मुंबई -मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १८ जण ठार झाले असून ५० हून अधिक जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एक महिला तिच्या बाळासह ढिगाऱ्याखाली असल्याचं आढळून आलं आहे. तिला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.मुंबईत सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर आजही कायम असून अंधेरीतील चांदिवली येथील संघर्ष नगर इथं जमीन खचून मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळं आसपासच्या तीन रहिवाशी इमारती प्रशासनानं तातडीनं खाली केल्या आहेत.