मीरा-भाईंदर मधील कोरोना परिस्थितीची घेतला आढावा
भाईंदर दि.२३:- राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळत असताना राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. मुख्य सचिव आणि आयुक्तांमध्ये समन्वय नाही. तसेच जिल्हा स्तरावरही जिल्हाधिकारी, आयुक्त आणि उप-आयुक्त यांची मनमानी काम करण्याची पद्धतही काही वेगळीच आहे. अशाप्रकारे आरोग्य यंत्रणेत अव्यवस्था असून ‘समन्वयाचा अभाव आणि अनियंत्रण’ हे कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज मीरा भाईंदर येथील कोरोनोची परिस्थिती तसेच शासना मार्फत पुरविल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या टेंभा येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. तेथील डॉक्टर,वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेतली तसेच रुग्णांच्या व्यवस्थेची विचारपूस केली. त्याचप्रमाणे गोल्डन नेक्स्ट या ठिकणच्या मोठ्या इमारतीत मध्ये सुरु करण्यात आलेल्या क्वारांटाईन सेंटरला भेट दिली. तेथील व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी प्रसंगी मीरा भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, उप महापौर हसमुख गेहलोत,स्थायी समिती सभापती अशोक तिवारी, पालिकेचे सभागृह नेते रोहिदास पाटील,भाजपचे नगरसेवक ध्रुव किशोर पाटील, भाजपचे अमरजित मिश्रा आदी उपस्थित होते.
याप्रंसगी पत्रकारांशी संवाद साधताना श्री.दरेकर म्हणाले,राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती ओढवली असताना काही गोष्टी या घटना स्थळी मैदानात उतरल्यावरच समजतात.कार्यक्षेत्रात उतरल्यावर या विषयांचे खोल गांभीर्य लक्षात येते.तुलनात्मक पाहता मीरा भायंदर येथे कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी असून आतापर्यंत बारा रुग्ण दगावले आहेत.एकंदर येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु मीरा भाईंदर येथे सर्व यंत्रणांमध्ये अव्यस्था आहे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून मीरा भायंदर येथील व्यवस्था नीट मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त, महापौर,लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी यांचे समवेत बैठक घेणे आवश्यक होते. परंतु,जिल्हाधिकारी येथे फिरकले नाही. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी इकडे येऊन समाजातील लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळ्या घटकांशी चर्चा केल्यावर त्यांना या परिस्थिती बाबत अधिक माहिती मिळाली असती. या माहितीच्या आधारे नियंत्रण करणे सोपे झाले असते. मात्र तसे घडले नसल्याचा खेद श्री.दरेकर यांनी व्यक्त केली.
कोरोनाशी लढण्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर, लोकप्रतिनिधी, पक्ष प्रमुख आदीं सोबत विचारविनिमय होणे आवश्यक आहे. ही सर्व मंडळी ऑन फिल्ड काम करत असल्याने यांच्याकडून अधिक माहिती मिळते.यामुळे व्यवस्था आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होते तरी जिल्हाधिकाऱ्यांना अशाप्रकारच्या घटकांना सोबत घेऊन बैठक आयोजित करण्यास सांगणार असल्याचे श्री.दरेकर यांनी स्पष्ट केले.