पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील परिसंवादातील सूर
पुणे-
”मराठी चित्रपटसृष्टीला गेल्या दशकात पुन्हा एकदा सुवर्णकाळ प्राप्त झाला आहे. त्यादृष्टीने चित्रपटसृष्टीच्या वाटचालीची दिशा योग्य आहे व त्यामुळेच चित्रपटसृष्टीची दशाही बदलू शकेल असा सूर ‘मराठी चित्रपट : दशकाची दिशा आणि दशा’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आला. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल होते. या परिसंवादात चित्रपटनिर्माते रामदास फुटाणे, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, महेश लिमये, सिटी प्राईड चित्रपटगृहाचे चालक अरविंद चाफळकर, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीचे सदस्य समर नखाते, ‘झी’ चे बिझिनेस हेड निखिल साने हे सहभागी झाले होते.
प्रारंभीच तरुण दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले, गेल्या दशकात सर्वच मराठी चित्रपटांना सुवर्णकाळ आला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटांचा दर्जा खूप चांगला झाला असला तरी प्रेक्षकांपर्यंत जाण्यासाठी मार्केटिंग, तसेच प्रमोशन आदी गोष्टींमध्ये आपण कमी पडत आहोत. या गोष्टींकडे अधिक लक्ष केंद्रित केले तरच हा सुवर्णकाळ टिकू शकेल.
छाया दिग्दर्शक महेश लिमये म्हणाले, हल्ली चित्रपट तयार करणे सोपे मात्र तो प्रदर्शित करणे अवघड झाले आहे. मराठी चित्रपट हिंदीपेक्षा जास्त आशयसंपन्न असूनही केवळ मार्केटिंगच्या जोरावर हिंदी चित्रपट चालतात हा फार मोठा फरक आहे. हा फरक दूर करण्यासाठी फिल्म मेकिंग इतकेच मार्केटिंगलाही महत्व देण्याची गरज आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीचे सदस्य समर नखाते म्हणाले, नाटक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना आवडीने जाणारा तरुणवर्ग मराठी चित्रपटांकडे कसा वळेल यासाठी खास प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी महाविद्यालयात ‘फिल्म क्लब’ स्थापन करण्याची आवश्यकता आहे. दिशा निश्चित झाली आहे मात्र ‘पाऊलवाटे’ चा ‘महामार्ग’ होण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.
सिटी प्राईड चित्रपटगृहाचे चालक अरविंद चाफळकरम्हणाले, एकाच आठवड्यात चार- पाच मराठी चित्रपट लावण्याची निर्मात्यांची स्पर्धा व्यवसायाच्या दृष्टीने फार मारक आहे मात्र तशी जाणीव करून देवूनही निर्मात्यांची ऐकण्याची तयारी नसते. मराठी चित्रपटांचा यशाचा दर फक्त दहा टक्केच आहे असे सांगून ते म्हणाले चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची पाहिजे तेवढी प्रसिद्धी केली जात नाही त्यामुळे चित्रपट मार खातो. निर्मात्यांनी पूर्वप्रसिद्धीची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
ज्येष्ठ चित्रपटनिर्माते रामदास फुटाणे म्हणाले, राज्य शासनाच्या अनुदानाचा काही निर्मात्यांनी गैरफायदा घेतला ही बाब खरी असली तरी अनुदानामुळेच मराठी चित्रपटांची स्पर्धा हिंदी चित्रपटांशी होऊ लागली ही वस्तुस्थिती आहे. मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळण्यासाठी तालुका तसेच जिल्हा पातळीवर फिल्म सोसायट्या स्थापन करण्याची गरज आहे.
‘झी’ चे बिझिनेस हेड निखिल साने म्हणाले मराठी चित्रपटांची उत्साहाने निर्मिती केली जात असली तरी त्याच उत्साहाने त्याचे मार्केटिंग व प्रसिद्धी केली जात नाही. शिवाय महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण जास्त आहे त्यामुळे त्यामुळे मराठी चित्रपट आशयसंपन्न असूनही ते पाहिजे तेवढां धंदा करू शकत नाही. ‘झी’ वरील जाहिरातीमुळे मराठी चित्रपट अधिक चालतात ही गोष्ट तेवढी खरी नाही असेही त्यांनी सांगितले. चित्रपट निर्माते आणि ‘इम्पा’ चे संचालक विकास पाटील तसेच निलेश नवलाखा यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
परिसंवादाचा समारोप करताना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल म्हणाले , चित्रपटाच्या निर्मितीपासून ते तो प्रदर्शित होइपर्यत्न आणि त्यानंतरही निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व कलावंत यांची एकजूट अभंग राहिली तरच तो चित्रपट मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकेल मात्र त्यासाठी सर्वांनी तशी तयारी करण्याची गरज आहे. चित्रपटांच्या मार्केट मध्ये प्रत्येक चित्रपटाने आपले वेगळेपण सिद्ध केले तरच तो चित्रपट टिकून शकतो. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांकडे पाहण्याचा मराठी प्रेक्षकांचा दृष्टीकोन वेगळा असतो असे सांगून ते म्हणाले मराठी चित्रपटांचे मल्टीप्लेक्सचे दर कमी केले तर मराठी प्रेक्षकांची संख्या वाढेलच असे मुळीच नाही. श्री राज काझी यांनी आभार मानले.