पुणे- महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखडा करण्यासंदर्भात महापालिकेची खास सभा गुरुवारी महापौर आणि सभागृहनेते यांनी बोलविली या पार्श्वभूमीवर राजकारणामुळे २३ गावांच्या विकासाला खीळ बसू नये असे आवाहन महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी केले आहे.
या संदर्भात त्यांनी म्हटले आहे कि ,’ महानगरपालिकेच्या हददीत नुकताच २३ गावांचा समावेश झालेला आहे. यामुळे पुणे शहर हे भौगोलिकदृष्टया राज्यातील सर्वात मोठे शहर बनलेले आहे. २३ गावांचा महानगरपालिका हददीत समावेश होणेपूर्वी पीएमआरडीए कडून प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. हा जवळपास अंतिम टप्प्यात असताना सदर २३ गावे महानगरपालिका हददीत समाविष्ट झाली. त्यामुळे सदर २३ गावांचा विकास आराखडा पीएमआरडीएला प्रसिध्द करता येणार नाही. पीएमआरडीए अधिकारी व त्यांचे (शासकीय अधिकारी) तज्ञ टाऊन प्लॅनर यांनी प्रारूप विकास आराखडा तयार केला असून यासाठी मोठा अवधी व मोठया प्रमाणात खर्च देखील झालेला आहे.
यापूर्वी ११ गावांचा समावेश महानगरपालिकेच्या हददीत झाला असून या गावांचा विकास आराखडा आजही प्रलंबित असून भाजप हा विकास आराखडा करू शकली नाही. ११ गावांतील नागरिक यामुळे खंत व्यक्त करीत आहेत.
आता नव्याने सदर 23 गावांचा विकास आराखडयाबाबत कार्यवाही करताना 23 गावाच्या विकासावर विपरित परिणाम हाेणार नाही याची दक्षता घ्यावी. पूर्वी पीएमआरडीए ने केलेला प्रारूप विकास आराखडा घेवून त्यामध्ये पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या मार्फत शहराच्या विकासाच्या दृष्टीने योग्य ते बदल करून नागरिकांच्या हरकती व सूचनांकरिता प्रसिध्द करण्यात यावा. तदनंतर हा मुख्य सभेच्या मंजूरीने राज्य शासनास पाठविण्यात यावा. 23 गावांचा विकास आराखडा अंतिम झाल्यावरच 23 गावांच्या विकासाला ख-या अर्थाने न्याय मिळेल. 23 गावांच्या विकासाच्या बाबतीत उचित कार्यवाही न झाल्यास 23 गावे बकाल झाल्याशिवाय राहणार नाहीत.
भाजप सत्ताधारी पक्षाकडून 23 गावांचा विकास आराखडा तयार करणेसाठी इरादा जाहिर करणेबाबत मुख्य सभा बोलाविली आहे. ऑनलाईन मतदान घेता येणार नाही असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असताना बहुमताच्या जोरावर निर्णय घेता येणार नाही, याचे भान ठेवून 23 गावांच्या हिताच्या दृष्टीकोनातून निर्णय होणेसाठी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना विश्वासात घेवून काम करणे आवश्यक आहे. असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे .