पुणे-“आपलं आयुष्य हे दुसर्याच्या जीवनात प्रकाश देणारं असावं. पण त्यापेक्षाही जर आपण उदबत्तीसारखं आयुष्य जगलं तर कितीही मोठा वारा आला तरी आपल्या चांगल्या कामाचा सुगंध दुरवर दरवळत राहतो. दिवा विझवता येतो किंवा वार्याने विझतो. पण उदबत्ती विझवता येत नाही किंवा वाराही तिला विझवू शकत नाही, अशी उदबत्ती सारखी सुगंधीत जीवन असे धारीवाल आणि बडजात्या कुटुंबियांचे आहे” असे गौरवोद्गार दिगंबर जैन मुनीश्री प.पू. 108 पुलकसागरजी महाराज यांनी आज येथे काढले. मुनीश्रींचा पुण्यात चालू असलेल्या चातुर्मासपर्वात धर्मानुरागी रसिकलाल एम. धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झालेल्या पहिल्या प्रतिष्ठेच्या ‘पुलकभूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. दानशूर उद्योगमहर्षी कै. रसिकलाल एम. धारीवाल यांच्या वतीने त्यांची पत्नी श्रीमती शोभा धारीवाल व कन्या जान्हवी धारीवाल यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी कुटुंबियांसमवेत हा पुरस्कार स्वीकारला. मुनीश्री पुलकसागर महाराजांच्या हस्ताक्षरातील चांदीच्या फ्रेममधील मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी हजारो जैन भाविकांनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटात सारा परिसर धुमधुमून गेला.
याप्रसंगी मुनीश्री म्हणाले की, या दोघांवरही ईश्वराचा वरदहस्त आहे. त्यांच्याकडे संपत्ती आहे. असे असूनही त्यांनी संस्कार सांभाळून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. धारीवाल यांनी केलेली सामाजिक कामे आणि बडजात्या यांच्या चित्रपटाची नावे लोकांच्या तोंडी असतात. पण या दोघांची नावे संतांच्या तोंडी असतात हे विशेष. रसिकलाल धारीवाल यांनी वर्तमान युगात आपल्याकडे असलेले भांडार समाजासाठी खुले करून कोट्यावधी रुपयांचे दान केले व नवा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. त्यामुळे जेवढी जोरात हवा येईल तेवढा त्यांच्या कार्याचा सुगंध दुरवर पसरेल. बडजात्या हे चित्रपट दुनियेत आहेत. या प्रभावी माध्यमाचा वापर करून ते चांगले कौटुंबिक संस्कार समाजात रूजवतात. या सगळ्यांचं श्रेय बडजात्या कुटुंबाला एकत्रित बांधुन ठेवणार्या उषा बडजात्या यांना आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी श्रीमती शोभा धारीवाल म्हणाल्या, जीवनातील कठीण प्रसंगात मुनीश्रींचा परिचय झाला. जीवनातील सत्य स्विकारण्याची ताकद त्यांच्यामुळे मला व कुटुंबाला मिळाली. त्यामुळेच आज या चार्तुमासपर्वाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मला पार पाडता आली आणि यामुळे मला एक चागले काम करता आले. यानिमित्ताने चार्तुमास संयोजन समितीच्या रूपाने एक चांगला परिवार मला मिळाला.
जान्हवी धारीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझ्या वडिलांनी ज्याप्रमाणे समाजाकडून मिळालेले पुन्हा समाजाला देण्याचे काम केले. हे काम आपण असेच पुढे सुरू ठेवणार आहोत. माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचे नाव मोठे केले तसे मी माझ्या वडिलांचे नाव मोठे करीन.
याप्रसंगी सुरज बडजात्या म्हणाले, आमचा एक चित्रपट चांगला चालला. त्यानंतर आम्ही घरी स्नेहभोजन आयोजित केले होते. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आले होते. पण स्नेहभोजनाप्रसंगी ‘काहीच’ नाही असे बघून अनेकजन न जेवता परत गेले. तर काहींनी ‘ही काय जीवनशैली आहे काय’ असे उद्गार ही काढले. मात्र ‘असेच स्नेहभोजन’ तुम्हाला सन्मान मिळवून देईल असे कुटुंबातील ज्येष्ठांनी सांगितले. असे कौटुंबिक व संस्कारी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे व त्यात यश मिळवणारे सूरज बडजात्या यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री प्रदीप जैन म्हणाले की, धर्म हे समाज जोडण्याचे काम करतो. त्यामध्ये जोडण्याच्या आशयाला खूप महत्व आहे. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा कायम रहावा यासाठीची पहिली बैठक पुण्यात झाल्याची आठवण त्यांनी याप्रसंगी सांगितली. याप्रसंगी अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष निर्मल सेठी उपस्थित होते.
प्रारंभी नृत्याविष्कार झाल्यावर मुंबईच्या सीमा गंगवाल यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वागत व प्रास्ताविक सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे केले. यानंतर कै. रसिकलाल एम. धारिवाल यांचे कर्तृत्व अधोरेखीत करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच मंगलाचरण नृत्याविष्कार स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक – वैष्णवी शहा ग्रुप, द्वितीय क्रमांक – जिनेंद्र ग्रुप आणि पारस ग्रुप, तृतीय क्रमांक – पूर्वाशहा ग्रुप, उत्तेजनार्थ – श्राविका महिला मंडळ, जैन जागृती सखी मंच, पार्श्व पद्मावती मंडळ आणि संगिनी ग्रुप. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अजित पाटील यांनी केले.
तत्पूर्वी आज सकाळी माणिकबाग जैन मंदीर येथून भव्य शोभायात्रा निघाली. त्यामध्ये बँड, रथ, बग्गी यासह पारंपारिक पोशाखातील हजारो जैन स्त्री-पुरूष भावीक सहभागी झाले होते. ही शोभा यात्रा महालक्ष्मी लॉन्स येथे आल्यावर तेथे डोक्यावर मुकुट परिधान केलेले 1008 स्त्री पुरूष (इंद्र व इंद्रायणी) यांनी महाअर्चना विधान महोत्सव पूजा सुरू केली. याप्रंसगी अन्य हजारो जैन भावीक उपस्थित राहिले होते. महाअर्चना विधान महोत्सव पूजा दि. 22 व 23 रोजी सकाळी 7 ते 10 यावेळेत महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न होईल अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी दिली.