पुणे – गुरुवार, दि. 31 डिसेंबर, 2015 रोजी खंडाळा तालुक्यातील (जि. सातारा) तीन शाळांमधील 500 गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना ‘वनराई’ आणि ‘एशियन पेंट्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी 2000 रुपये आणि प्रमाणपत्र असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप होते. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. हास्य अभिनेते मकरंद टिल्लू व ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते हा शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयात पार पडला. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी वनराईचे वित्त विभाग प्रमुख श्री. सुधीर मेकल, ‘एशियन पेण्ट्स’चे श्री. महेश बारस्कर, शिक्षण समन्वय समितीचे विश्वस्त उदय गुजर, वनराईचे जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र घारे ‘वनराई’ मासिकाचे कार्यकारी संपादक श्री. अमित वाडेकर आदी उपस्थित होते.
लहान वयातच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार रुजावेत आणि
शिक्षणासाठी मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘वनराई’ आणि ‘एशियन
पेण्ट्स’च्या माध्यमातून राबविला जात असलेला शिष्यवृत्तीचा उपक्रम
अत्यंत स्तुत्य आहे. जागतिक तापमानवाढीची समस्या
सोडविण्यासाठी व मानव जात वाचविण्यासाठी कराव्या लागणार्या
पर्यावरणविषयक कार्यात वनराईचा मोलाचा वाटा आहे, असे मत खंडाळा
तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके यांनी व्यक्त केले.
‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया म्हणाले, ‘‘पॅरिसमध्ये पार
पडलेल्या जागतिक परिषदेतसुद्धा तापमानवाढीसंदर्भात चिंता व्यक्त
करण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासंदर्भात पुरेशी जागृती होणे
आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये
पर्यावरणासंदर्भात जागृती निर्माण करण्याच्या हेतूने वनराई अनेक
शाळांमध्ये विविध उपक्रम राबवित आहे.’’ यावेळी सातारा जिल्ह्याच्या
उपशिक्षण अधिकारी सौ. यादव, किशोर मासिकाचे संपादक श्री. किरण
केंद्रे, हास्य अभिनेते श्री. मकरंद टिल्लू, शिक्षण समन्वय समिती,
खंडाळा विभागाचे अध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे, यांनी आपल्या
भाषणातून या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनराईचे
प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी केले.