सम्मेद शिखर जी चे पावित्र्य कायम राखणार : मुख्यमंत्री रघुवर दास
ऑल इंडिया जैन अल्पसंख्याक फेडरेशनच्या शिष्टमंडळाला आश्वासन
शिष्टमंडळात पुण्यातील दोघांचा समावेश
पुणे / प्रतिनिधी :
‘सम्मेद शिखर जी’ हे जैन धर्मियांचे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. या पवित्र स्थळाची पवित्रता सरकार कायम राखेल. तीर्थस्थळाच्या यात्रे दरम्यान जैन धर्मियांना कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये, म्हणून सरकार मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी दिले.
ऑल इंडिया जैन अल्पसंख्याक फेडरेशन तर्फे आयोजित ‘पधारो शिखर जी’ अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री दास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया जैन अल्पसंख्यांक फेडरेशनचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री दास यांना प्रोजेक्ट भवन येथे भेटले. त्यांनी जैन धर्मियांच्या भावना दास यांच्यापर्यंत पोहोवून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी ऑल इंडिया जैन अल्पसंख्यांक फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी, फेडरेशनचे सरचिटणीस संदीप भंडारी, जीनेंद्र कावेडीया, जैन समाजाचे अग्रणी कैवन झवेरी, हिमांशु राजा, प्रितेश शाह, हितेश मोता, तसेच फेडरेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळात पुण्यातील संदीप भंडारी व जीनेंद्र कावेडीया यांचा समावेश होता.
फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, की सम्मेद शिखर जी ची अखंडता अबाधित राखणे, ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तसेच तीर्थस्थळाजवळ कुठलेही बांधकाम वाढू नये की ज्यामुळे जैन धर्मियांच्या आस्थेला बाधा येईल. तीर्थस्थळाच्या आसपासच्या लोकांसाठी आरोग्य व शिक्षणांबाबत सरकारकडून योजना राबवली जात असेल, तर जैन समुदायाकडून त्याला मदत केली जाईल. जैन धर्मप्रेमी लोक या यात्रेसाठी वर्षातून एकदा यायला हवेत. लोकांच्या नियमित ये-जा करण्याने इथल्या क्षेत्रांचा विकास आपोआप होईल.
मुख्यमंत्री दास यांनी आश्वासन दिले, की सरकारकडून सम्मेद शिखर जी ची पवित्रता कायम राखली जाईल. सम्मेद शिखर जी ची यात्रा सुखमय बनण्यासाठी सरकार आसपासच्या परिसराच्या विकासाचे काम हाती घेणार आहे.