पुणे, ७ :- जगात आज दहशत आणि भेदभावाचे वातावरण आहे. भविष्यात या विश्वदर्शन मानवता मंदिरातून मानव कल्याण आणि विश्वशांतीसाठी भक्ति आणि सेवेचा संदेश दिला जाईल, असे प्रतिपादन कर्नाटकच्या उड्डपी येथी पेजावर मठ येथील ज्ञानमठाधिपती परमपूज्य श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आणि परमपूज्य श्री. श्रीकृष्ण (विश्वनाथ) गोपाळ कर्वे उर्फ कर्वे गुरूजी यांच्या विश्वकल्याण व विश्वशांतीच्या मानवतावादी संकल्पनेतून साकार झालेल्या “श्री विश्वदर्शन देवता मानवता मंदिराचा” प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी म्हणाले, विश्व कल्याणाचा आणि मानवतेचा संदेश श्री कृष्ण यांनी जगाला दिला आहे. दुसऱ्याच्या सुख, दु:खात सर्वांनी सहभागी व्हावे. वाहणारे पाणी थांबल्यास त्यातून दुर्गंधी येते, तसेच भक्ति आणि प्रेमाचे आहे. प्रेम प्रवाहित होत राहिल्यास भगवंताच्या चरणातून सुगंधाचा झरा नित्य वाहत राहतो. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पंढरीच्या विठ्ठलाच्या प्रतिमातून आम्हाला विष्णुचे दर्शन घडते. केवळ संपत्तीसाठी लक्ष्मीची पूजा करू नका, तर नारायणाची ही पूजा ही करा. राष्ट्र रक्षणासाठी सेवेचे वृत्त सर्वांनी आंगिकारावे.
विजय भटकर म्हणाले, विश्वदर्शन देवता मंदिरातील मुर्तीच्या प्राण प्रतिष्ठा केले. याचे वर्णन वेद, पुराण आणि उपनिषेधात आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन यातून होईल. विश्वरुपाचे दर्शन कृष्णाने अर्जून आणि धृतराष्ट्र यांना दिला. त्यानंतर या मंदिरातून विश्वरुपाचे दर्शन सर्व जगाला घडेल. आध्यात्म आणि वैदिक संस्कृतीचे दर्शन याठिकाणातून संपूर्ण मानवजातीला होत राहिल.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, मानवतेच्या कल्याणासाठी या विश्वरुप दर्शन मंदिराची निर्मिती केली आहे. यातून वैश्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल. हिंदु संस्कृती ही भारतीय एकतमेचे प्रतिक आहे. पुराण आणि कुराण यातून मानवतेला एका धाग्यात बांधण्याचे कार्य केले जात आहे. या मंदिरातून दिला जाणारा मानवता आणि विश्व कल्याणाचा संदेशातून दहशतवादाचे पाळेमुळे नष्ट होईल. संपूर्ण विश्व हे ज्ञान स्वरूप व चैतन्य स्वरूप आहे. प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांनी प्रस्ताविक केले.