मुंबई-बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनंतर आता काँग्रेसनेही त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बागेश्वर बाबा यांच्या विधानामागे भाजप असल्याचा थेट आरोप केला आहे. ‘संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचे भाजप व भाजपप्रणित भोंदूंचे षडयंत्र आहे,’ असे ते म्हणालेत.
‘जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचे भाजप व भाजपप्रणित भोंदूंचे षडयंत्र आहे. सुधारणावादी विचारांना संपवून मनुवाद पुनर्स्थापित करण्यासाठी सुधारणावादी महापुरुषांचे प्रतिमाभंजन करण्याचा हा डाव आहे. जनतेने डोळे उघडले नाही, तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल,’ असे सचिन सावंत सोमवारी एका ट्विटद्वारे म्हणाले.