नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. आता याबाबतच्या अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर आता अवघ्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे. न्या. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यासाठी कोर्टात आणि सरकारकडे अनेकांनी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला आता यश आले आहे.
आज सुप्रीम कोर्टात न्या. खानविलकर, न्या. रविकुमार आणि न्या. माहेश्वरी या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर बैलगाडा शर्यतीबाबत सुनावणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी राज्य सरकारच्यावतीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडली.
नियमांचे पालन करणार
राज्य सरकारने बैलगाडा सशर्त सुरू करण्यासाठी जोर लावला होता. याला आता सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर बैलगाडा चालक, मालक, शेतकरी वर्गातून याचे स्वागत करण्यात येत आहे. याचा पाठपुरावा करणारे विद्यमान खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, यांसह राज्य सरकारमधील विविध मंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जी सशर्त परवानगी दिली आहे, त्या नियमांचे पालन होईल, अशी ग्वाहीही देण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे,शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, मंत्री सुनील केदार, दिलीप वळसे-पाटील, चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या आहेत नियमावली
- या निर्णायानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे आर्धी लढाई राज्याने जिंकली.
- कोर्टाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करून शर्यती योजनेला परवानगी
- बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
- शर्यती दरम्यान बैलांना क्रुरतेने वागणूक दिली जाणार नाही.
- राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन बंधनकारक असेल.