पुणे —
गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांनी आपल्या सुमधुर स्वरात गीतरामायणातील पुढील दहा गाणी म्हणत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. खचाखच भरलेल्या पटांगणातील रसिकांनी ही गाणी अतिशय तन्मयतेने ऐकताना अनेक गाण्यांना वन्समोर देऊन ती पुन्हा पुन्हा श्रवण केली. आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते श्रीधर फडके यांचा यावेळी खास पुणेरी पगडी, श्रीराम-सीतेची मूर्ती आणि उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास तज्द्य निनाद बेडेकर, ज्येष्ठ शिक्षण तज्द्य डॉ. प्र. ल. गावडे, पुण्याचे उपमहापौर आबा बागुल, पुणे आकाशवाणीचे संचालक रवींद्र खासनीस , आशिष भटनागर, शरदकुमार माडगुळकर, ‘ललकार’चे रवींद्र आपटे आदी उपस्थित होते.
‘गदिमा’ आणि बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम एक एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी केंद्रावरून
प्रसारित करण्यात आला. आणि पहिल्या भागापासूनच तो लोकप्रिय झाला. हे अनोखे गीतरामायण घराघरात लोकप्रिय करण्याचे सारे श्रेय अर्थातच आकाशवाणीला जाते. म्हणून या सोहळ्यात आज पुणे आकाशवाणीचे संचालक रवींद्र खासनीस, आशिष भटनागर आणि पुणे आकाशवाणीचे तत्कालीन ज्येष्ठ कर्मचारी मुकुंदराव गद्रे यांचा खास गौरव करण्यात आला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या भाषणात श्रीधरजींना मनापासून आशीर्वाद देतांना सांगितले की, गीतरामायण हे चिरंजीव महाकाव्य आहे. तर गीतरामायण गाणारे श्रीधर फडके हे गीतरामायणाची रचना करणारे आणि गाणारे सुधीर फडके यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे जेंव्हा जेंव्हा गीतरामायणाचे नाव घेतले जाईल तेंव्हा तेंव्हा सुधीर फडके आणि श्रीधर फडके यांचीही नावे आपोआप घेतली जातील. लहानपणी मी श्रीधरना कडेवर घेतले होते मात्र आता मी त्यांना डोक्यावर घेत आहे असे त्यांनी म्हणताच श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
ज्येष्ठ इतिहास तज्द्य निनाद बेडेकर यांनीही आपल्या भाषणात, गीत रामायणामध्ये अचेतन सृष्टीला सचेतन करण्याची ताकद आहे असे सांगितले. शिवाजी महाराजांनीही आपल्या एका मुलाचे राम हे नाव आवर्जून ठेवले होते याचाही त्यांनी उल्लेख केला.
पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांनी या हीरकमहोत्सवी सोहळ्यास शुभेच्छा देताना, आजच्या तरुण पिढीला संस्काराची गरज असल्याचे सांगून हे संस्कार केवळ गीतरामायाणामुळेच होतील असे सांगितले. पृथ्वी एडिफीसचे अभय केले यांनी आपल्या प्रास्ताविकात या
सोहळ्यामागची कल्पना विशद केली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनया देसाई यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंदूरचे गायक अभय मांडके आणि अमृता मांडके यांनी गीतरामायणातील ‘स्वये श्री… ‘ , दशरथा घे हे पायसदान ….’., ‘राम जन्मला ग सखे, ‘सावळा ग राम …’, आकाशाशी जडले नाते … ही पाच गाणी हिंदीतून सादर केली यावेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या हिंदी गाण्यांचे स्वागत केले. हिंदी गीतरामायणातील रचना बृह्दत्त मिश्रा यांनी अनुवादित केल्या आहेत.
मुख्य कार्यक्रमात आज श्रीधर फडके यांनी, ‘बोलले इतुके मज श्रीराम …’, ‘ माता न तू वैरिणी …’, ‘ दॆवजात दु:खे भरता ….’, ‘सूड घे त्याचा लंकापती…’, तोडिता फुले…’ , ‘अडविता खलाशी… ‘, ‘सन्मित्र राघवा…’, ‘बाली वध ना…’ ‘असा हा एकच श्री हनुमान…’ हि गाणी सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला ), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर ( सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. गीतरामायणाचे रसाळ निवेदन धनश्री लेले यांनी केले. गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याची शनिवारी रामनवमीच्या दिवशी सांगता होणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या गीतरामायणाच्या या खास हीरकमहोत्सवी सोहळ्याचे पृथ्वी एडिफीस, निरामय वेलनेस आणि भारती विद्यापीठ हे प्रायोजक आहेत.
![गीतरामायण हे चिरंजीव महाकाव्य --- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे](http://mymarathi.net/wp-content/uploads/2015/03/218-300x201.jpg)