पुणे- आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन निधी संकलन होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. गतवर्षी ध्वजदिन संकलनाची उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच यंदाही ध्वजदिन संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद दे. तुंगार,जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राव म्हणाले, माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबिय यांच्या कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी ध्वज दिन निधीचे संकलन केले जाते. लष्करी अधिकारी, जवान आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता देश आणि आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना सैनिक सण, समारंभ, कार्यक्रम यांचा काहीही विचार न करता ते देशाच्या सेवेत कार्यरत असतात. अशा लष्करी अधिकारी-जवानांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सैनिकांचे आपल्यावर ऋण आहे, या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, त्यामुळे जबाबदारीच्या भावनेतून ध्वज निधी संकलन करण्याच्या सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्हाधिकारी राव यांनी सर्व सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद दे. तुंगार यांनी केले. ते म्हणाले, पुणे जिल्ह्याला गतवर्षी 2 कोटी 22 लाख रुपयांचे उद्दिष्ट होते, ते 2 कोटी 80 लाख इतके साध्य करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधीचे संकलन करण्यास सुरूवात करण्यात आली. दीपप्रज्वलनानंतर शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद दे. तुंगार यांनी केला.
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष कामगिरी करणा-या सैनिक, माजी सैनिकांच्या पाल्यांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये राजीव रमेश सांगळे, शैलेश हनुमंत गरड, तुषार शिंदे, तेजश्री सुनिल काळे, शुभदा सतीश जगदाळे, सोनाली सर्जेराव भोसले, प्रणय रामदास तिरखुंडे, शिवम सुधाकर बुनगे, सायली जालिंदर खांदवे, विवेक विश्वास वागज, अंकित मोहन सारुक आदींचा समावेश होता. सूत्रसंचालन प्रियंका कुटे यांनी केले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, सैनिकी मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थी यांच्यासह डॉ. शशी कांबळे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विलासराव सावंत, कृष्णा वाघमारे, दीपक मोरे आदी उपस्थित होते.