नवी दिल्ली-
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज ‘तेहखंड वेस्ट टु एनर्जी प्लांट’ ह्या दिल्ली महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. ह्या कार्यक्रमाला, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारताच्या राजधानीत स्वच्छता अभियान राबवून, ह्या राजधानीला कचरामुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्याची उत्तम संधी आपल्याला आज चालून आली आहे, असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर, दिल्लीत, दररोज सुमारे 7000 मेट्रिक टन कचऱ्याचे विघटन करण्याची क्षमता निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. ह्या प्रकल्पात, दररोज, 2000 मेट्रिक टन कचऱ्याचे वर्गीकरण करुन,तो जाळला जाईल, आणि त्यातून हरित ऊर्जेची निर्मिती केली जाईल, अशी माहिती शाह यांनी दिली. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट तर लागेलच, शिवाय 25 मेगावॉट हरित ऊर्जा देखील निर्माण होईल.
दिल्ली महानगर पालिकेने अनेक उड्डाणपूल, रस्ते, बोगदे, कचऱ्यापासून वीज निर्मिती केंद्रे, 150 टन भंगारापासून पार्क्स बनविले आहेत आणि कचऱ्याचे सोने केले आहे, असे अमित शाह म्हणाले. सौर उर्जेवर चालणाऱ्या एलईडी दिव्यांसाठी अनुदान दिले जात आहे. हे अनुदान पंतप्रधानांच्या नेतृत्वातील सरकार देत आहे, असे शाह यांनी सांगितले. आता दिल्लीच्या लोकांनी हा निर्णय घ्यायचा आहे की त्यांना जाहिरातींचे राजकारण हवे आहे की विकासाचे राजकारण हवे आहे, प्रसिद्धीचे राजकारण हवे आहे की, बदलाचे राजकारण हवे आहे, भ्रष्टाचाराचे राजकारण हवे आहे की, पारदर्शकतेचे राजकारण हवे आहे, असेही ते पुढे म्हणाले.
वर्ष 2025 पूर्वी दिल्ली स्वच्छ करण्याच्या दिशेने आज एक फार मोठे पाऊल टाकण्यात आले आहे, रोज तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम दिल्ली महानगरपालिका पूर्ण करेल, जेणेकरून कचऱ्याचे डोंगर नाहीसे होतील आणि दिल्ली अधिकच सुंदर होईल, असे अमित शाह यांनी संगितले.