मुंबई- आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना ,संविधान मानणारे आहोत ,भारतीय संविधानाने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे. जर महाविकास आघाडी धर्माच्या आधारावर जर मुस्लिम समाजाला आरक्षण देणार असेल तर आम्ही त्याला विरोध करु, अशी ठाम भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीकडून भाजपला चहापानाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. पण, भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. “सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपापसांतच सुसंवाद नाही. त्यामुळे त्यांनी आधी आपसांत संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी, सुसंवादासाठी बोलवावे,” असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
यावेळी फडणवीस म्हणाले की, “सरकार स्थापन झाल्यापासून जे काही काम काज पाहायला मिळात आहे, त्यामध्ये असे दिसले की सरकारला अजून दिशा गवसलेली नाही. सरकार अजूनही गोंधळात आहे. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी चहा पान करुन सुसंवाद साधायला पाहिजे आणि मग विरोधी पक्षांशी संवाद साधायला हवा. कर्ज माफी नाही, तर कर्ज मुक्ती, अशी युक्ती केली आहे. दिशाभूल करण्याचे काम कर्ज माफीमध्ये सुरू आहे. या कर्ज माफीमध्येसुद्धा आधारच्या अकाउंटशी लिंक करायची आहे आणि मग अकाऊंट नंबर द्ययाचे आहेत. इतर माहिती द्ययाची आहे, ” असा आरोप फडणवीसांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “आपले सेवा केंद्रावर आम्ही व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती. तेव्हा आम्हला नाव ठेवत होते, मात्र आता ते सुद्धा हेच करत आहेत. आम्ही जी कर्ज माफी दिली होती, त्या पलीकडे हे सरकारे काही करत नाही. तूर खरेदी नीट पद्धतीने होत नाही, भात खरेदीमध्ये भ्रष्ट्राचार होत आहे. याबाबत केंद्र सरकारला आम्ही तक्रार करणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही लोकांचा पगडा दूर झाला पाहिजे आणि शेतकरऱ्याला पण मतदान करता आले पाहिजे. महिला सुरक्षा चा प्रश्न उचलणार आहोत. जी संवेदनशीलता दिसली पाहिजे, ती दिसत नाही. कारण पोलिस विभागचे मनोधैर्य खचवले जात आहे,” असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
“वॉटर ग्रीड स्थगिती असो, राष्ट्रीय पेय जल योजनेला दिलेली स्थगिती असो, रस्त्यांना स्थगिती, जलयुक्त शिवार योजना गुंडाळली आहे. जी कारणे दिली जात आहेत, ती योग्य नाही. ही एक वैज्ञानिक योजना आहे. या योजनेत थातूर मातूर बदल करुन हे तीच योजना पुन्हा आणतील. शिवाजी महाराजांच्या अवमान होत आहे. सरकार काहीही बोलायला तयार नाही. खुर्चीसाठी किती वेळ गप्प राहतील. वंशजांना पुरावे मागितले जात आहेत. काँग्रेस वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करत आहे. मध्य प्रदेशातील ज्याप्रकारे सावरकरांचा अपमान झाला. हे ते सहन करणार असतील, तर त्यांनी करावे. मात्र, आम्ही आणि जनता सहन करणार नाही. 26 तारखेला सावरकरांचा गौरव झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे,” असा फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेतील महत्वाचे मुद्दे
-आधी स्वतः आपसात सुसंवाद करावा
-नंतर विरोधी पक्षांशी संवाद साधावा: देवेंद्र फडणवीस
-अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही.
-ज्या आमच्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत यांनी आत्मसात केली. शेतकऱ्यांची मोठी फसवणूक: देवेंद्र फडणवीस
-केवळ पीककर्ज यांनी समाविष्ट केले.
-त्यामुळे शेडनेट, पशुपालन असे सर्व प्रकारचे कर्ज या नव्या कर्जमाफीत समाविष्ट नाही, जे आमच्या काळात समाविष्ट होते: देवेंद्र फडणवीस
-महिला अत्याचार तर पराकोटीला गेला आहे.
-पोलिस दलाचे खच्चीकरण केल्यामुळे त्यांचे मनोबल घटले आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू: देवेंद्र फडणवीस
-सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार वाढला आहे.
-जलयुक्त शिवार सरकार बंद जरूर करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही: देवेंद्र फडणवीस
-दोन बाबींसाठी मला मुख्यमंत्री उद्धवजी यांचे अभिनंदन करायचे आहे. एनआयएकडे तपास आणि सीएए या दोन्ही बाबतीत त्यांनी परखड भूमिका घेतली: देवेंद्र फडणवीस
-स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. ‘शिदोरी’ मासिकावर कारवाई करावीच लागेल. इंदिराजींबाबत 10 मिनिटात माफी मागणारे सावरकरांबाबत मौन का? : देवेंद्र फडणवीस
-जनगणनेचा कायदा कठोर आहे.
-प्रश्नावली ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे: देवेंद्र फडणवीस
-भीमा कोरेगाव आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
-तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य: देवेंद्र फडणवीस
-जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही.
-जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न.
-सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केले, मी त्यांचे अभिनंदन करतो: देवेंद्र फडणवीस
-1999 पासून ते 2019 पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर सर्व निकष दाखवीत श्वेतपत्रिका नक्की काढली पाहिजे.
-खरे चित्र जनतेपुढे येईल: देवेंद्र फडणवीस
-राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
-मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, हेही त्यांना ठावूक आहे. तेथे ट्रस्ट नसतो
-सद्या मुस्लिम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे: देवेंद्र फडणवीस
-थेट निवडणूक असली की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. त्यामुळेच त्या रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. सरपंच निवडणूक थेट घेण्याचा निर्णय आम्ही सुद्धा सरपंच परिषदेच्या शिफारसीवर घेतला होता: देवेंद्र फडणवीस