मुंबईः राज्यात आज राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक असून या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या एका गटाने भाजपला पाठींबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीतील २२ आमदारांचा पाठींबा असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले. अजित पवारांचा हा निर्णय वैयक्तीक असून या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.