भारतभरातील गरजू कुटुंबीयांना जीवनोपयोगी वस्तू उपलब्ध करून मदतीचा हात-उषा बाजपेयी यांचा पुढाकार
अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे:भारतातील अनेक वस्त्यांतील कष्टकरी, रोजंदारी मजूरांच्या कुटुंबियांच्या गरजेनुसार ऑनलाईन रक्कम दुकानदारास जमा करून मदत कार्य करण्यात येत आहे. कोरोना विषाणू साथीच्या आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या राष्ट्रीय संयोजिका उषा बाजपेयी उपलब्ध करून देत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लॉक डाऊनमध्ये भारतभर जास्तीत जास्त कुटुंबियांना मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न चालू ठेवणार असल्याचे बाजपेयी यांनी सांगितले.
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबीयांना रोजचे खाणेसुद्धा मुश्किल झाले आहे. यामध्ये अनेक कष्टकरी, रोजंदारी मजूर वर्गाचा समावेश आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्य आणि जीवनोपयोगी वस्तू विकत घेण्याची मारामार झाली आहे. ‘स्टे अॅट होम’ आणि ‘सोशल डिस्टंसिंग’चा नियम पाळून हे मदतकार्य सुरु असून, सातत्याने मोबाईलवरून संपर्कात राहून अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिक गरजू कुटुंबियांना त्यांची गरज पूर्ण करण्याचे काम चार दिवसांपासून सातत्याने करीत असल्याचे उषा बाजपेयी यांनी सांगितले.
यामध्ये भारतातील अनेक ठिकाणी हे मदतकार्य पोहोचवित आहे. यामध्ये पुणे शहरातील मुंढवा, पठारे वस्ती (हडपसर), वडगाव शेरी कामगार वस्ती, साळुंखे वस्ती, खळदकर वस्ती, जांभुळवस्ती, कुदळे वस्तींसारख्या अनेक वस्त्या तसेच सातारा सोलापूरसारख्या शहरांचा समावेश आहे.
अनेक ठिकाणाहून आलेल्या मागणीनुसार अन्नधान्य आणि वस्तूसाठी लागणारी रक्कम दुकानदाराला जमा करून साहित्य उपलब्ध करून देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा यापूर्वीच केली होती त्याचा फायदा या कोरोना संकटात प्रत्येकापर्यंत मदत पोहोचविण्यास होत आहे. प्रत्येकाजवळ पेटीएम, गुगल पे प्रमाणे अनेक ऍप असल्यामुळे त्वरित व्यवहार करता येतो. त्याचे जमा खर्च ऑनलाईन दिसल्याने अत्यंत सोयीस्कर झाले आहे, अशी प्रतिक्रिया याबाबत उषा बाजपेयी यांनी दिली.
9762111311 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.