पुणे : आपण जे शिक्षण घेत आहोत ते समजून घेण्याची आवड, मानसिकता आणि कौशल्य असेल तरच त्या क्षेत्रात उत्तम करिअर होऊ शकते. आपल्या ज्ञानाबरोबरच बाजारात कशाची मागणी आहे हे समजून ती गोष्ट उपलब्ध केली तर आपला समाजाला फायदा होतो. स्वत:चे कौशल्य काय आहे, हे जाणून घेऊनच करिअरची निवड करावी, असे मत प्रसिद्ध फॅशन डिझायनर राघवेंद्र राठोड यांनी व्यक्त केले.
२१व्या शतकातील फॅशन डिझायनिंग क्षेत्राचे शैक्षणिक महत्त्व आणि त्याच्या बदलत्या प्रभावामुळे मानवी जीवनावर पडणारे विविध पैलू याविषयी प्रसिद्ध फॅशन डिझायनर राघवेंद्र राठोड यांनी आज पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हॉटेल जे डब्ल्यु मेरियट येथे या कार्यक्रमाचे गुरुकुल फॅशन डिझायनिंग स्कूलतर्फे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र वेगळं आहे. या क्षेत्राची गरज ओळखून काम करण्याला विशेष महत्व आहे. विद्यापीठात शिक्षण घेणे महत्वाचे असले तरी त्या शिक्षणाचा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किती उपयोग करता येईल. याचा विचार करुन काम केले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रातले शिक्षण घेत असताना पाच वर्षानंतर त्याचा स्वत:ला आणि समाजाला किती फायदा होणार आहे, याचाही विचार व्हायला हवा, असेही राठोड म्हणाले.
सर्वसाधारणपणे बाजारात जे मिळते त्याकडे लोकांचा कल नसतो. प्रत्येक वेळी समाजाच्या वेगळ्या मागण्या असतात. त्या मागण्यांची पूर्तता करता आली, तर फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर होऊ शकते. ज्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल स्कूल ऑफ डिझाईन सुरु करण्यात आले आहे. ज्यामध्ये समाजाच्या मागण्यांचा पूर्ण अनुभव घेऊन फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील शिक्षण दिले जाते. फॅशन, टेक्सटाईल, ग्राफीक, संवाद कौशल्य, मार्केटींग आदी विषयांबाबत प्रात्यक्षिकांसह शिक्षण दिले जाते, असेही राठोड म्हणाले.