मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी आज पुन्हा नाट्यमय वळण घेतलं. राष्ट्रवादीतून फुटून भाजपशी हातमिळवणी करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारांनी सोडलेली साथ आणि पवार कुटुंबीयांच्या मनधरणीनंतर अजितदादांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारला विरोध असलेल्या अजित पवार यांनी अचानक भाजपशी हातमिळवणी केली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्याचं पत्र गटनेते या नात्यानं दाखवून त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्या आधारे राज्यपालांनी भाजप-राष्ट्रवादी (अजितदादा गट)चा सत्तास्थापनेचा दावा करून त्यांचा शपथविधीही घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले होते. मात्र, अजित पवारांच्या निर्णयाशी संबंध नसल्याचं राष्ट्रवादीनं जाहीर केलं. तसंच, अजित पवारांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती.