मुंबई – मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना दसरा मेळाव्यात शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांचा हवाला देत त्यांनी शरद पवारांवरही टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवारांना उद्देशून ते म्हणाले, 2000साली जे तुम्ही करत होतात, त्यावेळी का महाराष्ट्र धगधगता ठेवला होतात. शिवसेनाप्रमुखांना अटक झाली, लोकांची धावपळ झाली. 1992-93ला बाबरी कुठे पाडली, पण शिवसेनाप्रमुखांना इथे अटक करण्यात आली. त्यावेळी शरद पवारांच्या हाती सत्ता होती, तरीही बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि पवारांना विचारला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाला शिवसेनेच्या थीम साँगने सुरुवात झाली. भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी विधानसभेवर भगवा फडकवणार असा दावा केला. सोबतच, या एकाच महिन्यात दोन विजयादशमी साजऱ्या केल्या जाणार आहेत. एक विजयादशमी दसऱ्याला साजरी होत आहे. आणि दुसरी विजयादशमी आता 24 ऑक्टोबरला साजरी करू असे उद्धव म्हणाले आहेत. विशेष म्हणजे, 24 तारखेला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी दिली ही आश्वासने
- 10 रुपयांत पोटभर जेवण देणार
- एका रुपयात आरोग्य चाचणी
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस देणार
- शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार
भाजपवर अप्रत्यक्ष टीका
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपवर अप्रत्यक्ष टीका करताना मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेसह तमाम जनतेची मागणी आहे, की अयोध्येत राम मंदिर व्हावे. परंतु, या मंदिरासाठी मते मागणे योग्य नाही. दिलेली वचने पाळायला हवीत असे म्हणताना त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. सोबतच, या देशात आपल्या मातीवर प्रेम करणारे देशभक्त मुसलमान आहेत. मुस्लिमांशी आमचे काहीच वैर नाही. शिवरायांच्या दरबारात सुद्धा कित्येक मुस्लिम होते असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवरायांचा महाराष्ट्र हा कुणाची लाचारी करणारा नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादीवरही चौफेर फटकेबाजी
शिवसेना पक्षप्रमुखांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली. जोपर्यंत त्यांचे आमच्याशी (काँग्रेस, राष्ट्रवादी) वैर असणार तोपर्यंत आमचेही त्यांच्याशी राहील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी एका सभेत बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार आहेत. दोन्ही पक्ष थकले असे विधान केल्याचे वृत्त आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना तुम्ही असे काय करून थकला आहात. नेमके केले तरी काय? भ्रष्टाचार आणि खाऊन-खाऊन थकलात का? असा खोचक सवाल उद्धव यांनी केला.
मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांना अश्रू आले म्हणे! – उद्धव
अजित पवारांचे थेट नाव घेऊन उद्धव यांनी फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “मगरीला अश्रू येतात हे ऐकले होते. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना अश्रू आल्याचे पाहिले. अजित पवार कथितरित्या राजकारण सोडून शेती करण्याचा सल्ला देत आहेत. धरणात पाणीच आले नाही तर काय करणार बरं? ज्यावेळी तुमची सत्ता होती त्यावेळी धरणात पाणी नसताना तुम्ही केलेले विधान आठवते काय? आता अश्रू कसे काय आले.” केवळ अजित पवारच नव्हे, तर शरद पवारांवर सुद्धा उद्धव यांनी आपल्या भाषणातून टीका केली. ईडीची चौकशी होते तेव्हा सूडाचे राजकारण होत असल्याचे आरोप केले जातात. ज्यावेळी तुमची सत्ता होती तेव्हा सामनातील अग्रलेख पाहून का अटक केली होती. शिवसैनिकांवर का कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सूडाचे राजकारण झाले नव्हते का? अशी विचारणा उद्धव यांनी केली.
लाइव्ह अपडेट्स:
आरोग्य तपासणी एका रुपयात उपलब्ध करून देणारः उद्धव ठाकरे
शिवसेनेची सत्ता आल्यावर गोर-गरिबांना १० रुपयांत जेवण देणारः उद्धव ठाकरे
पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणारः उद्धव ठाकरे
हे लोकं बेकार झाल्यावर यांना नोकऱ्यात ८० टक्के भूमिपुत्रांना आरक्षण देण्याचं आठवतं काः उद्धव ठाकरे
३७० मुक्त काश्मीर हे शिवसेनाप्रमुखांचं स्वप्नः उद्धव ठाकरे
घुसखोरांना देशांतून हाकलवून लावा. समान नागरी कायदा आणाः उद्धव ठाकरे
सूडाचं राजकारण विरोधक २००० सालांपासून करताहेतः उद्धव ठाकरे
मुंबईत दंगली झाल्या तेव्हा आमच्यामागे कोणीही नव्हते. शिवसैनिक मुंबईच्या मागे उभे राहिलेः उद्धव ठाकरे
अजित पवार यांचे मगरीचे अश्रू; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका
जोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला विरोध करणार, तोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करत राहणारः उद्धव ठाकरे
वयामुळे नाही, तर भ्रष्टाचारामुळे काँग्रेस राष्ट्रवादी थकली उद्धव ठाकरे
धरणात पाणी नसेल, तर अजित पवार काय करणारः उद्धव ठाकरे
पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढूः उद्धव ठाकरे
शिवसेनेची ताकद काँग्रेसमागे कधीही लावणार नाहीः उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसाठी वाघनखं आमच्याकडे आहेः उद्धव ठाकरे
शिवरायांचा महाराष्ट्र हाजी हाजी करणारा नाहीः उद्धव ठाकरे
देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांशी आमचं भांडण नाहीः उद्धव ठाकरे
जनतेला दिलेलं वचन शिवसेना पाळणार आणि प्रभू श्रीरामांसारखं वचनबद्ध राज्य करणारः उद्धव ठाकरे
रामजन्मभूमीच्या ठिकाणीच रामाचं मंदिर उभारण्यात यावं, ही शिवसेनेची मागणीः उद्धव ठाकरे
गेल्या ३०-३५ वर्षांपासून रामजन्मभूमीची केस कोर्टातः उद्धव ठाकरे
शिवप्रभूंनी राष्ट्राला भगवा दिलाः उद्धव ठाकरे
एका महिन्यात दोन विजयादशमी साजऱ्या होणार; हा सुवर्ण योगायोगः उद्धव ठाकरे
विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी निघालो आहेः उद्धव ठाकरे