अहमदनगर-ऐन दिवाळीत पाथर्डी तालुक्यात एका दलित कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आई, वडील आणि तरुण मुलगा यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आले आहेत. खुनाचे कारण तसेच आरोपींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काही महिन्यांपूर्वीच अशी घटना घडली होती. या दोन्हींमध्ये काहीअंशी साम्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाथर्डी तालुक्यातील जवखडे खालसा या गावातील जाधव वस्तीत ही घटना घडली. तेथे संजय जगन्नाथ जाधव (वय ४२), जयश्री संजय जाधव (वय ३८) व सुनील संजय जाधव (वय १९) हे तिघे राहतात. त्यांचे तिघांचेच कुटूंब आहे. जाधव यांच्या मालकीची एक एकर शेती आहे. त्यांचा मुलगा सुनील हा मुंबईत एका दूध डेअरित नोकरी करतो. आठ दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्यांचे घर गावापासून पाच किलोमीटरवर शेतात आहे. आज सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर शेतात काम करणाऱ्यांनी जाधव यांच्या नातेवाईकांना कळविले. त्यांनी येऊन पाहिले असता घरात कोणीही नव्हते. घराच्या ओट्यावर थोडेसे रक्त सांडलेले होते. त्यामुळे नातवाईक आणि ग्रामस्थांनी जाधव कुटुंबियांचा शोध सुरू केला.
सायंकाळी जाधव यांच्या वस्तीपासून पाचशे फुटावर असलेल्या एका जुनाट, पडीक विहिरीत मृतदेहांचे तुकडे आढळून आले. गोणापटावर टाकून मृतदेह विहिरीजवळ फरपटत आणल्याचे आढळून आले. याची माहिती मिळाल्यावर पाथर्डीचे पोलिस तेथे गेले. तोपर्यंत ग्रामस्थ संतप्त झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी नगरहून सायंकाळी आले खुनाचे कारण, यातील आरोपी यांच्याबद्दल आद्याप माहिती मिळालेली नाही. रात्री या तिघांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा संशय आहे.