पुणे–जगात सर्वात मोठी म्हणून ज्या अमेरिकेच्या बराक ओबामांच्या हेल्थकेअर योजनेची गणती झाली त्या ओबामांच्या योजनेहून मोठी योजना भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली , ओबामांची योजना १० कोटी जनतेला आरोग्य सहाय्य करणारी होती मोदींची योजना ५० कोटी जनतेला प्रत्येकी 5 लाखापर्यंत खर्चाचे आरोग्य सहाय्य करणारी आहे असे येथे नमूद करून यापूर्वी अनेकांनी केवळ कागदावर प्रकल्प दाखविले पण भाजपने अवघ्या साडेचार वर्षांत ते प्रत्यक्षात आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता टीका केली.
पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय काळे, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, पंधरा वर्ष प्रलंबित असलेला पुण्याचा वाहतूक प्रश्न भाजपने मेट्रो आणून सोडवला.रिंग रोड, मेट्रो असा कोणताही प्रकल्प नवीन नव्हता. परंतु, मागील सत्ताधाऱ्यांनी ते केवळ कागदावर ठेवले.चोवीस तास पाणी योजनेतवर त्यांनी फक्त चर्चा केली. स्मार्ट सिटीचा पैसाही त्यांना योग्य वापरायचा नव्हता.गरीबापासून मध्यमवर्गीयांपर्यंत आणि श्रीमंतापासून ते फकिरापर्यंत सर्वांच्या स्वप्नातलं शहर म्हणून पुण्याला विकसित करण्याचं भाजपचं स्वप्न आहे.
बेघर गरीबांना महाराष्ट्र सरकार जमिनीचा पट्टा देणार अशी घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फक्त जमिनीचा पट्टाच नाही तर त्यावर घर बांधण्यासाठी पैसेही देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील एक कोटी व्यक्तींपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 90 टक्के लोकांना आरोग्यावर कोणताही खर्च करण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकार तो भार उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या आरोग्य योजनेत देशातील पन्नास कोटी लोक कव्हर होत आहेत. त्याला राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेची जोड दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका ते केंद्रापर्यंत तुम्ही सत्ता भोगली तरी देखील प्रश्न राहीले आहेत. आता आमची सत्ता आली तर काही जण आम्हाला विचारतात की योजनांचे किंवा प्रकल्पाचे काय झाले? हा प्रश्न विरोधकांनी आम्हाला विचारू नये तो लोकांना विचारावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.