पुणे-राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याची टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
मुळीक यांनी पुढील बाबींकडे शासनाचे लक्ष वेधले आहे
- राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून शहराला वार्यावर सोडले आहे
- गेल्या दीड महिन्यात पालकमंत्र्यांनी पुण्यात येऊन केवळ दोन बैठका घेतल्या आहेत.
- अधिकार्यांना ते निर्देश देत असतील याची सुतराम शक्यता नाही, अन्यथा अधिकार्यांनी काढलेल्या आदेशांमध्ये एकवाक्यता दिसली असती.
- जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सात आयएएस अधिकारी नियुक्त आहेत, परंतु त्यांच्या जबाबदार्या निश्चित केलेल्या नाहीत.
- अधिकार्यांतील समन्वयाच्या अभावामुळे पुणेकरांमध्ये असुरक्षितता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- बी. जे. मेडिकल वैद्यकिय महाविद्यालयाच्या (ससून सर्वोपचार रुग्णालय) अधिक्षकांची बदली केल्यानंतर तिथे पूर्णवेळ अधिक्षक नियुक्त केलेला नाही. त्यामुळे अजूनही ससूनमधील कोरोनाची स्थितीत कोणताही बदल झालेला नसून, ती अधिक गंभीर होत आहे.
- रेशनिंग दुकानातील शिधावाटप वितरण प्रक्रियेतील गोंधळ वाढला असून, अजूनही नागरिकांना धान्य उपलब्ध होत नाही.
- बांधकाम मजूरांना जाहीर केलेले अर्थसहाय मिळालेले नाही.
- कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जात आहे. पोलीस दलातील कर्मचार्यांचे कोरोनामुळे मृत्यू होण्याची चिंताजनक घटना घडली आहे.
- दारूची दुकाने खुली केल्यामुळे याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे त्यामुळे प्रादूर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.
कोराना संसर्गामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणेकरांचे हित लक्षात घेऊन आवश्यक असणारे मोठे निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासकीय गतीमानता, प्रशासकीय अधिकार्यांतील समनव्य आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.