
पुणे-:शेतकरी संप दुसऱ्या दिवशी देखील अधिक तीव्र झाला . पहिल्या दिवशी येवला तालुक्यात झालेल्या उद्रेकानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी अटकसत्र सुरु केले. शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवसाला मुख्यमंत्र्यांच्या पुतळा दहनाने सुरुवात झाली. सायंकाळी निफाड तालुक्यातील पालखेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. किसान क्रांती कोअर कमिटीने ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मुंबईवगळता महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली असून बंदाच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील असे कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील पूणतांबा येथे किसान क्रांती कोअर कमिटीची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे आंंदोलन आणखी तीव्र करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील जनतेवर सरकारने हा संप लादला असून हा संप टाळता आला असता असा दावा शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत केला. ६ जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार असून ७ जूनला आमदार व खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशाराही संघटनांनी दिला आहे.५ जून रोजी महाराष्ट्र बंद असून मुंबईवगळता संपूर्ण राज्यात हा बंद असेल असे ते म्हणालेत. बंदच्या दिवशी रुग्णालय, मेडिकलची दुकाने, अग्निशमन दलाच्या गाड्या यांना मुभा असेल. सरकारी कार्यालय आणि शाळा बंद राहतील असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.जनतेने एक दिवस शेतकऱ्यांसाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.दरम्यान शेतकऱ्यांच्या संपाला मुंबईतील गिरणी कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. शनिवार म्हणजे 3 जून रोजी सायंकाळी 4 ते 5 दरम्यान करी रोड येथे कामगारांकडून निदर्शनं केली जाणार आहेत .

पुण्यातील मार्केटयार्डात आज फक्त १० टक्के मालाची आवक झाली आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्केटयार्डात शुकशुकाट पाहावयास मिळाला. तसेच उद्या मार्केटयार्ड बंद असल्याने अजून भयाण पारिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मार्केडयार्डात दररोज १३०० ट्रक घेऊन माल येत असतात. मात्र आज ११० ते १३० मालाचे ट्रक आले. त्याचबरोबर मार्केटयार्डात १० टक्के मालाची आवक झाली आहे
बारामती तालुक्यातील सुपे येथे शेतकरी आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. एपीआय सचिन पाटील यांनी लाठीमार केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकरी संपाच्या समर्थनार्थ सकाळपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. आंदोलन संपत असताना पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी जुन्नर बाजार समितीच्या येथील उपबाजारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी उपबाजारात फळ व भाजीपाला विक्रीसाठी आला नाही. शेतकऱ्यांनी दूध संस्थांकडे पाठ फिरवल्याने तालुक्यातील एकशेवीस दूध संस्थांनी शुक्रवारी दूधसंकलन बंद ठेवले.
वाशिम रिसोड तालुक्यातील मोप येथे शेतकऱ्यांनी रस्तारोको करुन शेतकरी संपाला पाठिंबा दिला. त्यामुळे रिसोड-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर हराळ गावातही शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला.
शेतकरी संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशी नंदुरबार बाजार समितीत पाहण्यास मिळाला. नंदुरबारच्या भाजीपाला बाजारात येणारी आवक 90 टक्के कमी झाली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याचा दरावर झाला असून भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले आहेत.
शेतकरी संपात चंद्रपूर येथील शेतकरी संघटनाही उतरणार आहे. 4 जून रोजी तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट येथे तेलंगणातून येणारा दूध, भाजीपाला रोखण्यात येणार आहे. शेतकरी संघटना नेते वामनराव चटप यांनी ही माहिती दिली.
बुलडाणा येथे प्रहार संघटनेने दूध फेको आंदोलन करत शेतकरी संपात सहभाग घेतला. दहा हजार लीटर्सचा टँकर रस्त्यावर रिकामा करण्यात आला.नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटना आणि विदर्भवाद्यांनी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजी आणि कांदे फेकून सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात दूध फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदेंना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईत माथाडी कामगारांनी आंदोलन केलं. कांदा, बटाटा मार्केट, मसाला मार्केट बंद पाडण्याचा केला प्रयत्न. नवी मुंबई एपीएमसीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं.
अहमदनगरला शेतकरी संपात सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर आणि रामदास घावटे यांना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतलं.दरम्यान अहमदनगरला शेतकरी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. नगर मार्केटला भाजीपाल्याची केवळ 5% आवक झाली. शेतकऱ्यांनी शेतमाल मार्केटला आणलाच नाही. आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. परवाच्या तुलनेत घाऊक बाजारात 50 टक्के दरवाढ तर किरकोळ दरात 60 ते 70 टक्के दरवाढ झाली आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यात मार्केट यार्डला भाजीपाल्याची 1 लाख 40 हजार क्विंटल आवक होती. मात्र आज साधारण 4 हजार क्विंटल आवक झाली.
औरंगाबाद जवळील आडगावच्या शेतकऱ्यांनी दूध मोफत वाटप करत अनोखं आंदोलन केलं. दूध रस्त्यावर ओतून दिलं तर वाया जातं म्हणून दूध वाया जाण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेलं पाहिजे, या भावनेतून शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटप केलं.
सोलापूर मध्ये भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जनहित शेतकरी संघटनेने मोहोळ शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. शेतकऱ्यांच्या संपाबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांनी संप केल्यास भाजीपाला आयात करण्याच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यातं आलं.
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावात उद्रेक पाहायला मिळाला. मात्र डांगसौदाणे गावाने वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारची तिरडी घेऊन गावकऱ्यांनी अंत्ययात्रा गावभर फिरवली. सय्यद पिंपरी येथे दूधाने भरेल्या टँकरच्या तोट्या उघडून 12 हजार लिटर दूध ओतून देण्यात आले. दुसरीकडे, मालेगाव तालुक्यात एका शेतकऱ्याने एका वस्तीवर जाऊन गरीब मुलांना दूधाचे मोफत वाटप केले.

