पुणे : धनकवडी -सहकारनगर क्षत्रिय कार्यालय अंतर्गत कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त दाखविल्याचा दावा आज राष्ट्रवादीचे धनकवडीतील नगरसेवक विशाल तांबे यांनी केल्याने खळबळ उडाली.महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्याकडील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडून प्रसिद्ध होणाऱ्या मॅपमधील आकडेवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे तांबे यांनी सांगितल्याने आकडेवारी पुन्हा-पुन्हा तपासण्याचा आदेश स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका, स्मार्ट सिटीतील अधिकाऱयांबरोबर 30 एप्रिल रोजी बैठक आयोजित केली होती. त्यामुळे त्या दिवशी स्मार्ट सिटी प्रशासनाने नकाशा प्रसिद्ध केला नाही. मात्र, 1 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या नकाशात धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील चार प्रभागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 64 वरून 121 वर पोचल्याचे दिसून आले. सुमारे 57 रुग्ण कोठून वाढले, असा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींना पडला.
स्थानिक नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून, आरोग्य विभागाकडून आकडेवारी गोळा केली तेव्हा या चारही प्रभागांतील रुग्ण संख्या सुमारे 70 असल्याचे दिसून आले. त्यांची यादीही त्यांनी मिळविली. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाकडे 121 रुग्णांबाबत विचारणा केली असता, ते खुलासा करू शकले नाही. तांबे यांनी हे तपशील ‘सकाळ’कडे दिले.
याबाबत अग्रवाल यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, आकडेवारीच्या संकलनात काही वेळा त्रुटी राहू शकतात. त्यामुळेच त्यांची पुन्हा-पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत. आकडे नेमके स्पष्ट झाल्याशिवाय नकाशा प्रसिद्ध केला जाणार नाही. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाबाबत नेमका प्रकार काय झाला आहे, याची खातरजमा केली जाईल.
नगरसेवक तांबे म्हणाले, कोरोनाची रुग्ण संख्या 64 असून ती एकदम 121 वर कशी पोचली, याचा शोध घेतला असता, आकडेवारीत गफलत झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्याच आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या आमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंर्तगत राहणारे 70 रुग्ण आहेत. त्यात प्रभाग 35 मधील 44, 39 मधील 12, 40 मधील 6, आणि 42 मधील 8 रुग्ण आहेत. मात्र, स्मार्ट सिटीच्या नकाशात 124 रुग्ण कसे काय दाखविण्यात आले, याबद्दल आश्चर्य वाटत आहे. म्हणूनच त्या बाबत आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.