पुणे – वाचनसंस्कृती वाढावी आणि नवनवीन साहित्य संपदेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी, ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रंथ वाचण्यास मिळत असतात या ग्रंथ वाचनामुळे बुध्दीला चालना मिळत असून त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने येथील श्री संत गाडगेमहाराज आकुल धर्मशाळा (प्रार्थनागृह) जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आज झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे होते त्यावेळ ते बोलत होते. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, कार्यावाह सोपान पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे.श्री.गोखले, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, विजयराव कोलते, जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष विकास टिंगरे, ग्रंथपाल खैरे, ग्रंथमित्र धोंडीबा सुतार, रमेश सुतार, दिलीप भिकोले, लक्ष्मण थोरात, विविध शासनमान्य सार्वजनिक वाचलनालयाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन युवक युवती यावेळी उपस्थित होते.
आपल्या देशात बऱ्याच वर्षापासून शिक्षणाची परंपरा असून देखील आपण मागे आहोत. मानवी जीवन समजून घेण्यासाठी नेहमी साहित्य वाचले पाहिजे. त्यात काय लिहिले आहे हे समजून घेणे महत्वाचे असते. यामुळे आपल्याला समाज, माणुस, संस्कृती कळते. राज्याच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत वाचनसंस्कृती वाढावी आणि साहित्य क्षेत्रातील घडामोडींची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. २८ आणि २९ नोव्हेंबर या कालावधीत हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवात राज्यातील प्रसिध्द पुस्तक प्रकाशन संस्थांनी ग्रंथ व साहित्याचे प्रदर्शन करणारे स्टॉल लावले आहेत.
जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपान पवार म्हणाले, जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचक वर्ग वाढविण्याचे काम केले पाहिजे. येथून पुढे ग्रंथालय चळवळ ही व्यापक झाली पाहिजे. तालुक्यांच्या ठिकाणीही ग्रंथोत्सवाचे आयोजन केले पाहिजे असेही ते म्हणाले.
उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अनेक लेखकांचे पुस्तके त्यामध्यील विचार आपणास पहावयास मिळते.समाजाला अडचणीतून मार्गक्रमन करण्यासाठीही पुस्तकेच उपयोगी पडतात. अनेक साहित्यिकांच्या लेखनीतून समाज पुढे गेलेला आहे. वाचनामुळे आपण आपले होणारे नुकसान टाळू शकतो असेही ते म्हणाले.
यावेळी सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनीही आपले मानोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे.श्री. गोखले यांनी केले तर आभार जिल्हा ग्रंथालय निरीक्षक मंगेशपेल्ली यांनी केले.
लोकराज्य स्टॉलला भेट
ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत विविध पुस्तक प्रकाशनांच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. दोन दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये मान्यवरांचे व्याख्यान व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामुल्य असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे.श्री.गोखले यांनी यावेळी केले.
ग्रंथदिंडी
ग्रंथोत्सवामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सकाळी राजा धनराज गिरजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, ताराचंद हॉस्पिटलसमोर,रास्तापेठ ते कार्यक्रमस्थळापर्यत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थींनी,साहित्यीक, साहित्यप्रेमी नागरिक, वाचनालयाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.