औरंगाबाद- जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि इतर सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘राज्याच्या आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे’, अशी माहिती टोपे यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, ‘आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मेरिटवर थेट भरती करण्याला परवानगी मिळाली असून, राज्यात 17 हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत,’ अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच, राज्यातील मृत्यूदराबाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘राज्यात कोरोना परिस्थिती सकारात्मक आहे. धारावी, मालेगाव झिरोवर आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील स्थिती सुधारत आहे. आमचा प्रयत्न हा मृत्यूदर कमी करणे आहे आणि त्यात यश मिळत आहे’, असेही टोपे यावेळी म्हणाले.
कोरोनाच्या संकटात काम करावंच लागेल- शरद पवार
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. असं तज्ञांच मत आहे. अशा वेळी सरकारी डॉक्टरांची जास्त गरज असणार आहे. तेव्हा खासगी डॉक्टरांनाही सरकारी करावंच लागेल, त्यांना या कामात पूर्णपणे लक्ष द्यावं लागेलं. यासोबतच रुग्णांना नकार देण्याचे प्रमाणही राज्यात वाढले आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, या कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांनीही डॉक्टरांनी पूर्ण सहकार्य करायलाच हवे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडे मदत मागितली तर त्यांना मदत मिळायलाच हवी. कोणी देत नसेल, तर हॉस्पिटल ताब्यात घेऊन समन्स देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. राज्यात सध्या बेड वाढवण्याची गरज आहे. ही एक कमतरता आहे. खासगी डॉक्टरांना या आजारात साथ द्यावी लागणार आहे.