मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या पावसाळ्यात बारवी धरणासंदर्भात विशेष खबरदारी घेतली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आपत्ती ओढवू नये यासाठी ओव्हर फ्लो होण्याआधीच ( Hydro Generation ) जलविद्युत निर्मितीसाठी पाण्याचा वापर केला, त्यामुळे गावांच्या दिशेने होणारा पाण्याचा फुगवटा कमी झाला आणि रस्ते पाण्याखाली जाण्याचे टळले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री. देसाई म्हणाले, कोळेवडखळ या गावाला असलेला पुराच्या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन इथे होड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुराच्या पाण्याच्या अभ्यासासाठी पहिल्यांदाच ड्रोनने सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. रात्रंदिवस सतर्क राहणारे पथक रेस्क्यू टीम (Rescue Team) कार्यरत आहे. आपत्कालीन मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 180 023 343 96 कार्यान्वित करण्यात आला आहे. तर, मुरबाड येथे आपत्कालीन केंद्रही तयार करण्यात आले आहे. या साठी dmcellbarvidam@midcindia.org या ई मेल पत्त्यावर संपर्क साधता येणार आहे.
बारवी धरणातून पाणी ओव्हरफ्लो झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील अनसोली, राहतोली, चोण, सागाव, पाटीलपाडा, चंदनपाडा, पादिरपाडा, पिंपळोली, करंद या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय तोंडली, काचकोली व संलग्न पाडे, मोहघर, कोळेवडखळ, मानिवली, सुकाळवाडी हे अतिबाधित होत असून येथे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणीही विशेष काळजी घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात नदीच्या बाजूस तात्पुरते बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत.
तोंडली येथील 286 कुटुंबाना खावटी खर्च देण्यात आला आहे. यात एकवेळ खर्च म्हणून रु.10 हजार, किराणा मालासाठी रु. 5 हजार आणि मिनरल वॉटरसाठी रु. 2 हजार 790 धनादेशाद्वारे देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे काचकोली पाडयांसाठीही खावटी खर्च देण्यात आला आहे. जुलै महिन्याचा हा खर्च अदा करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास ऑगस्ट व सप्टेंबर पर्यंत हा खावटी खर्च देण्यात येईल.
पूरग्रस्त घरातील 20 परिवारांना मुरबाड येथे भाडयाच्या घरात हलविण्यात आले आहे. तर 45 लोकांना लोवर तोंडली येथील तात्पुरत्या शेडमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच तेथील अडचणींचा विचार करता व लोकांच्या मागणीनुसार त्यांना तोंडली गाव येथे नवीन 45 शेड बांधून स्थलांतरित करण्यात येणार आहे. या शेडचे बांधकाम सुरु आहे. त्याचप्रमाणे काचकोली येथे लोकांच्या मागणीनुसार 19 शेडचे बांधकाम सुरु आहे.
इतर भागातील लोकांसाठी तात्पुरते शेडस् उभारण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी वीज, डी.जी.सेट, पिण्याचे पाणी आणि वाहनांची 24 तास सज्जता ठेवण्यात आली आहे. तोंडली व कोचकोली येथील उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत त्यांना शौचालय व बाथरुमची व्यवस्था करण्यात येत आहेत. काचकोली येथील जांभुळवाडी व कोळेवडखळ येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सर्व मोहिमेत जिल्ह्याची महसूल यंत्रणा संपूर्ण सहकार्य देत आहे.