येत्या १४ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते सायं ८ दरम्यान नागरिकांना पाहता येणार प्रदर्शन
पुणे, : वाहन चाचणी व वाहन क्षेत्राशी निगडीत संशोधन या विषयावर काम करणारी व केंद्र सरकारच्या आखत्यारित येणा-या ‘ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एआरएआय’च्या वतीने ‘वाहतूक सुरक्षा’ या विषयावरील ‘आम्ही व आमची वाहने’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी चित्रित केलेली ही सर्व व्यंगचित्रे असून या प्रदर्शनीचे उद्घाटन आज खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
आजपासून सुरू झालेली ही प्रदर्शनी घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे येत्या १४ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते सायं ८ दरम्यान नागरिकांना पाहता येणार आहे. ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य असणार आहे.
केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचे उपसचिव अभय दामले, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, एआरएआयच्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे, वरिष्ठ उपसंचालक एम. आर. सराफ आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
‘एआरएआय’ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी या प्रदर्शनातील सर्व व्यंगचित्रे चितारली असून वाहतूक व्यवस्था, वाहनसुरक्षा, वाहतुकीचे नियम, रस्त्यावर रोज घडणारे अनेक किस्से या प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे.
यावेळी बोलताना शिरोळे यांनी पुण्यातील अपघात प्रवण जागा शोधून त्यावर महापालिकेच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती दिली. याबरोबरच प्रत्येक नागरीकाने आपली कर्तव्ये व जबाबदारी यांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
अभय दामले म्हणाले, “आज अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे रस्ते व वाहतूक सुरक्षा हा आपल्या सर्वांच्याच जीवनातील महत्वाचा आणि जवळचा विषय आहे. वाहतूक सुरक्षा याविषयी समाजामध्ये आणखी जागरूकता होणे गरजेचे आहे. ‘ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एआरएआय’ मुळे रस्त्यावर सदोष वाहने येण्याचे प्रमाण कमी झाले आहे ही महत्वपूर्ण बाब आहे.”
वाहतूक अथवा शहराच्या इतर कोणत्याही समस्यांवर पर्याय शोधताना त्याच्या मूळापर्यंत जाणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी कुणाल कुमार यांनी व्यक्त केले व हे करीत असताना एआरएआय सारख्या संशोधन संस्थांची मदत घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
सामान्य नागरिकांचे प्रश्न सामान्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यावर उत्तरे शोधण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. पुणे हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना एआरएआय नेहमीच महापालिकेला प्रत्येक उपक्रमात मदत करेल, असे आश्वासन उर्ध्वरेषे यांनी दिले.
याशिवाय मंगेश तेंडूलकर यांनी यांत्रिकीकरणामध्ये माणसाचे माणूसपण हरविले आहे अशी खंत व्यक्त केली व अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन होईल अशी अपेकक्षाही व्यक्त केली. एम. आर. सराफ यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.