भारतीय प्रजा सुराज्य पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता
बारामतीत ‘सामाजिक सलोखा’ सभा घेऊन नव्या पक्षाचा श्रीगणेशा : राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत यांची माहिती
पुणे ः ‘राष्ट्रीय समाज पक्षा’तून बाहेर पडलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या ‘भारतीय प्रजा सुराज्य पक्षा’ला निवडणूक आयोगाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन मान्यता मिळाल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत, राष्ट्रीय सचिव विष्णू चव्हाण, मुख्य सचिव प्रल्हाद जाधव, कोषाध्यक्ष अशोक तडवळकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नव्या पक्षाच्या सार्वजनिक जीवनातील, राजकारण, समाजकारणातील विधायक श्रीगणेशा करण्यासाठी बारामती येथे रविवारी ‘राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रविवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता रेल्वे मैदान (भिगवण रोड), बारामती येथे होईल.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, ‘ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. बोर्डा’चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, ‘जनता दला’च्या महासचिव सुशीला मोराळे या सलोखा सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याच ‘सलोखा सभे’त राज्याच्या 3 हजार खेड्यांना भेट देणारी ‘सामाजिक सलोखा’ यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ही यात्रा ‘बारामती ते दीक्षाभूमी’, ‘दीक्षाभूमी ते रायगड किल्ला’ असा प्रवास करणार आहे.
देशात, राज्यात सत्तेसाठी धर्माच्या नावाने, जातीजातीत तेढ निर्माण करून राजकारण चालू असल्याने समाजाचे विभाजन होत आहे. या संघर्षात सामान्य नागरिक नाहक बळी जात आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी आधी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा’ यासाठी काम केले पाहिजे. नव्या पक्षाच्या कामाचा श्रीगणेशाच आम्ही ‘सामाजिक सलोखा’ सभा आणि ‘सामाजिक सलोखा’ यात्रेद्वारे करीत आहोत, असे दशरथ राऊत यांनी सांगितले.
५ जानेवारी २०१७ रोजी ६ विभागाध्यक्ष, १८ जिल्हाध्यक्षांसह आपण ‘रासप’ पक्ष सोडला होता. आता ३० विधानसभा, ८ लोकसभा मतदारसंघावर आमचा नवा पक्ष लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच आगामी काळात संघटन बळकट करून सर्व निवडणुका लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.