पुणे-बुधवारी रात्रीपासून शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे पुणेकरांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दहा जणांना जीव गमावावा लगाला आहे. तर अनेक गाड्या आणि जनावरेही पाण्यात वाहून गेली आहेत. गुरूवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पुण्यात ९० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाचही दिवस पुण्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात बुधवारी झालेल्या प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच मृतदेह मिळून आले असून, अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते.
टांगेवाला सोसायटी नेमकी नाल्याला खेटून आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर नाल्याचे पाणी वाढले. अक्षरशः रौद्र रूपाने वाहणारे पाणी कॉलनीतील घरांमध्ये घुसले. भिंती खचल्याने येथील काही घरे पडली. अंगावर भिंती पडल्याने काही जणांच्या मृत्यू झाला. तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
आतापपर्यंत पाच मृतदेह आढळले आहेत. यातील तीन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, अन्य दोन मृतदेह काढण्याचे काम एनडीआरएफची तीन पथकं करीत होते. येथील हजारे नामक महिला त्यांची आठ आणि दहा वर्षांची दोन मुले, रवी आमले (वय 15), संतोष कदम (वय 45) अशी आतापर्यंत मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. आणखी मृतदेहांचा शोध सुरू आहे.
पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात ५१ ते ७५ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुण्यात यंदाच्या पावसाळ्यातील एक हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने बुधवारी गाठला. एक जूनपासून ते २५ सप्टेंबरपर्यंत शहरात १०१८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
परतीच्या पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; तर त्यानंतर महिनाखेरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडत राहील.