मुंबई: मेगाभरतीमुळे भारतीय जनता पार्टीचे नुकसान झाले असे विधान आपल्या नावे प्रसिद्ध करण्यात आले असून हा आपल्या विधानाचा विपर्यास आहे. भाजपाच्या आकुर्डी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आपण केलेल्या भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध असून अशा बातम्या देण्यापूर्वी पत्रकारांनी शहानिशा करायला हवी, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी मुंबईत केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बातचित करत होते. यावेळी माजी मंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार तसेच भाजपा प्रदेश सचिव संजय उपाध्याय आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आपण आकुर्डी येथे उपस्थित होतो. जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले की, विविध पक्षातील नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना त्या त्या पक्षांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षाची कार्यपद्धती समजून सांगावी. पण आपल्या या विधानाचा माध्यमांकडून विपर्यास करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांतील व्यक्तींनी त्यांच्या मनातील विचार आपल्यावर थोपवू नयेत.
ते म्हणाले की, 2014 व 2019 च्या लोकसभा – विधानसभा निवडणुकांच्या वेळी अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्या नेत्यांचा पक्षाला उपयोगच झाला आहे. पक्षाच्या बळकटीमध्ये त्यांचे योगदान झाले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय कोअर कमिटीने विचारपूर्वक आणि एकमताने घेतला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अभिमानच आहे.
त्यांनी सांगितले की, अन्य राजकीय पक्ष हे एखादा नेता किंवा घराण्याचे असतात. पण भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपाची कार्यपद्धती इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे. येथे विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात. पक्षाची ही कार्यपद्धती जुन्या कार्यकर्त्यांनी नव्यांना सांगावी अशी माझी सूचना आहे. मला आनंद आहे की, भाजपामध्ये नव्याने आलेल्या नेत्यांनी पक्षाची कार्यपद्धती अंगिकारली आहे.