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरोना नंतर मुक्त वातावरणात साजऱ्या होत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या नागरिकांना शुभेच्छा देताना “आमच्या सरकारने निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केली असली तरी स्वयंशिस्त महत्वाची असून दुसऱ्यांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीने उत्सव साजरे करावेत असे सांगितलं. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासात असून दुर्गम भागातील विद्यार्थिनींना स्वेटर वाटप, दिव्यांगाना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, गरजू विद्यार्थिनींची फी भरणे अश्या विविध उपक्रमांनी ते खऱ्या अर्थाने नवरात्र साजरी करत असल्याचे ही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. मी कोरोना काळात क्रिएटिव्ह फाउंडेशन ने केलेले समाजकार्य जवळून बघितले असून असेच समजसेवेचे व्रत घेऊन सर्वांनी कार्य करावे असेही ते म्हणाले.
यावेळी चंद्रकांतदादांच्या हस्ते समाजकार्यासाठी सातत्याने मदत करणारे उद्योगपती संजीव अरोरा,ग्लोबल ग्रुप चे मनोज हिंगोरानी,मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रवीण मसालेवाले चे संचालक विशाल चोरडिया यांचा तसेच लावणी कलावंत योगेश देशमुख, पूनम कुडाळकर, माधवी सातपुते तसेच सत्यजित धांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
आजच्या ढगफुटी सदृश पावसाचा फटका पुणे शहराला बसला असताना आणि ऐन कार्यक्रमाच्या वेळी धुव्वाधार पाऊस असतानाही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहिले ही क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या कार्याची पावती असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.नाटक आणि लावणी च्या कार्यक्रमाला प्रेक्षागृहाला हाऊसफुल चा बोर्ड लागणे दुर्मिळ असून आता भोंडला, मंगळागौरीचे खेळ, बालजत्रा व दांडियाच्या कार्यक्रमालाही कोथरूडकर उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला. मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके व अक्षदा भेलके यांच्या हस्ते दिव्यांगांनी बनविलेल्या वस्तू देऊन चंद्रकांतदादा पाटील व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुणे जिल्ह्याची कामगिरी अव्वल:’सर्वोत्तम नागरिक अभिप्राय’ यामध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम

पुणे दि. २: स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०२१-२२ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील ५ शहरांनी विविध श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर संपन्न झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहर राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बारामती, लोणावळा, सासवड व  इंदापूर नागरपालिकेस विविध श्रेणीमधील पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.

‘सर्वोत्तम नागरिक अभिप्राय’ यामध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले.  नागरिकांचा प्रतिसाद अर्थात फिडबॅक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. त्यासाठी दिलेली लिंक ओपन करून त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. त्यामध्ये सर्वाधिक नागरिकांनी फिडबॅक नोंदवला असून योग्य उत्तरे दिल्याने शहराला देशामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये बारामती नगरपरिषद देशात नववी

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये बारामती नगरपरिषदेला देशात नववा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तसेच १ ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरांमध्ये वेगाने कामगिरी करणारे शहर म्हणून पुरस्कार मिळवला आहे. बारामती शहराने स्टार वन आणि वॉटर प्लस मानांकन मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सासवड नगरपालिका वेस्ट झोन मध्ये दुसऱ्या क्रमांकावर

सासवड नगरपालिका वेस्ट झोन मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून सेल्फ सस्टेनेबल सिटी चा बहुमान देश पातळीवर मिळाला  आहे. इंडियन स्वच्छता लीग मध्ये २५ ते ५० हजार लोकसंख्येमध्ये देशपातळीवर अव्वल क्रमांक पटकावला आहे. सासवडचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लोणावळा नगरपालिका देशपातळीवर चौथा क्रमांकावर

लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी अव्वल राहून देश पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी लोणावळा नगरपालिकेला देशपातळीवर चौथा क्रमांक तर वेस्ट झोन मध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून मान मिळाला आहे. इंडियन स्वच्छता लीग मध्ये ५० हजार ते १ लाख लोकसंख्येमध्ये देश पातळीवर अव्वल क्रमांक मिळवला आहे. लोणावळाचे मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

इंदापूर नगरपालिकेला इंडियन स्वच्छता लीगमध्ये विशेष बहुमान

इंडियन स्वच्छता लीग ही भारतातील पहिली आंतर-शहर स्पर्धा आहे ज्याचे नेतृत्व युवकांनी कचरामुक्त शहरे बनवण्याच्या दिशेने केले आहे. १७ सप्टेंबर रोजी हाती घेण्यात येणार्‍या उपक्रमांचे नियोजन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘विशेष उल्लेखनीय गुणगौरव’ या पुरस्काराने इंदापूर नगरपरिषदेचा गुणगौरव करण्यात आला. मुख्याधिकारी राम कापरे यांनी पुरस्कार स्वीकारला.

पुणे जिल्ह्यातील ५ शहरांना स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ अंतर्गत विविध श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील वर्षीही या अभियानांतर्गत नागरिकांच्या सहभागातून या वर्षापेक्षा चांगली कामगिरी होईल, असा विश्वास मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महिलांमध्ये समाजात सकारात्मक बदल घडविण्याची ताकद- कॅन्सरतज्ञ डॉ.शेखर कुलकर्णी

पुणे : महिलांना समाजामध्ये बरोबरीची संधी मिळाली तर त्या केवळ स्वत:चेच आयुष्य बदलत नाहीत, तर त्यांच्यामध्ये समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची ताकद असते. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत:ला प्रोत्साहन दिले पाहिजे. तर त्या समाजामध्ये अधिक खंबीरपणे उभ्या राहू शकतात, अशी भावना कॅन्सरतज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
एस.एस.असोसिएशन संचलित मानिनी अ‍ॅक्टिव्हिटी ग्रुपतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणा-या महिलांना मानिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्र म सिंहगड रस्ता, माणिकबाग येथे झाला. कार्यक्रमाला असोसिएशनच्या संस्थापिका स्मिता इंदापूरकर, माजी नगरसेवक, मंजुषा नागपुरे, प्रसन्न जगताप,सुहास इंदापूरकर आदी उपस्थित होते. 
ढोल-ताशा व्यापारी चंदा गाडे आणि ढोल वादन करणा-या स्तन कर्करोग रुग्ण माधुरी पिंगळे, ज्योती भोसले, शुभदा भाटे, अमिता गुजराथी, आश्लेषा राजहंस, सुनीता गानू, शुभदा पेडणेकर, नीता दर्जे यांना मानिनी पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर महाभोंडला व दांडियाचे आयोजन देखील करण्यात आले होते. 
डॉ.शेखर कुलकर्णी म्हणाले, ब्रेस्ट कॅन्सर चे प्रमाण पुण्यामध्ये प्रत्येक २२ महिलांच्या मागे एका असे आहे, अशा परिस्थितीतही अनेक महिला या आजाराचा ताकदीने सामना करीत आहेत. या महिलांना कुटुंबाचा आधार मिळाला तर त्या अधिक आनंदी जीवन जगू शकता. 
स्मिता इंदापूरकर म्हणाल्या, उच्च पदावर असलेल्या महिलांचा गौरव होतो, परंतु ब-याचशा महिला या सामाजिक आणि मानसिकरित्या भरडल्या जातात, अशा महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. महिलांची ताकद लक्षात घेऊन त्यांना समाजामध्ये अधिक चांगले बदल घडविण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. जयश्री देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मोहिती थोरात यांनी आभार मानले.

बुधवार पेठेतील एच आय व्ही बाधित महिलांना पोषण आहार 

महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने सेवा पंधरवडा ; तब्बल ९० महिलांना मदतीचा हात 

पुणे : महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सामाजिक संस्था राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करीत आहेत. यानिमित्त बुधवार पेठेतील एचआयव्ही बाधित ९० महिलांना पोषण आहार देण्यात आला. 
राजेंद्र तापडिया यांच्या भगीरथ तापडिया ट्रस्टच्या माध्यमातून पोषण आहार महिलांना देण्यात आला आहे. यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे राजेजी शास्त्रेय, पोलीस उपनिरीक्षक कीर्ती म्हस्के, तापडिया ट्रस्टचे संदेश मानकर, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, गणेश बाकले, अस्मिता शिंदे, आशा भट, दीपक निकम व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी ध्यान शिबिराची अनुभूती घेतली. 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत सरकारी कार्यालयास निर्देश दिले आहेत, त्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील सामाजिक संस्था देखील महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून प्रेरित होऊन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करत आहेत. 
शेखर मुंदडा म्हणाले, समाजाने देहविक्री करणाऱ्या महिलांकडे देखील आदराने पाहणे गरजेचे आहे. आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून या महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई,दि. 2 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने सुरू होणाऱ्या ‘ हॅलो नव्हे, वंदे मातरम् बोला’ आणि स्वच्छतेविषयक ‘लेटस् चेंज’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याकरिता शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. सत्याग्रह सारखे अस्त्र दिले. विश्वाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवला. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आधुनिक भारताच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान आहे. ‘जय जवान जय किसान’ या घोषणेने राष्ट्राभिमान जागवला. या महान विभूतींच्या त्याग, समर्पणाच्या शिकवणीतून राष्ट्र प्रगतीसाठी वचनबद्ध राहुया, हेच त्यांना विनम्र अभिवादन,’असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यांचे औचित्य साधून विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधानमंडळ सचिवालयात आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष यांनी दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 पर्यंत चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन केले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्रामार्फत स्माआरोग्य हेल्थकेअर संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी प्रधान सचिव, राजेंन्द्र भागवत, कल्याण केंद्राचे सरचिटणीस, मनिष पाटील, राजपत्रित अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष, अजय अग्रवाल, स्माआरोग्याचे संचालक अरुण रामचंद्र, डॉ.सुजाता अरुण यावेळी उपस्थित होते. उपसचिव विलास आठवले, म.वि.स. यांनी प्रथम तपासणी केली. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांनी सर्वांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि “उत्तम कार्यक्षमतेसाठी उत्तम आरोग्याची उपासना करावी,” असे आवाहन केले.