पुणे -विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होऊन शिवसेनेत गेलेले रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष परशुराम वाडेकर पुन्हा स्वगृही परतणार आहेत.शिवसेनेत मानसन्मान मिळत नसल्याने ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन वाडेकर यांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी मी पहिल्यापासून मनाने ‘आरपीआय’मध्येच होतो. आंबेडकरी विचारांचा पगडा मनावर असल्याने शिवसेनेत मन लागत नव्हते. त्यामुळे पुन्हा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. असे परशुराम वाडेकरयांनी स्पष्ट केले आहे
विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडल्याने ‘आरपीआय’च्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या निवडणुकीच्या काळात वाडेकर यांनी विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी ‘आरपीआय’ला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करून सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणुकीनंतर शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीमध्ये त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात न आल्याने ते नाराज होते. त्यांनी पुन्हा आपल्या जुन्या घरी, ‘आरपीआय’मध्ये येण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आठवले यांची भेट घेतली.
आठवले यांनी त्यांना ‘कामाला लागा,’ अशा सूचनाही दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुंबई येथे जाऊन वाडेकर यांनी आठवले यांची भेट घेतली. त्या वेळी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अशोक शिरोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.