मुंबई-“ईडी, सीबीआय चौकशीची भिती दाखवून राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे, “आरोप तर सगळ्यांवरच होतात. नरेंद्र मोदींवर देखील आरोप होत आहेत. प्रधानमंत्री सहाय्यता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी. लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही? या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजपा करतेय. त्याचाच परिणाम आपल्याला राज्यात दिसतोय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राज्यात सातत्याने कुणा कुणाची नावे ईडी चौकशीची मागणी केली जाऊ लागली असून त्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी भाजपाला सुनावलं आहे. एबीपीशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावरून टीका केली आहे. “आम्ही वारंवार यांच्यावर ईडी लावा, सीबीआय लावा असं म्हणत नाही. हे सत्तेत होते, तेव्हा यांच्यावर आरोप लागायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: विधानसभेत सांगायचे की हे निर्दोष आहेत. त्यावेळी कुठे गेलं होतं ईडी? तेव्हा कुठे गेलं होतं सीबीआय? पण आता मुद्दाम ईडी आणि सीबीआयची भिती दाखवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपाचा सुरू आहे. राज्यपालांच्या अधिकारांचा दुरुपयोग करून भाजपा ज्या पद्धतीने अशांतता माजवत आहे, हे सगळे लोक बघत आहेत. हे लोकशाहीला धरून नाही”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.