मुंबई-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून (15 मार्च) मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच 31 मार्चपर्यंत सगळ्या टूर बंद करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी काढले आहे. यामध्ये मुंबई दर्शनसारख्या टूर देखील बंद करण्यात आल्या आहेत.
पुणे,मुंबईसाठीचे निर्देश राज्यभरात लागू
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे, मुंबईतील चित्रपटगृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे, शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान हे निर्देश आता राज्यभरासाठी लागू करण्यात आले आहेत. तसेच राज्यात पुढील आदेश येईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायिक, यात्रा, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
कोरोनामुळे देशात दोघांचा मृत्यू
कोरोनामुळे भारतात दोघांना प्राण गमावावे लागले. शनिवारी दिल्लीतील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी कर्नाटकातील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.