जुन्नर -लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतमजूर कुटुंबाने विहिरीत आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून की काय या सर्वांचे प्राण वाचले आणि माणसातल्या माणुसकीचा प्रत्यय सुद्धा या कुटुंबाने अनुभवला.
मूळचे संगमनेर(ता.नगर) येथील शेतमजुराने त्याची पत्नी व दोन लहान मुलींसह जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीच्या शिंदे बाम्हणे मळा येथील एका विहिरीत मंगळवारी 23 जून रोजी दुपारी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथे असलेल्या तरुणाने चौघांना विहिरीतून काढून जीवदान दिले आहे.विहिरीत पडलेल्या त्या चौघांचा आवाज ऐकून तेथील ग्रामस्थांनी आरडाओरड केला तेथून जवळच पिंपळवंडी गावचे माजी उपसरपंच नंदकुमार बाम्हणे यांच्या शेतात बोरी(ता.जुन्नर) येथील युवक दीपक शंकर सुर्यवंशी हा काम करत होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली आणि त्या चौघांना पाण्याच्या बाहेर काढले.त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना वर काढण्यात आले आणि तत्काळ आळेफाटा(ता.जुन्नर) येथील युनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. युनिक हॉस्पिटलचे डॉ.आकाश आवारी,डॉ.राहुल पावडे व डॉ.सतीश कजबे हे त्यांच्यावर मोफत उपचार करणार आहेत.
संगमनेर येथील शेतमजूर विजय गुंजाळ, पत्नी रेश्मा गुंजाळ, दोन लहान मुली दिव्या(वय 3) आणि तनुष्का(वय 6) यांच्यासह चार दिवसांपूर्वी आळेफाटा येथे काम शोधण्यासाठी आले होते. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांना कुणीही काम देत नव्हते. काम नसल्याने खाण्यासाठी जवळ पैसे नव्हते यात कुटुंबाची उपासमार होत होती. यातून नैराश्य येऊन विजय यांनी कुटुंबासह आत्महत्येचा निर्णय घेतला आणि पिंपळवंडी येथील विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला .