मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील, अशी साधी अपेक्षा होती. मात्र, भाजपने ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीच थांबली आहे. संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, आता आठ वाजून गेल्यानंतरही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतिक्षा करायची झाल्यास राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु व्हायला आणखी दोन-तीन तासांचा अवधी लागू शकतो. आणखी काही राज्यांमध्येही भाजपच्या भूमिकेमुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी खोळंबली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. शिवसेना आमदार सुहास कांदेंनी देखील तीच चूक केली. त्यामुळे मविआच्या तीनही आमदारांचं मत बाद केलं जावं, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत.
संजय राऊत यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. राऊत यांनी अजय माकन यांनी हरियाणातील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. भाजपने खालच्या दर्जाचे राजकारण करत राज्यसभेची मतमोजणी रोखून धरल्याचे माकन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांनी यावर रिप्लाय देत म्हटले आहे की, महाराष्ट्रातही हाच खेळ सुरु आहे. खालच्या दर्जाचे राजकारण, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!, असे आणखी एक ट्विटही संजय राऊत यांनी केले आहे.

