अंध विद्यार्थिनींसाठी राज्यातील पहिल्या अत्याधुनिक प्रशालेच्या नूतन वास्तुचे समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे, खा.अनु आगा, मेहेर पद्मजी यांच्या हस्ते उद्घाटन
आळंदी:
‘दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांच्या पाठीशी शासन खंबीर उभे राहील’, अशी ग्वाही आज सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. अंध मुलींच्या शिक्षणासाठी ‘नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंड महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने आळंदी येथे उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या अत्याधुनिक प्रशालेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.हा कार्यक्रम 10 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता चर्होली खुर्द, आळंदी- मरकळ रस्ता, आळंदी येथे झाला.
खासदार अनु आगा, मेहेर पदम्जी (थरमॅक्स कंपनीच्या अध्यक्ष), डॉ. ऍन्ड्रीस लॉरमन (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्होक्सवॅगन इंडिया प्रा. लि.)प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेे.
कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये काही कमतरता आहे असे वाटू न देता मेहनत घ्यावी, मेहनतीतून मिळालेले फळ गोड असते. शासनाला या शाळांच्या अडचणीची कल्पना आहे, म्हणून आम्ही या शाळांच्या पाठीशी खंबीर उभे राहू’.
जागृती शाळेला एकूण 200 विद्यार्थ्यासाठी अनुदानित तुकड्यांची परवानगी विशेष बाब म्हणून महिनाभरात मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
दिलीप कांबळे यांनी शाळेच्या ‘स्कील डेव्हलपमेंट सेंटर’चे उद्घाटन केले, तर अनु आगा, मेहेर पदम्जी यांनी शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले.
मेहेर पदम्जी म्हणाल्या,‘दृष्टीहीन विद्यार्थिनिंची जिद्द पाहता त्यांच्यातूनही यशस्वी उद्योजक तयार होतील.
अनु आगा म्हणाल्या,‘देशात मुलींच्या बाबतीत भेदभाव होतो, हीचांगली बाब नाही.शिक्षणाने भेदभाव, इतर वाईट गोष्टी दूर होतील. समाजाने दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदान करण्याबाबत जागृती केली पाहिजे.समाजाच्या या घटकांकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील बदलला पाहिजे’.
संस्थेचे अध्यक्ष एम. वाय. गुरव यांनी अध्यक्षीय भाषण केले. सरचिटणीस वसंत हेगडे, रघुनाथ बरड, आमदार मोहन जोशी, संस्थेचे सल्लागार विजय मेहता यांनी मनोगते व्यक्त केली. संस्थेच्या प्रवक्तया सकीना बेदी, टेक महिंद्रा फाऊंडेशनचे विजय वावरे, प्रचार्य मंगला वानखेडे, सरपंच सचिन घोलप, जी.एम. मगर उपस्थित होते. किशोर गोहिल यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रशालेत महाराष्ट्र ,कर्नाटक आणि शेजारील राज्यातील 110 दृष्टिहीन विद्यार्थीनी शिकतात.
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम संगणक प्रशिक्षणासह येथे शिकविण्यात येणार आहे. स्पीच रेकग्नायझेशन सॉफ्टवेअर असलेली एकमेव कॉम्प्युटर लॅब येथे उभारण्यात आली आहे. दृष्टिहीन विद्यार्थींनींना संगणक साक्षर करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. रोजगार प्रशिक्षणासाठी आणि कौशल्य विकसनासाठी अत्याधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे.
1989 पासून ‘जागृती अंध मुलींच्या’ शाळेचे कामकाज सुरू असून, येथे ब्रेल प्रेस पासून सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे. शाळेच्या माजी विद्यार्थिनी सॉफ्टवेअर इंडस्ट्रि, बँका, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
फिजोथेरपी प्रशिक्षण, परकीय भाषा प्रशिक्षण, ऑडिओ रेकॉर्डिंग प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण अशी उद्दिष्ट्ये शाळेने डोळ्यांसमोर ठेवली आहेत, त्यासाठी उद्योग आणि इतर क्षेत्रातून संस्थेला मदत मिळाली आहे. थरमॅक्स सोशल इनिशिएटिव्ह फाऊंडेशन, आरती इंडस्ट्रीज लि.मुंबई, बी.एम. सी. सॉफ्टवेअर इंडिया प्रा. लि., डॉ. श्रीधर शुक्ला फाऊंडर ग्रेट सॉफ्टवेअर लॅब्स् पुणे, निविधा ग्राफिक्स पुणे, डी.एस.एम. इंडिया प्रा. लि., इन्फोबिन प्रा. लि., टेक महिंद्रा फाऊंडेशन आदी कंपन्यांचे या प्रकल्पाला सहकार्य लाभले आहे. अशी माहिती ‘नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंड महाराष्ट्र’ या संस्थेच्या प्रवक्ता सकीना बेदी यांनी दिली.