पुणे-पश्चिम क्षेत्रीय सांस्कतिक केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य संस्था डॉ नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंदाज’ या शास्त्रीय नृत्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात, ललितकला केंद्र, पुणे विद्यापीठ यांच्या कलाकारांनी केली. यानंतर पं. बिरजू महराज, यांचे शिष्य युवा कलाकार आर्यव आनंद (दिल्ली) यांनी आपल्या कथक नृत्यप्रस्तुतीची सुरुवात गणेश वंदनेने केली. त्यानंतर १५ मात्रांच्या गजझंपा तालात पारंपारिक पद्धतीने थाट, आमद, परण, तिहाई, तोडे, इ. सादर केले. त्यांना तबला साथ यश त्रिषरण, पखावज पवन झोडगे, हार्मोनियम उमेश पुरोहित यांनी केली. त्यानंतर ८८ वर्षाचे, रायगड घराण्याचे ज्येष्ठ गुरू पंडित रामलाल बारेथ यांनी रायगड घराण्याची वैशिष्ट्ये सांगून काही खास बंदिशी म्हणून दाखवल्या त्यानंतर त्यांचे पुत्र व कथक नर्तक श्री भूपेंद्र बारेथ व त्यांच्या सहकलाकारांनी कथक नृत्य प्रस्तुतीची सुरुवात शिव वंदनेने करून ताल पक्षात उठान, थाट , आमद, इ. सादर करून राजा चक्रधर सिंह यांनी लिहिलेल्या ठुमरी वर भाव प्रदर्शन केले. त्यानंतर ८४ वर्षा चे जयपूर घराण्याचे पद्मश्री डॉ. पुरू दाधीच व हर्शिता शर्मा दाधीच यांनी स्वलिखित गणेश वंदना सादर करून, अप्रचलित गणेश तालात (मात्रा २१) पारंपारिक कथक नृत्य सौंदर्यपूर्ण पद्धतीने सादर केले. त्यानंतर डॉ पुरू दाधीच यांनी रामायणातील ‘ रावण वध ‘ हा प्रसंग सादर करून रसिकांची मने जिंकली.
तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रमात प्रारंभी ललित कलाकेंद्र, पुणे विद्यापीठ येथील विद्यार्थिनींनी बहारदार नृत्य सादर केले. त्यानंतर लखनऊ घराण्याचे पंडित शंभू महाराज यांची नात व पंडित बिरजू महाराज यांची पुतणी इप्शिता मिश्रा व विदुषी शास्वती सेन यांनी श्याम मुरत मन भावे ही कृष्ण वंदना सादर केली. त्यानंतर इप्शिता मिश्रा यांनी त्रितालात उपज, थाट, आमद, गिनती की तिहाई जोरकसपणे सादर केली. त्यानंतर ‘घट घट मे ‘ ह्या दोह्यावर सुंदर अभिनय सादर केला. यानंतर विदुषी सास्वती सेन यांनी झप तालात पंडित बिरजू महाराज यांच्या बंदिशी सादर केल्या तेव्हा पंडित बिरजू महाराज जी यांच्या बंदिशी सादर करून इप्शिता मिश्रा यांच्या बरोबर तिहाई व जुगलबंदी सादर केली. कार्यक्रमाच्या अखेरीस लंडन येथील ८० वर्षाचे पद्मश्री प्रताप पवार यांनी नटेश्वर वंदना सादर करून तीनतालात अप्रतिम कथक नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली यानंतर त्यांनी अभिनय पक्षात नायक भेद सादर करून गतनिकास व तिहाई ने कार्यक्रमाची सांगता केली. यांना साथ संगत तबला कालिनाथ मिश्रा, चारुदत्त फडके, हार्मोनियम उमेश पुरोहित, यशवंत थिटे, सरोद नितीन पुरोहित, बांसरी अझरुद्दीन शेख यांनी केली.कार्यक्रमाचे निवेदन रेणू शर्मा व सुनील सुंकरा यांनी केले.रसिकप्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने तीन दिवसाचा ‘अंदाज ‘ हा कथक नृत्य महोत्सव अविस्मरणीय व रंगतदार झाला.