मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कोणाच्याही घराबाहेर आंदोलन करणं योग्य नसल्याचं म्हटलं असल्याने अप्रत्यक्षपणे त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर नाराजी जाहीर केली आहे. “नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाचीच भूमिका आहे,” असं सूचक विधान नवाब मलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे.“काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेत्यांच्या घराबाहेर आंदोलन कऱण्याची घोषणा करण्यात आली होती. ती भूमिका योग्य नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन करणं योग्य नाही. हा नवीन पायंडा म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी, हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण करण्यासारखं असून योग्य नाही,” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “लोकशाहीत विरोध करणं अधिकार असताना सरकारने, प्रशासनाने, कोर्टाने निश्चित करुन दिलेली जागा आहे. परवानगी घेऊन आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. ही नवीन सुरुवात असून योग्य नसून सर्व राजकीय पक्ष, नेत्यांनी फारकत घेतली पाहिजे अशी माझी आणि पक्षाची भूमिका आहे. यामुळे प्रशासन, पोलीस यंत्रणेवर ताण पडून वेगळी परिस्थिती निर्माण होते. यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाने पक्षांतर्गत बैठक घेऊन अशा प्रकारे आंदोलन नको असा निर्णय घेतला पाहिजे”.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानापुढे करण्यात येणारं आदोलन काँग्रेसने स्थगित केलं आहे. या आंदोलनाला भाजपानेही हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असं आव्हान दिलं होतं. दरम्यान आंदोलनासाठी निघालेल्या नाना पटोले यांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन स्थगित केलं. यावेळी काही कार्यकर्ते फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर पोहोचले होते. पण पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.