पुणे :- आषाढी वारीत अन्न सुरक्षा व स्वछता अभियान राबवणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले. श्री क्षेत्र देहू येथे पालखी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या, श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांच्या प्रबोधनासाठी ” परिवर्तन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान” सुरु करण्यात आले आहे. या्अभियानाद्वारे दोन चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
देहू, आळंदी येथून निघणाऱ्या पालख्यांमध्ये महाराष्ट्रासह विविध प्रांतातून मोठया प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. या पालखीसोहळा कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल, रेस्टॉरंट, फिरते विक्रेते हे अन्न पदार्थांची विक्री करत असतात. तसेच या कालावधीत सेवा भावी संस्था, सेवाभावी व्यक्ती, भाविकांना अन्न पदार्थ मोफत देत असतात. या अभियानाच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्नछत्राच्या तपासण्या करून वारकरी व भाविकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न व्यावसायिकांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर अन्न प्रशासन, कोकाकोला इं. लि. आणि नेस्ले इं. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षेबाबत तज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. या अन्न व्यावसायिकांना हातमोजे, टोपी,अॅप्रन,आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

