पुणे : “आपल्या देशाला प्राचीन संस्कृती, परंपरा लाभली आहे. आज एकविसाव्या प्राचीन आणि आधुनिकतेच्या संगमातूनच राष्ट्राची प्रगती शक्य आहे. हाच धागा आणि स्वामी विवेकानंद यांचा विचार घेऊन सुर्यदत्ता शिक्षण संस्था कार्य करत आहे. यांचा मिलाफ असलेल्या या आदर्श व्यक्तींचा सन्मान करताना मला आनंद वाटतो,” असे प्रतिपादन मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.
सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव’ व सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले. बावधन येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनीजी होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया उपस्थित होते.
लेफ्ट. जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रय शेकटकर (राष्ट्रसेवा), डॉ. विकास आमटे (वैद्यकीय सामाजिक सेवा), द्वारका जालान (साहित्य), टोनींनो लॅम्बोर्गिनी (आंतरराष्ट्रीय उद्योजकता), पद्मश्री सुधा मल्होत्रा (पार्श्वगायन), डॉ. मकरंद जावडेकर (कॉर्पोरेट), डॉ. कमल टावरी (खादी आणि समग्र विकास), मनोरंजन ब्यापारी (साहित्य), फरीद शेख (छायाचित्रण आणि पुरातन कॅमेर्यांचे संग्रहण), डॉ. रेणू राज (कायदा आणि न्यायव्यवस्था) यांना ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर पद्मश्री सोमा घोष (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अर्णब भट्टाचार्य (शिक्षण आणि संशोधन), राजेश बत्रा (लोकसेवा), विमल बाफना (कॉर्पोरेट, सीएसआर), महेश नामपूरकर (स्थापत्यशास्त्र आरेखन), नमिता कोहक (शौर्य), गोपिका वर्मा (नृत्यकला-मोहिनीअट्टम व वारसा संवर्धन) यांना ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच परमपूज्य डॉ. विष्णू महाराज पारनेरकरजी यांना ‘सुर्यरत्न आधुनिक युगाचे संत पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा पुरस्कार त्यांचे चिरंजीव गुणेश यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला, तर लोम्बार्गिनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी फेरोसिया लोम्बार्गिनी यांनी स्वीकारला. सन्मानचिन्ह, मानपत्र व उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे अठरावे वर्ष आहे.
श्रीधरन पिल्लई म्हणाले, “राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देतात. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या व्यक्तींचा सन्मान करून सुर्यदत्ता संस्थेने विद्यार्थ्यांसमोर एक ऊर्जा केंद्र बनवले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्याचे काम आपण करायला हवे.”
डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, “पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती जोडण्याचे काम सुर्यदत्ता करत आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असून, त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होण्यात त्यांच्या कार्याचा आदर्श महत्वाचा ठरत आहे.”
आचार्य लोकेश मुनींजी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुर्यदत्ता शिक्षण क्षेत्रात उत्तुंग काम करत आहे. एकप्रकारे देश घडवण्याचेच हे काम आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच इतिहास उज्वल बनतो.”
रझा मुराद म्हणाले, “सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतो. हे विजेते खऱ्या अर्थाने विजेते आहेत ज्यांच्या कामामुळे समाजाची खऱ्या अर्थाने सेवा होते. त्यामुळे या व्यक्तिमत्त्वांना भेटून प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम माझ्या वहीत नोंदवून ठेवतो आणि न चुकता याला हजेरी लावतो.”
डॉ. विकास आमटे म्हणाले, “कुष्ठरोगी अजूनही सन्मानाने जगण्यासाठी धडपडत आहेत. भारतात ही संख्या मोठी आहे. कुष्ठरोगाचे कारण अद्याप कोणालाही सापडले नाही. ते शोधण्याचे काम वैद्यक शास्त्राने करावे. सुर्यदत्ताने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून यात पुढाकार घ्यावा.”
डॉ. मकरंद जावडेकर म्हणाले, “आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अशा मोठ्या पुरस्कार सोहळ्याचा क्षण अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच मेहनत आणि जिद्द बाळगून काम करायला हवे. त्यातूनच आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकू.”
फरीद शेख म्हणाले, “छायाचित्रण आणि कॅमेऱ्यांचे संग्रहण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वेगवेगळ्या काळात अनेकांना कॅमेऱ्यात कैद करताना आलेले अनुभव यामुळे माझे जीवन अधिक समृद्ध होत गेले. आज या पुरस्काराने माझ्या हातून झालेल्या कार्याचा गौरव झाला असे वाटते.”
डॉ. कमल टावरी म्हणाले, “आयुष्यात नकारात्मक भावना असता कामा नये. सुर्यदत्तामध्ये ऊर्जा देणारे उपक्रम राबवले जात आहेत. जीवनमूल्ये आणि विज्ञान याची सांगड घालत आपण काम केले पाहिजे. त्याला पर्यावरण पुरकतेची जोड हवी. खादीचा वापर वाढणे त्यासाठी गरजेचे आहे.”
मनोरंजन ब्यापारी म्हणाले, “समाजातले अनेक घटक आजही वंचित आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी लढा देत असताना अनेकदा तुरुंगात जावे लागले. मात्र, तुरुंग हे एक विद्यापीठ असून, तिथून अनेक गोष्टी शिकता आल्या.”
द्वारका जालान म्हणाले, “माणसाने सतत सकारात्मक राहिले पाहिजे. हास्य हे आपल्याला जीवनाला आनंदी बनविण्याचा एक चांगला उपाय आहे. काव्य, पुस्तक लेखन आणि इतर अनेक कार्यक्रमांमुळे वेगवेगळ्या व्यासपीठांवर बोललो. मात्र आजचा हा क्षण जीवनातील एक अमूल्य ठेवा आहे.”
राजेश बात्रा म्हणाले, “या ठिकाणी जागतिक पातळीवर काम करणारे व्यक्ती एकत्र आले आहेत आणि हे व्यक्ती भारत घडवण्याचे काम करत आहेत. त्याचबरोबर तरुणांना सर्वच क्षेत्रात प्राविण्य देण्यासाठी कार्य करत आहेत.”
डॉ. नमिता कोहोक म्हणाल्या, “डोक्यावरचा मुकुट पाहून तुम्ही वेगळ्या विचारत पडला असाल. परन्तु हा मुकुट कॅन्सरमधून वाचलेल्या महिलांसाठी आहे. ‘सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास’ कॅन्सरविषयी नेहमी लिखाण करते. कॅन्सरचा उपचार सुरू असताना व्यवसायला सुरुवात केली. जिद्दीने काम करत तीन शाळेपासून सुरू केलेला प्रवास आज १३२ शाळांपर्यंत पोहचला आहे.”
फेरोसिया लोंबर्गीनी म्हणाले, “भारतात व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. भारतात युवकांची संख्या मोठी आहे. आम्हीही भारतात ई-व्हेईकल बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांनी कम्फर्ट झोन सोडून काम करायला हवे. उद्योजक बनण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे.”
महेश नामपूरकर म्हणाले, “येत्या काळात पाण्यावरून महायुद्ध होऊ शकते. त्यामुळे वेळीच आपण पाणीबचतील प्राधान्य द्यायला हवे. हिरवाई बनविण्यासाठी आपण प्रत्येकाने झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी बीडमध्ये पहिले वृक्षसंमेलन होत आहे. त्यातून मोठी जनजागृती होईल.”
डॉ. अर्णब भट्टाचार्य यांनी प्रात्यक्षिकातून विज्ञान दाखवत सांगितले की, “विज्ञान पुस्तकातून शिकवले जाऊ शकत नाही. विज्ञान भावतालचा, जगाचा अभ्यास असतो. या विश्वात आपले अस्तित्व फार छोटे आहे. त्यामुळे आपण आपले वैयक्तिक हेवेदावे विसरून मिळून मिसळून राहिले पाहिजे.”
विमल बाफना म्हणाल्या, “सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण समाजहिताचे काम करायला हवे. त्यासाठी आज ‘सीएसआर’सारखा चांगला उपक्रम आपल्याकडे आहे. अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन भरीव योगदान दिले, तर समाजाची प्रगती अधिक जलदगतीने होईल.” सोमा घोष यांनी हा पुरस्कार सर्वाधिक महत्वाचा असल्याचे नमूद करून आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली.
प्रास्ताविकात डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्वांचा सन्मान करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा हा प्रयत्न आहे. पुरस्काराने सन्मानित या सर्व व्यक्ती आपल्यासमोर प्रेरणेचा एक स्रोत आहेत.” सुधा मल्होत्रा, गोपिका वर्मा, डॉ. रेणू राज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिल्पा भेंडे आणि सिद्धांत चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी आभार मानले.