पालघरमधील तौक्ते वादळग्रस्तांना मदतीचे वाटप
पालघर दि.३० जुन – तौक्ते वादळात महाविकास आघाडी सरकारने मदतीची घोषणा केली, पण अद्यापही मदत केलेली नाही. मत्स्य व्यवसायाला मत्स्यशेती म्हणून व मच्छीमार ‘शेतकरी’ म्हणून मान्यता दिल्यास पीक कर्ज व शेतकऱ्यांच्या सुविधा सवलती मिळतील. मच्छिमारांना दिलासा मिळेल यादृष्टीने राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
तौक्ते चक्रिवादळाचा फटका बसलेल्या पालघर जिल्ह्यातील कोळाबांधवाना पुन्हा उभे करण्यासाठी कोळी महासंघ आयोजित महासंघाचे अध्यक्ष व भाजप आमदार रमेशदादा पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेकांना आर्थिक मदत, सातपाटी गावाकरिता रुग्णवाहिका, एडवण गावाकरिता कुपनलिकांसाठी पंधरा ते वीस निधीचे वाटप करण्यात आले.
आपल्या भाषणात प्रविण दरेकर यांनी सांगितले की, मच्छिमार समाजाने नहेमीच शिवसेनेला निवडणुकांमध्ये भरभरून मते दिली, या समाजाने शिवसेनेच्या पालख्या वाहिल्या मात्र शिवसेनेने याच कोळी बांधवांना वा-यावर सोडले. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला मच्छीमार बांधवांचा विसर पडला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आजही मच्छीमारांना मदत मिळत नाही, त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत यासारखे दुर्दैव नसल्याचे दरेकर यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना मच्छीमार समाजासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो व त्यांच्या समस्या सोडवल्या परंतु महाविकास आघाडी सरकारकडे मच्छीमार समाजासाठी वेळ नाही. महविकास आघाडीमध्ये सरू असलेल्या कुरघोडी सोडवण्याविण्यातच त्यांचा वेळ जात आहे. राज्य सरकारला जनतेशी व त्यांच्या प्रश्नांशी काही घेण देणं नाही आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला.
याप्रसंगी आमदार रमेश पाटील, जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस सुजित पाटील, जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा समीर पाटील, एन. एन. एफ चेअरमन नरेंद्र पाटील, राजन मेहेर, राजहंस ठपके, देवानर भोईर, अशोक हांबिरे, सचिन पागधेरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.