पुणे —
सुरूवातीला बरसलेल्या पर्जन्यधारा आणि त्यानंतर गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुमधुर स्वरातून प्रकटलेल्या
गीतरामायणातील ‘स्वरधारा’ यामध्ये चिंब झालेल्या हजारो रसिकांच्या उपस्थितीत गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याची सांगता आज रामनवमीच्या दिवशी झाली. गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी श्रीधर फडके यांनी आपल्या सुमधुर स्वरात गीतरामायणातील निवडक गाणी म्हणत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रारंभी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते या हीरकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त खास काढण्यात आलेल्या ‘ज्योतीने तेजाची आरती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर यावेळी गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रवींद्र वंझारवाडकर, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, श्रीधर माडगुळकर, धनंजय कुलकर्णी, पृथ्वी एडिफीसचे अभय केले, ‘निरामय’चे योगेश चांदोरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी आपल्या भाषणात म्हणाले, ”गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळा पुण्यात होत आहे हे पुणेकरांचे भाग्य आहे कारण गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर यांच्यात भक्तीभाव जागृत करण्याची अद्भुत किमया आहे. स्वत; श्रीधर फडके यांनी ही बाबूजींची किमया त्याच ताकदीने जिवंत ठेवली आहे .त्यांचे हे सामर्थ्य वरचेवर वाढत राहो.’
गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर म्हणाले, गीतरामायणाचे आणि सर्वसामान्यांच्या जीवनाचे नाते इतके अतूट आहे की, गीतरामायण कितीही ऐकले तरी त्याची अवीट गोडी संपणारी नाही. सर्वप्रथम आकाशवाणीवर गीतरामायण प्रसारित करण्यात सीताराम लाड यांच्यासारख्या गोवेकरांचा मोलाचा वाटा होता याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मे महिन्यात गोव्यातही गीत रामायणाचाही सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी या स्मरणिकेच्या संपादिका अमृता संभूस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनया देसाई यांनी केले. महेश दाबक यांनी आभार मानले.
सांगता समारंभाचा प्रारंभ आज मधुकर सिधये यांच्या शंखवादनाने झाले. त्यानंतर कोल्हापूरच्या डॉ. भाग्यश्री मुळे यांनी गुजराती गीतरामायणातील ‘ विदाय शाने मारी लेता, ज्यां राघव त्यां साथे सीता ‘ आणि ‘ हरण लावी द्यो मने अयोध्यानाथा’ हि दोन गाणी म्हटली यावेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या गुजराती गाण्यांचे स्वागत केले. ही गाणी हंसराज ठक्कर यांनी गुजराती भाषेत अनुवादित केली आहेत.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी , ‘सेतू बांधा रे …’, सुग्रीवा साहस हे भलते…’, ‘शेवटचा करी विचार …’, ‘आज का निष्फळ होती बाण …’, ‘लीनते चारुते सीते …’, स्वामिनी निरंतर माझी…’, त्रिवार जयजयकार …’, ‘प्रभो मज एकाच वर द्या …’, ‘मज सांग लक्ष्मणा …’ आणि ‘गा बाळांनो ….’ ही गाणी म्हणून रसिकांची मने जिंकली. ;यावेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला ), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर ( सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. गीतरामायणाचे रसाळ निवेदन धनश्री लेले यांनी केले.
आज सायंकाळी पावसाळी वातावरण होते व काही वेळाने पावसानेही हजेरी लावली तरीही श्रोते उत्फूर्तपणे जमले होते. भारतीय शिक्षण मंडळ ( प. महाराष्ट्र ), संतोष पोतदार इव्हेंट्स ( पुणे ), आणि पर्पल इव्हेंट्स (मुंबई ) यांच्यातर्फे गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या गीतरामायणाच्या या हीरकमहोत्सवी सोहळ्याचे पृथ्वी एडिफीस, निरामय वेलनेस आणि भारती विद्यापीठ हे प्रायोजक होते.
![गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याची सांगता](http://mymarathi.net/wp-content/uploads/2015/03/313-300x201.jpg)