मुंबई- संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मध्यम प्रतीन्धींनी विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला तेव्हा फडणवीस यांनी पुण्याच्या ‘त्या’ एफआयआर दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे असे म्हटले आहे. पहिल्याच दिवशी हे प्रकरण बाहेर आले होते, त्याच दिवशी राजीनामा दिला पाहिजे होता. संजय राठोड यांच्या विरोधामध्ये एवढे पुरावे असताना मंत्री म्हणून ते राहायला नको होते. राजीनामा दिला तर आहे मात्र तो स्वीकारला आहे की नाही हे माहिती नाही, अशा शब्दांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापललेले आहे. राठोड यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून सातत्याने केली जात होती. तसेच, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही भाजपकडून देण्यात आला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राठोड यांच्या राजीनाम्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘खरे म्हणजे पहिल्याच दिवशी हे सगळे प्रकरण बाहेर आले होते. त्याच दिवशी हा राजीनामा यायला हवा होता. कारण ज्या प्रकारचे पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्या समोर आलेले आहेत, हे एवढे भयानक आहे की अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपदावर राहणे हे पूर्णपणे चूकीचे आहे. मात्र कुठेतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, अशी अवस्था वाटल्यामुळे आणि ती दिसत असल्यामुळे हा राजीनामा देण्यात आला नाही. जरी आता राजीनामा दिला असला, तरी तो स्वीकारला आहे की नाही आम्हाला माहिती नाही. तो स्वीकारणार आहेत की नाही हे देखील आम्हाला माहिती नाही.’ अशी शंका माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.