पुणे- जेष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी अनेक संशोधनात्मक लिखाण आणि कविता लिहिल्या. सांस्कृतिक,सामाजिक अशा सर्व क्षेत्रात त्यांनी आपल्या लिखणातून मोहोर उमटवली. त्यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले आहे असे गौरोद्गार ज्येष्ठ संत साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन तर्फे ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती अरूणा ढेरे यांना जय वैभवलक्ष्मी साहित्यिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. एक लाख एक हजार रूपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जेष्ठ पत्रकार व झी २४ तासचे संपादक विजय कुवळेकर, जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठनेते उल्हासदादा पवार, माजी उपमहापौर आबा बागुल, उपाध्यक्ष अॅड.
शशिकांत पागे, सचिव प्रा. व्ही.एस. अंकलकोटे पाटील, नगरसेविका स्मिताताई वस्ते, विश्वस्त श्रीमती आशाताई काळे, मिथुन गुरव, स्वरूप एकलुरे, अॅड. सौरभ अंकलकोटे पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब कासार यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच गुणवंत विद्यार्थी आणि अध्यापकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
या पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून यापूर्वी श्रीमती सिंधूताई सपकाळ, विवेकानंद नेत्रालय (मिरज), डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे, श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी) पुण्यधाम आश्रम कोंडवा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, जय वैभवलक्ष्मी साहित्यिक पुरस्कारासाठी श्रीमती अरुणा ढेरे यांची अचूक व उचित निवड केली आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात अविरोध महिला अध्यक्षा म्हणून त्यांची नोंद झाली आहे. त्या ज्या परंपरेचा वारसा चालवत आहेत ती परंपरा महत्वाची आहे. त्यांचे वडील स्व. डॉ. रां.ची. ढेरे यांनी मधल्या काळात विस्मृतीत गेलेल्या मातब्बर लोकांना
समोर ठेवून लिखाण केले. तोच वारसा अरुणाताईंनी पुढे चालू ठेवला आहे.
मराठी साहित्यात स्रियांचे स्थान मोठे आहे. मदम्मा, मुक्ताई, जनाबाई यांना वारकरी संप्रदायाने लिहिते केले. १७५० पर्यंत संत परंपरेतील संत मानले जातात. पुढे मात्र, पेशवाईच्या काळात एकही स्री साहित्य लिखाण करताना दिसली नाही. पंडितीय वळणाचे आणि लावणी लेखन असे दोन प्रकार साहित्यात होते. पंडितीय वळणाचे लेखन स्रीयांकडून अपेक्षित नव्हते व लावणी साहित्य स्रिया लिहू शकत नव्हत्या. अशावेळी अरुणाताई ढेरे यांनी मधल्या काळातील विस्मृतीत गेलेल्या
मातब्बर लोकांना समोर ठेवून साक्षेपी लिखाण केले. त्यांच्या लिखाणामध्ये संयमित अभिव्यक्ती दिसते. त्यांच्या साहित्य लिखाणाने महाराष्ट्राला समृद्ध केले आहे असे गौरोवद्गार त्यांनी काढले.
विजय कुवळेकर म्हणाले, स्वागतशील परंपरा असलेल्या स्वागतशील महासमन्वयाचा हा गौरव आहे. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. संस्कृतीने आपल्याला काय दिले त्याचे संचित देण्याचे काम अरुणाताईंनी केले आहे. रां.ची. ढेरे यांच्या कन्या म्हणून अरुणाताई मोठ्या नाहीत. ते काही राजकीय क्षेत्र नाही. साहित्य, कलेच्या क्षेत्रात स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर यश मिळवावे लागते.
त्याच ताकदीच्या जोरावर अरुणाताई एकेक गोष्टी पेलत गेल्या. डॉ. रां. ची. ढेरे यांनी सुरु केलेल्या परंपरा अरुणाताईंनी अधिक समृद्ध केल्या. कशाशीही तडजोड केली नाही. त्यांच्या लिखाणातील कस कमी झाला नाही असा गौरव त्यांनी केला.
उल्हासदादा पवार म्हणाले, अरुणाताई या साहित्यातील विदुषी आहेत. डॉ. रां. ची. ढेरे यांचा उतुंग वारसा त्यांना लाभला आहे.देशात सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात समन्वयाची आवश्यकता आहे. मराठी भाषा आणि साहित्याची उंची खूप मोठी आहे. अनेक मोठी माणसे मराठी शाळेत गेली म्हणून मोठी झाली नाहीत असे नाही. इंग्रजी भाषेला विरोध नाही. परंतु मातृभाषेला तिलांजली देऊन इतर भाषा शिकू नका हे विनोबा भावे यांचे सांगणे होते. त्याचे पालन आपण करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
आबा बागुल म्हणाले, शिक्षण हे मातृभाषेतूनच घेणे आवश्यक आहे. संस्कार किती महत्वाचे असतात हे अनेक उदाहरणावरून आपल्याला दिसतात. अरुणाताईंचे साहित्य क्षेत्रातील काम हे इतके मोठे आहे की त्या या क्षेत्रातील राष्ट्रपती आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अरुणाताई या आपल्या प्रभागात राहतात हा आपला सन्मान आहे व त्याचा मला अभिमान आहे असे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना अरुणाताई म्हणाल्या, मला अनेक पुरस्कार मिळाले. फार झाले पुरस्कार असे वाटत असतानाच आणि एक एक टप्पा पार करत असतानाच वारीमध्ये जसा मुक्काम करताना कोणीतरी येऊन दमलीस का विचारते आणि हा घे भाजी-भाकरीचा प्रसाद असे म्हणते तसा हा पुरस्कार आहे.
शब्द वापरणे वाटते तितके सोपे नाही असे सांगून त्या म्हणाल्या, संवेदनाक्षम जागा शोधणे हे फार महत्वाचे असते. वेगवेगळ्या वाटेवरती पावले पडत गेली व त्या वाड्मयीन वंशाचे आपण वारसदार आहोत याची जाणीव होत गेली. आतापर्यंत मिळालेले पुरस्कार ज्या स्रिया लिहित्या झाल्या, ज्या लढल्या, जीवनात खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांच्या सर्वांचे हे पुरस्कार आहेत. वाड्मयीन भूतकाळ आपल्या बरोबर आहे. त्याचे संचित घेऊन आपण पुढे चाललो आहोत. जुन्या
लोकांनी जी दृष्टी दिली, जीवनविषयक दृष्टीकोन दिला या सर्वांचा विवेक आपल्याला ठेवायला पाहिजे असे त्या म्हणाल्या. कुठल्याही एकांतिक टोकला न जाता त्या- त्या गोष्टींमधली परंपरा जपत व समन्वय साधत पुढे जाणे हेच महत्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले.