पुणे – भारतीय जनता पक्षातील अंतर्गत लाथाळ्यांमुळे पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळण्याची शक्यताच धोक्यात आली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पुण्यातील लोहगाव विमानतळाचे विस्तारिकरण व्हावे आणि पुण्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा अशा मागण्या उद्योजक आणि ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या आहेत. देशाच्या संसदेत नुकत्याच झालेल्या चर्चेतही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही मागणी जोरदारपणे मांडली. काँग्रेस पक्षानेही या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. पुण्याला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळावा यासाठी जनमत तयार होत असतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र अंतर्गत लाथाळ्यांचे दर्शन घडविले आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लोहगाव विमानतळाला आज भेट दिली आणि विस्तारिकरणाच्या योजनांवर भाष्य केले. त्याचवेळी आपल्याच पक्षाच्या खासदाराला डावलून भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार प्रकाश जावडेकर, राज्यसभेचे सभासद विनय सहस्रबुद्धे यांना घेऊन दिल्लीमध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर पुणे विमानतळ विस्तारीकरण आणि पुरंदर येथे नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणे अशा दोन विषयांवर चर्चा झाल्याचे माजी महापौरांनी सांगितले. विमानतळ या महत्त्वाच्या विषयावर भाजपचे खासदार आणि पदाधिकारी यांच्या वेगवेगळ्या बैठका होतात. सत्ताधारी पक्षातल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे विमानतळाचा प्रस्तावच धोक्यात येतो का? अशी स्थिती निर्माण झाल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी मेट्रो मार्गाला विरोध केला होता. त्यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट होते. त्या दोघांमधील वादांमुळे मेट्रो प्रकल्पाचे काम दोन वर्षे लांबले आणि त्याचा खर्चही वाढला. तोच प्रकार विमानतळाच्या बाबतीत होणार असे दिसू लागले आहे, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.